Sunday, October 20, 2024

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल

Share

मुंबई : महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.

दि. २७ व २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक,मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी पाच वाजता बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि त्यांना काही सूचना दिल्या जातील. शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन किंवा तीन टप्प्यात घेतली जाईल, अशा चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार? हे शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख