Thursday, August 27, 2026

ज्येष्ठ संघ प्रचारक ए. बालकृष्णजींचे निधन; राष्ट्रसेवेतील समर्पित पर्व संपले

Share

विवेकानंद केंद्र व विवेकानंद रॉक मेमोरिअलचे अखिल भारतीय अध्यक्ष, ज्येष्ठ संघ प्रचारक आणि निष्काम कर्मयोगी श्रद्धेय ए. बालकृष्णजी यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्वोत्तर भारतातील शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रसेवेतील एक समर्पित पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हवाई दलातील नोकरीचा त्याग आणि ‘जीवनव्रती’ प्रवास

१९७३ मध्ये हवाई दलातील आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन बालकृष्णजींनी पूज्य एकनाथजी रानडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. विवेकानंद केंद्राच्या पहिल्याच तुकडीत त्यांनी ‘जीवनव्रती’ (आजीवन प्रचारक) म्हणून स्वतःला पूर्णवेळ राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. पी. परमेश्वरनजी यांच्या पश्चात त्यांनी विवेकानंद केंद्राच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती.

पूर्वोत्तर भारतात शैक्षणिक क्रांती

बालकृष्णजींचे विशेष कार्य पूर्वोत्तर भारत, प्रामुख्याने अरुणाचल प्रदेशात राहिले. तेथील दुर्गम व आदिवासी भागांत घरोघरी जाऊन मुलांचा शोध घेणे, त्यांच्यासाठी शाळांची उभारणी करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पूर्वोत्तर भारतात भारतीयतेची आणि सेवाभावाची मूळ रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

ऐतिहासिक भारत परिक्रमा यात्रा

स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भारत परिक्रमेच्या स्मृतीप्रित्यर्थ कोलकाता ते कन्याकुमारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक यात्रेचे ते मुख्य समन्वयक होते. या याक्रेने ३४७ दिवसांत तब्बल २२,००० किलोमीटरचा प्रवास करत देशभरात राष्ट्रचेतना जागृत केली होती.

सिंहाचा वाटा अन् अथांग साधेपणा

पाच दशकांहून अधिक काळ स्वामी विवेकानंदांचे विचार आणि समाजसेवेला समर्पित करणाऱ्या बालकृष्णजींनी सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशा सर्वोच्च पदांवर काम केले. मात्र, तरीही त्यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत साधेपणा, त्याग आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण राहिले.

त्यांच्या निधनाबद्दल देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी, विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना आदरंभावाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.


अन्य लेख

संबंधित लेख