Friday, October 25, 2024

महायुती सरकार मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सदैव पाठीशी – नरेंद्र पाटील

Share

करमाळा : “ग्रामीण भागातला तरुण नोकरी करण्याबरोबर, नोकरी देणारा व्हावा या उद्देशाने भांडवलाअभावी कुठल्याही व्यवसायात अडचण येणार नाही म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळ सदैव आपल्या पाठीशी उभे राहणार आहे, त्याचबरोबर महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी व अशा विविध योजनांच्या माध्यमातून मराठा तरुणांना सक्षम बनवण्यासाठी सरकार सदैव पाठीशी राहील.” अशी ग्वाही अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी दिली. करमाळा (Karmala) येथे ४ ऑगस्ट २०२४ रोजी “महामंडळ आपल्या दारी” या संकल्पनेतून लोकमंगल बँक सोलापूर, सर्वोदय प्रतिष्ठान करमाळा व छत्रपती शिवाजी दूध संकलन केंद्र गुळसडी यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या मराठा बांधवांचा मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख हे होते तसेच मान्यवर म्हणून महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक अभिजीत पाटील, सांगोल्याचे नगरसेवक प्रसिद्ध वक्ते गजानन भाकरे, विलासराव घुमरे, भाजपचे किरण बोकन, गणेश चिवटे, शशिकांत पवार, नरेंद ठाकूर, रामभाऊ ढाणे, सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव अमरजीत साळुंखे, छत्रपती दूध संकलन केंद्राचे चेअरमन शिवाजी पाटील, अजिंक्य पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार सुभाष देशमुख बोलताना म्हणाले की, व्यवसायासाठी लोकमंगल बँक व लोकमंगल परिवार सदैव सहकार्य करीत राहिला आहे व यापुढे ही करत राहणार. देशाच्या उज्वल भविष्यासाठी तरुणांनी एक पाऊल पुढे टाकले तर लोकमंगल परिवार दहा पाऊले पुढे येऊन काम करण्यास तयार आहे. सर्वोदय प्रतिष्ठान व छत्रपती दूध संकलन केंद्र यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मेळाव्यातून करमाळ्यातील तरुणांना नवी दिशा मिळणार आहे. या ग्रामीण भागातल्या तरुणांच्या कार्यातूनच देशाची उन्नती होऊ शकते असे त्यांनी विश्वासाने सांगितले.

सर्वोदय प्रतिष्ठानचे सदस्य अजित कणसे यांचे “शालेय परिपाठ” हे पुस्तक सर्व मान्यवरांना भेट देण्यात आले. तसेच, अण्णासाहेब पाटील महामंडळातून लाभ घेतलेल्या प्राथमिक स्वरूपात दहा तरुणांचा सत्कार नरेंद्र पाटील व मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आला. या मेळाव्यास करमाळा शहर तसेच तालुक्यामधील नवउद्योजकांनी बहुसंख्य प्रमाणात हजेरी लावली होती. प्रथमच करमाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग मेळावा संपन्न झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक अभिजीत पाटील, युवा व्याख्याते गजानन भाकरे यांची भाषणे सुद्धा झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष, निमंत्रक दीपक चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन नितीन चोपडे यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकमंगल बँकेचे सुरवसे, पेटकर,अक्षय भोसले, पतसंस्थेचे व्यवस्थापक रमण परदेशी, प्रसाद पलंगे,सर्वोदय प्रतिष्ठानचे अमरजीत साळुंखे, मनोज कुलकर्णी, अजित कणसे, सुनील पवार, अमोल रणशूर, संतोष कांबळे, गोपाल वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

अन्य लेख

संबंधित लेख