Wednesday, May 15, 2024

गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे

Share

वसमत : लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान झाले. आता, दुसऱ्या टप्प्यात परभणी, नांदेड, हिंगोली, वर्धा, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या आठ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आज वसमत (Vasmat) येथे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील (Hingoli Lok Sabha Constituency) महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी, जाहीर सभेत मुख्यमंत्री म्हणाले की, “काल मला उबाठा गटाचे प्रमुख नीच म्हणाले, पातळी सोडून टीका करणे हे त्यांना शोभते पण मला शोभत नाही. गरीब शेतकऱ्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला म्हणून ही पोटदुखी आहे. हा अपमान हा माझ्या एकट्याचा अपमान नसून सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, माता भगिनींचा, सर्वसामान्य माणसाचा अपमान आहे. या अपमानाला तुम्ही मतपेटीतून नक्कीच उत्तर द्याल याची पूर्ण खात्री असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वसामान्यातल्या प्रतिनिधीला निवडून संसदेत पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जगात देशाची मान उंचावली आहे. आधी जग बोलायचं ते आपल्याला करावं लागत होतं पण आज आपला देश बोलतो ते जग करायला तयार आहे हा फरक मोदीजींमुळे घडला. पंतप्रधान म्हणतात गेल्या दहा वर्षात दिसला तो फक्त ट्रेलर होता खरा सिनेमा तर आता सुरू होईल त्यामुळे देशाची चौफर प्रगती साधायची असेल तर धनुष्यबाणाला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करावे’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अन्य लेख

संबंधित लेख