Saturday, July 27, 2024

मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड): दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन: मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील मैलाचा दगड

Share

मुंबई – मुंबई (Mumbai) शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून ओळखला जाणाऱ्या बहुप्रतीक्षित मुंबई कोस्टल रोड फेज 2 (Mumbai Coastal Road Phase 2) चे आज उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते.

सुमारे 10.58 किमीचे अंतर असलेला मुंबई कोस्टल रोडचा २ रा टप्पा वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंत पसरलेला आहे. दक्षिण मुंबईला शहराच्या उत्तरेकडील उपनगरांशी जोडणारा हाय-स्पीड कॉरिडॉर तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या किनारी मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्ग असे नाव देण्यात आले आहे.

उद्घाटनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पाचा हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “मुंबई कोस्टल रोड फेज 2 हा शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या आणि मुंबईतील लोकांना कार्यक्षम वाहतूक उपाय प्रदान करण्याच्या महायुती सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”

मुंबई कोस्टल रोड फेज 2 मध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत, ज्यामध्ये मरीन ड्राइव्ह ते हाजी अली या 6.25 किमी लांब पट्ट्याचा समावेश आहे. मंगळवार, 11 जूनपासून हा रस्ता सर्वसामान्य जनतेसाठी कार्यान्वित होईल.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामध्ये भारतातील सर्वात मोठा व्यासाचा बोगदा आहे, ज्याचा व्यास 12.19 मीटर आहे. मावळा टनेलिंग मशीन वापरून हा बोगदा बांधण्यात आला आहे. मुंबई कोस्टल रोड दुसऱ्या टप्प्यामुळे दक्षिण मुंबई आणि उत्तर उपनगरांमधील प्रवासाच्या वेळेत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे. प्रवासी आता मरीन ड्राइव्ह आणि हाजी अली दरम्यानचे अंतर केवळ 5-7 मिनिटांत कापण्याची अपेक्षा करू शकतात, सध्याच्या गर्दीच्या वेळेत हेच अंतर कापण्यासाठी किमान 45 मिनिटांचा वेळ लागतो.

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईपासून शहराच्या उत्तरेकडील भागांमध्ये होणारी वाहतूक कोंडी कमी करणे अपेक्षित आहे. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प हा १९६७ पासून शहराच्या नियोजन आराखड्याचा भाग होता. या किनारी मार्गाचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिके द्वारे केले जात आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत एकूण 13,984 कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रकल्पाचा अंतिम टप्पा या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख