Friday, September 20, 2024

प्रेरणा पुरुष जगदेव राम उरांव

Share

कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती या गीताला अनुसरून सार्थक जीवन अनेक जण जगले असतील. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव राम उरांव (Jagdev Ram Oraon) ह्यांचे जीवन त्या गीता सोबतच त्यातून प्रकट होणाऱ्या भावविश्वाशी तंतोतंत एकरूप झालेले पाहायला मिळते.

१५ जुलै २०२० मध्ये अगदी मृत्यू येण्यापूर्वीची सारी धडपड ही अपेक्षित असलेल्या एका बैठकीला जाण्यासाठीची होती. खरंतर गेली अनेक वर्षे प्रकृती अस्वस्थतेमुळे हळूहळू प्रवास व बैठकीमध्ये त्यांनी आवश्यकता असल्यास यावे ह्यावर प्रमुख कार्यकर्त्यांचा कटाक्ष असायचा. परंतु जे कार्य आपल्याला जबाबदारी म्हणून दिलेले आहे ते मृत्यूपर्यंत करत राहत अगदी सेनापती प्रमाणे कार्यक्षेत्रामध्येच मृत्यू व्हावा अशी ज्यांची प्रबल इच्छा होती त्या पुढे नियतीला अखेर झुकावे लागले.

जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की, “तुम्ही बैठकीत अपेक्षित आहात परंतु आम्ही सर्वांनी मिळून ठरवलेले आहे की तुम्ही तिथे उपस्थित नाही राहिलात तरी चालेल.”

कोविडच्या त्या काळामध्ये एक दिवस त्यांनी कसा बसा तग धरला अगदी असह्य झाल्यानंतर शेवटच्या क्षणाला “मुझे बैठक मे जाना है” असं म्हणून उठले आणि जमिनीवर धारातीर्थी पडले.

जवळजवळ १९४९ पासूनचा हा प्रवास अंतिम क्षणापर्यंत कार्य मग्नतेचा ध्यास व श्वास घेत समाप्त झाला. तसं बघितले तर जगदेव राम जी हे वर्तमान छत्तीसगडमधील जशपूरच्या जवळील कोंमडो या गावचे; ९ ऑक्टोबर १९४९ रोजी उरांव जनजाती परिवारात जन्मलेले जगदेव राम हे बाल्य काळापासूनच संघाचे स्वयंसेवक.

तत्कालीन कोणा एका प्रचाराकाच्या स्पर्शाने व सहवासाने स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला प्रवास केवळ जशपूर अथवा उरांव समाजाचे नेतृत्व करण्या इतका सीमित न राहता एक प्रगल्भ जनजाती नेता, त्याहीपेक्षा प्रखर हिंदुत्ववादी नेता, सर्वमान्य, सम्यक विचार करणारा, कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा, कृतिशील, धैर्यशील, चारित्र्य संपन्न स्वयंसेवक, प्रत्यक्ष प्रचारक म्हणून घोषित नसतानाही अविवाहित राहून प्रचारका प्रमाणे जीवन जगणारा, लाखो वनवासी बांधवांना अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करणारा, राष्ट्रीय नेतृत्व करणारा प्रवास जगदेव रामजींच्या रूपाने जगाने पाहिला.

खरंतर जगदेव रामजी हे त्या काळामध्ये संघ स्वयंसेवक म्हणून कार्य करत असताना अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाची गंगोत्री असलेल्या जशपूरमध्ये कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांच्या सहवासात १९६८ मध्ये आले आणि त्यांच्या परिसस्पर्शाने पुढे एक सुवर्णमयी जीवन बनून सर्व बाबतीमध्ये झळाळून निघाले.

बलदंड शरीर व संघाचे तृतीय वर्षाचे शिक्षण यामुळे कल्याण आश्रमाच्या शाळेत प्रथम शारीरिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले परंतु बाळासाहेबांनी जगदेव रामजींच्या अनेक गुणांची पारख करत त्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी पाठवले. त्यातून इतिहास विषयांमध्ये एम ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. जगदेव रामजींचे संस्कृत भाषेवरही प्रभुत्व होते. त्यामुळे शाळेमध्ये ते खेळासोबत संस्कृतही शिकवायचे.

ज्या जनजाती समाजाचे आपण काम करत आहोत त्याच जनजाती समाजाचे नेतृत्व विकसित झाले पाहिजे, हा आग्रह बाळासाहेब देशपांडे यांनी सुरुवातीपासून ठेवला होता. त्यात जगदेव रामजींचे समर्पण, स्वयंसेवकत्व, निष्ठा, अभ्यासाची तळमळ व आपल्या समाजाप्रती असलेली कणव, संवेदना यातून बाळासाहेबांची आपल्या नंतरच्या वारसदाराची चिंता मिटली आणि त्या दृष्टीने त्यांनी जगदेव रामजींना घडवायला सुरुवात केली.

अत्यंत विनम्र, समर्पण भावनेने आपले व्यक्तित्व बाळासाहेब व कल्याण आश्रमाच्याच्या चरणी समर्पित करत जगदेव रामजी मिळेल ती जबाबदारी स्वीकारत पुढे जाऊ लागले.

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये आणीबाणी लावली त्यात अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. जगदेव रामजींनी पण सत्याग्रह करत कारावास स्वीकारला.

आणीबाणी संपल्यानंतर कारावासातून बाहेर आल्यानंतर केवळ जशपूर परिसरात निर्माण झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे काम अखिल भारतीय स्तरावर नेण्याची योजना सुरू झाली आणि बाळासाहेबां सोबत जगदेव रामजींचा अखिल भारतीय प्रवास व समाजदर्शन सुरू झाले.

स्वयंसेवक असलेल्या जगदेव रामजींनी बाळासाहेबांनी दाखवलेला विश्वास सर्वार्थाने सार्थ केला. अत्यंत निर्मळ व निस्पृह व्यक्तिमत्त्व, साधी राहणी, केवळ दोन झब्बे आणि संघ गणवेशा सोबत आवश्यक प्रवास साहित्य असलेली छोटी बॅग ही धिप्पाड व भारदस्त व्यक्तिमत्त्व लाभलेल्या जगदेव रामजींची पहिल्यापासूनची निर्माण झालेली ओळख शेवटपर्यंत कायम राहिली. त्यात काहीही फरक पडला नाही कारण त्यांच्याकडे असलेली बॅग ही अनेकांनी सांगूनही बदलली गेली नाही. मीही एकदा प्रयत्न करून त्यांच्या हातात दिलेली ट्रॉलीची बॅगही शेवटच्या क्षणी त्यांनी नाकारून कोणत्याही नवीन बॅगेला तिची जागा घेवू दिली नाही किंवा आकारामानही मोठे करू दिले नाही. अनेक वर्ष सोबत करणारी बॅग व चप्पल त्यांनी केवळ कठीण प्रसंगी साथ दिली म्हणून शेवटपर्यंत वारंवार दुरुस्ती करून वापरली. चराचरामध्ये देवाचे अस्तित्व असते आणि त्याचे आणि आपले निश्चित असे नाते हे मानणाऱ्या जनजाती समाजाचे तत्व त्यांनी आपल्या बॅग व चपलेच्या बाबतीमध्ये पाळले ही त्यांची विशेषता होती.

एकदा निश्चित झालेला प्रवास कोणत्याही कारणाने रद्द करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. मग तिकीट कन्फर्म झालेले असो अथवा नसो किंवा अंगात अगदी १०० च्या वर ताप असतानाही प्रवास करून संघटन प्रमुखांनी कशा प्रकारचा आदर्श अन्य लोकांसमोर ठेवला पाहिजे त्याचे ते प्रेरणा पुरूष होते. त्यामुळे आपणही असेच कार्यकर्ता जीवन जगले पाहिजे अशी अनेकांना प्रेरणा मिळत गेली.

स्वतः आजारी असतानाही नियोजित कार्यक्रमात बदल न करता, विश्रांती न घेता सतत कार्य करत राहणे, कार्यकर्त्यांना सदोदित हसतमुख राहून भेटणे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे, बरोबरीने कार्यकर्त्यांना बैठकीतून योग्य मार्गदर्शन करणे, मिळालेल्या वेळेमध्ये विविध विषयावर वाचन, मनन करणे हा त्यांचा व्यासंग होता आणि हे सर्व पैलू प्रमुख कार्यकर्त्यांच्या समोर, बैठकीमध्ये सर्वत्र दिसायला लागले. त्यातूनच बाळासाहेब देशपांडे यांच्या नंतर वनवासी कल्याण आश्रमाचे आणि एकूणच जनजाती समाजाचे नेतृत्व हे स्वाभाविकपणे जगदेव रामजींकडे चालून आले.

१९९३ मध्ये ओडिसाच्या अखिल भारतीय संमेलनामध्ये बाळासाहेबांनीच आपल्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून वनवासी कल्याण आश्रमाची धुरा त्यांच्याकडे दिली. १९९५ मध्ये अधिकृतपणे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली व २०२० मृत्यूपर्यंत ती यशस्वीपणे पार पाडली.

या सर्व काळात अत्यंत कठोर मेहनत करत क्षण क्षण झिजत वनवासी कल्याण आश्रमाला अखिल भारतीय स्वरूप देण्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान राहिले. राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर अत्यावश्यक वेळेलाच त्यांनी प्रवास हा वातानुकूलित रेल्वेमधुन केला असेल अन्यथा द्वितीय वर्गातील स्लीपर मधील प्रवास हे त्यांच्या कार्य साधनेचे मंदिर होते.

जगदेव रामजींचा अनेक बैठका, कार्यक्रम, विशेष प्रसंगातील समारोप हा नित्य नवीन असायचा. ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक अनेक दाखले त्यामध्ये असायचे. त्यावरून त्यांची वाचन शक्ती ही अफाट होती हे जाणवायचे.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगदेव रामजींच्या स्वभावाचे व आदर्शवत व्यवहाराचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल ते म्हणजे त्यांनी कधीही आपल्याच जनजाती पुरता विचार न करता, त्याबाजूने कोणताही झुकाव न देता आपण एका अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहोत ह्या नात्याने देशभरातल्या पूर्वोत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत प्रवास करताना, सर्वांना आपले मानले. सर्वांचीच आत्मीय पूर्ण व्यवहार करून त्यांच्या सुखदुःखात संघटन अधिकारी आणि सोबतच पारिवारिक नात्याने समरस झाले. याचा परिपाक म्हणजे जगदेवरामजीं सोबतच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम संस्था ही नगरवासी, ग्रामवासी, वनवासी आम्ही सारे भारत वासी बरोबरीने तू मैं एक रक्त याचे प्रतिनिधित्व करणारी, सर्व व्यापक झाली.

संघटने सोबतच साऱ्या जनजाती समाजाचे नेतृत्व त्यांनी केले. विविध जनजातीय संघटनांमध्येही समन्वय व संवाद निर्माण केला. त्यातूनच नगरीय समाज व जनजाती समाज यातील दरी त्यांनी आपल्या व्यवहाराने, स्वभावाने व आचरणाने पूर्णपणे मिटवून टाकली आणि ते खऱ्या अर्थाने हमारे ! सबके जगदेव रामजी म्हणून देशभरामध्ये प्रसिद्ध पावले.

मला आठवतं ते आपल्या आजारपणात तपासणीसाठी महाराष्ट्रातील संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात यायचे. अंतिम वेळेला उपचारासाठी आलेले असताना त्याच वेळेला नाशिक येथील आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरी दुःखद घटना घडली होती. आपल्या आत्यंतिक वेदना दूर सारून त्याचे दुःख दूर करण्यासाठी जगदेव रामजींनी अगदी सर्व लोकांचा आग्रह मोडून त्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन सांत्वना दिली.

अशाच एका प्रवासाच्या दरम्यान मुंबईमध्ये त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. माझ्या सह प्रमुख कार्यकर्ते घाबरून गेले. डॉक्टरांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले. आपल्या व्यवस्थेतून पहिल्यांदा टॅक्सीने जायचे असे ठरले. नंतर एक कार्यकर्ता गाडी घेऊन आला. परंतु जगदेव रामजी कार्यालयीन व्यवस्थेनुसार टॅक्सी मधूनच अत्यंत नाजूक अशा प्रसंगी देखील हॉस्पिटल पर्यंत गेले.

कार्यालयामध्ये “टॅक्सी से यात्रा करना ठीक नही” असे मी त्यांना म्हणताच त्यांनी मात्र टॅक्सीच्या प्रवासाचाच आग्रह धरला आणि ते टॅक्सीतूनच गेले. कसोटीच्या क्षणी सुद्धा तत्व पाळणे आणि त्यानुसार आचरण करणे हे श्रेष्ठ पुरुषाचे लक्षण मानले जाते आणि जगदेव रामजी त्यातही यशस्वी झाले.

अशा प्रकारे केवळ कार्यक्षेत्रात नाही तर, बैठकीमध्ये, घराघरांमध्ये जगदेव रामजी हे सहजतेने, आपल्या आत्मीयपूर्ण व्यवहाराने, अकृत्रिम अशा स्नेहाने छाप पाडत होते आणि यातूनच वनवासी कल्याण आश्रम ही संस्था अनेक ठिकाणी योग्य पद्धतीने पोहचत होती.

जशपूर हे मूळ संस्थानिक राज्य होते. त्यामुळे बाळासाहेब देशपांडेंच्या दैवी कर्तृत्वा सोबत वनवासी कल्याण आश्रमालाही पहिल्या पासून राजाश्रयाचा वरदहस्त लाभला. परंतु जशपूर परिसरात सामान्य जनजाती परिवारात जन्मलेल्या जगदेव रामजींनी आपल्या अलौकिक प्रतिभेने राज परिवाराचा विश्वास व स्नेह संपादित केला. त्यामुळे जसा सामान्य कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांचा वावर होता तसा समाजातल्या सर्वश्रेष्ठ अशा व्यक्तींमध्ये अनेक साधू संत महंतांमध्येही जगदेव रामजींची उठबस व आत्मीय संबंध होते. त्यामुळेच जगातील अनेकांचा आपण मूळ कोण आहोत? याचा शोध सुरू झाला, तेव्हा भारतात भरलेल्या वर्ल्ड अंडर कल्चर संमेलनात त्यांना विशेष निमंत्रित करून त्यांना सन्मानाने डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. परंतु आपल्या हयातीत त्यांनी आपल्या बाजूने कोणालाच याची माहिती कळू दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची कागदपत्रे जी समोर आली त्यात ही बाब उघड झाली. इतकी निर्मोहिता शोधून सापडायची नाही. बरोबरीने २०११ मध्ये त्यांना छत्तीसगडचा आदिवासी सेवक सन्मान पुरस्कारही प्राप्त झालेला होता. अशा अनेक मान सन्मानाने सन्मानित असलेले व्यक्तिमत्त्व शेवटपर्यंत अत्यंत नम्र व एकाच ध्येय मार्गाने कार्य करत राहिले.

वनवासी कल्याण आश्रमा मधील ‘वनवासी’ शब्दाने संघटनेने अनेक प्रहार झेलले आहेत. विरोधकांनी आदिवासी-वनवासी शब्दावरून अनेक वेळा जनजाती समाजाला भ्रमित केलेले आहे. परंतु जगदेव रामजींनी कधीच आदिवासी शब्दाचे समर्थन केले नाही. वनवासी आणि जनजाती हा सर्वार्थाने हिंदूच आहे ह्या बाबत ते केवळ आग्रही नव्हते तर सर्व व्यासपीठावर ठणकावून मांडत राहिले. आपल्या पत्रव्यवहार व विविध लेखांमध्येही त्यांनी ह्या बाबतीत कधीच तडजोड केली नाही.

जगदेव रामजीनी आपले सामान्य कार्यकर्ता पण कायम जपले. ते लौकिक अर्थाने कोणी आध्यात्मिक पुरुष अथवा संत नव्हते परंतु जगलेले जीवन अध्यात्मिक पातळी, संतांपेक्षाही कमी दर्जाचे नव्हते. ते बाळासाहेब देशपांडे किंवा अन्य लोकांप्रमाणे स्वयंप्रकाशित नव्हते. परंतु त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर ते शेवटपर्यंत निर्धाराने सर्वांना सोबत घेवून कार्यकुशलततेने चालत राहिले.

त्यांच्या बाबतीत असे म्हणता येईल की काया वाचा मनाने वनवासी कल्याण आश्रमाला आणि अंगीकृत विचाराला कुठेही कमीपणा न आणता प्रत्येक वेळेला वनवासी समाजाची व वनवासी कल्याण आश्रमाची मान ताठ ठेवली.

१५ जुलै २०२० रोजी बैठकीला जायचंय याच ध्येयाने प्रेरित होवून अखंड कार्यसिध्द स्वरूपात देह ठेवणारे जगदेव रामजी आजही कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या स्मृतीने जिवंत आहेत. त्यांचा आज स्मृतिदिवस. त्यानिमित्ताने ह्या प्रेरणा पुरुषाचा जो सुगंध आहे तो असाच बहरत राहो. त्यांची जीवनगाथा अशा माध्यमातून वेगवेगळ्या सर्वदूर पोहोचत राहो. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राने स्वर्गीय जगदेव रामजींच्या स्मृतिप्रत्यर्थ प्रत्येक वर्षी जनजाती समाजाच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा सुरू केलेली आहे तर अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने अशा थोर कार्यकर्त्याला, महापुरुषाला आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अत्यावश्यक तसबिरी मध्ये भारतमाता, प्रभू श्रीराम, भगवान बिरसा मुंडा, वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या सोबत सन्मानाचे स्थान प्रदान करून शेवटपर्यंत कार्य मग्न असलेल्या त्यांच्या जीविताला अमर केले आहे.

शरद जयश्री कमळाकर चव्हाण
(लेखक जनजाती कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख