Saturday, October 19, 2024

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे

Share

कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10 धर्म, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो भाषा असून देखील संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवलेले आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. आज अति सामान्य समाज मुख्य प्रवाहात येऊन चमक दाखवतोय हे फक्त संविधानाने शक्य झाले आहे असे मत एडवोकेट विजय गव्हाळे (बारामती) यांनी सामाजिक संवाद मेळाव्या मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले…

काँग्रेसने ४२ वी घटना दुरुस्ती केली होती व देशावर आणीबाणी लादून संविधानाचा गळा घोटण्याचे काम केले. परंतु भारतातील लोकशाहीवादी जनतेने लाखोंच्या संख्येत तुरुंगवास भोगून इंदिरा गांधी यांची हुकूमशाही मोडून काढली. राहुल गांधी हे बाहेरच्या देशात जावून “आम्ही आरक्षण संपवू” असे म्हणतात. संविधानाची मोडतोड काँग्रेसनेच केलेली आहे.

विवेक विचार मंच तर्फे सामाजिक संवाद मेळाव्याचे आयोजन खरे मंगल कार्यालय कोल्हापूर येथे करण्यात आले होते. यावेळी मंचावर विवेक विचार मंचचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागर शिंदे, कोल्हापूर जिल्हा संयोजक डॉ. किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुनील वांकर यांची उपस्थिती होती.

संविधान उद्देशिका वाचन हे संदीप कांबळे यांनी केले. प्रसिद्ध गायक पी कुमार (प्रकाश वस्ताद) यांनी भीम गीताचे गायन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमाती व वंचित घटकांमधील प्रज्ञावंत व सामाजिक कार्यकर्त्यांचा विवेक विचार मंचतर्फे सत्कार करण्यात आला यामध्ये सदानंद दिघे, डॉक्टर कौस्तुभ वाईकर, पत्रकार रवींद्र कांबळे, प्राणिमित्र प्रशांत साठे, अनिल कामत, विमल घोडके, लालासो पवार, मोनाली आवळे, आनंद खामकर व गुणवंत नागटीळे यांचा समावेश होता.

या सामाजिक संवाद मेळाव्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, सामाजिक न्याय, शासकीय योजना या संदर्भात चर्चा व मोकळेपणाने संवाद झाला. सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी याबाबतीत आपली मते मांडली. प्रत्येक तालुक्यात एक संविधान भवन निर्माण करावे त्याचा बहुजन विद्यार्थ्यांना फायदा होईल. एक गाव, एक पाणवठा, एक मंदिर, एक स्मशानभूमी असावी. योजनांची अंमबजावणीत येणाऱ्या त्रुटी दूर व्हाव्यात, दारू बंदी साठी प्रयत्न व्हावे. अशी विविध मते उपस्थितांनी व्यक्त केली.

सागर शिंदे यांनी सर्वांच्या सोबत संवाद साधला ते म्हणाले, भारतीयांच्या एकतेचे सूत्र संविधान आहे. कम्युनिस्ट माओवादी, इस्लामिक कट्टरतावादी संघटना तसेच फुटीरतावादी संघटनांकडून भारतीय संविधानाला धोखा आहे. लोकशाहीवादी जनतेने सावध राहिले पाहिजे. सध्या समाजात अनेक चुकीचे विमर्श पसरवले जातात.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल कामत यांनी केले व डॉ.किशोर गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. हा सामाजिक संवाद मेळावा यशस्वी होण्यासाठी सुनील आडवी, बसवराज सज्जन, सुरेश वाळवेकर, उमेश कांबळे, संदीप कांबळे, आप्पासो बन्नेनवर, प्रशांत मालनकर यांनी विशेष प्रयत्न केले.

अन्य लेख

संबंधित लेख