पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खऱ्या अर्थाने लोकमाता होत्या. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी योजना राबवल्या. त्यांचे कार्य केवळ माळवा प्रदेशापुरते मर्यादित नव्हते; देशभरातील मंदिरे, घाट, धर्मशाळा, तलाव, बारव, विहिरी, पूल, रस्ते आणि वसाहती ही त्यांच्या दूरदृष्टी ठेवून केलेल्या समाजसेवेची साक्ष आहेत.
अहिल्यादेवींच्या कार्यात धार्मिक श्रद्धा, सामाजिक समरसता, आर्थिक समतेचा आग्रह, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आणि लोककल्याणाची निःस्वार्थ भावना यांचे सुंदर प्रतिबिंब दिसते.
त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सेवावर्धिनी संस्थेने त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्प” हाती घेतला आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात विविध प्रकारची स्थापत्य निर्मिती झाली. पानिपतच्या युद्धात सैन्याला पाण्याच्या अभावी भरपूर त्रास झाला हे लक्षात घेऊन अहिल्यादेवींनी विविध ठिकाणी बारव, तलाव, विहीरी यांची निर्मिती केली. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील झाला.
सेवावर्धिनी संस्था जलसंवर्धन, पुनरुज्जीवन व पुनर्वापर यासाठी कार्य करते. राज्यातील पाणी टंचाई कमी करणे हा मुख्य उद्देश्य ठेऊन हे काम होते.
बारव म्हणजे काय ?
हिंदू परंपरेत ‘जल’ हे पंचमहाभूतांपैकी एक महत्वाचे तत्व आहे. त्यामुळे त्याचे रक्षण, संवर्धन याला देखील अत्यंत महत्त्व आहे. भारतात सिंधु संस्कृतीपासून बारवचे अस्तित्व दिसून येते. बारव म्हणजे एक पारंपरिक, जुन्या पद्धतीचं विहिरीसारखं जलसंचयनाचे ठिकाण होय, जे विशेषतः कोरडवाहू किंवा पाण्याच्या टंचाई असलेल्या भागांमध्ये बांधले जात असे. बारव ही सामान्यतः पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्यांसह खोलगट स्वरूपात बांधलेली असते, म्हणूनच तिला “पायऱ्यांची विहीर” असेही म्हणतात. भारतातील विविध भागांमध्ये बारव वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. हिंदीत तिला “बावडी” किंवा “बावली”, गुजरातीमध्ये “वाव” आणि इंग्रजीमध्ये “stepwell” असे म्हणतात. बारव ही केवळ एक जलस्रोत नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भाग आहे.
बारव या पारंपरिक जलसंचयनाच्या रचना त्यांच्या बांधणीच्या स्वरूपानुसार आणि प्रवेशाच्या संख्येनुसार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागल्या जातात. बांधणीच्या दृष्टीने बारव दोन प्रकारच्या असतात. साधी बारव आणि सालंकृत बारव. साधी बारव म्हणजे वापरासाठी बांधलेली, कोणत्याही विशेष सजावटीशिवाय असलेली सामान्य रचना असते. तर सालंकृत बारव ही अत्यंत देखणी, कोरीव काम व शिल्पकलेने सजलेली असते आणि ती धार्मिक किंवा सामाजिक महत्त्वासाठी बांधलेली असते. प्रवेशाच्या संख्येनुसार बारवांचे चार प्रकार आहेत:
- नंदा प्रकारात फक्त एका बाजूने पायऱ्या असतात.
- भद्रा प्रकारात दोन बाजूंनी प्रवेश असतो.
- जया प्रकारात तीन बाजूंनी पायऱ्या असतात.
- सर्वात भव्य विजया प्रकारात चारही बाजूंनी प्रवेश असतो.
या प्रकारांमधून बारवांची उपयोगिता, सौंदर्यदृष्टी आणि स्थापत्यशास्त्रातील विविधता लक्षात येते.
महाराष्ट्रात बारव पुनरुज्जीवनाची आवश्यकता –
महाराष्ट्रात बारवांची संख्या अंदाजे २० हजाराच्या जवळपास आढळून येते. महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या पारंपरिक बारवा आजच्या काळात जलसंवर्धनासाठी एक समर्थ आणि शाश्वत पर्याय ठरू शकतात. अनेक भागांमध्ये असे बारव आढळतात की जिथे ९० ते ९५ टक्के वर्षभर पाणी टिकून राहते. बारव पूर्वीच्या काळी गावांतील प्रमुख जलस्रोत होते. मात्र आजच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा, शहरीकरण आणि जलवायू बदल यांच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पाण्याची गरज आणि सध्याची वाढलेली गरज यामधील तफावत भरून काढण्यासाठी या पारंपरिक बारवांचे भूजल पुनर्भरणासाठी पुनरुज्जीवन करणे आवश्यक ठरते.
या प्रक्रियेतून जर स्थानिक जलस्रोतांचा वापर वाढवला गेला, तर पाणीपुरवठ्याच्या योजना अधिक सुलभ, कमी खर्चिक आणि टिकाऊ ठरतील. जलस्रोतांचे स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन हे पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी उत्तर ठरू शकते. त्यामुळे बारवांचे संवर्धन व पुनरुज्जीवन हे महाराष्ट्राच्या जलनीतीचा एक महत्त्वाचा भाग व्हायला हवा.
बारव पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेमुळे केवळ पारंपरिक जलस्रोतांचे संवर्धन होत नाही, तर त्याचे अनेक अतिरिक्त फायदे ही मिळतात. सर्वप्रथम, या उपक्रमामुळे उथळ जलधारांचा (shallow aquifer) वापर वाढतो, ज्यामुळे भूजल पातळी स्थिर राहते आणि नैसर्गिक जलचक्राला चालना मिळते. परिणामी, खोल विंधन विहिरींवर (borewells) अवलंबन कमी होते, जे केवळ खर्चिकच नाही तर भूजलाचे अतिनिकर्षण देखील घडवतात.
या बारवांमध्ये नैसर्गिकरीत्या प्रदूषणविरहीत, स्वच्छ आणि निरोगी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी रासायनिक प्रक्रियांचा वापर कमी होतो, जो अनेक वेळा आरोग्यास अपायकारक ठरतो. याशिवाय, बारवांमधील पाण्याचा वापर केल्याने पाणीपुरवठा योजनांवरील खर्चात लक्षणीय बचत होते, कारण स्थानिक स्रोत वापरल्याने वाहतूक, शुद्धीकरण आणि वितरण यावरचा खर्च कमी होतो.
महत्त्वाचे म्हणजे, बारव पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून जनजागृतीस चालना मिळते. लोकांना आपल्या जलसंपत्तीविषयीची जाणीव होते आणि ते या कार्यात सक्रिय सहभाग घेऊ लागतात. परिणामी, पाण्याच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी समाजाभिमुख प्रयत्न शक्य होतात, जे दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
ऐतिहासिक वारसा जतन
बारव हे केवळ जलस्रोत नसून, आपल्या ऐतिहासिक वारशाचे प्रतीक आहेत. अनेक शतकांपासून ही परंपरा आपल्या समाजात अस्तित्वात आहे, मात्र दुर्दैवाने काळाच्या ओघात हा समृद्ध वारसा दुर्लक्षित राहिला आहे. या बारवांमध्ये स्थापत्यकला, शिल्पकला, भक्तीची अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य ठेवा दडलेला आहे, जो जतन करण्याची आज नितांत गरज आहे.
बारवांचे संवर्धन केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. हे बारव सौंदर्यदृष्ट्या आकर्षक ठिकाणे ठरू शकतात, ज्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडते आणि स्थानिक समुदायासाठी एकत्र येण्यासाठी सार्वजनिक जागा उपलब्ध होते. विविध सण-उत्सव, धार्मिक समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम यांच्या निमित्ताने समाजात एकात्मता वाढू शकते.
यासोबतच, या उपक्रमांमधून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती देखील शक्य आहे. जसे की देखभाल, मार्गदर्शन, पर्यटन व्यवस्थापन, हस्तकला विक्री इत्यादी. त्यामुळे बारवांचे जतन हे केवळ सांस्कृतिक दृष्टीने नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे.
सेवावर्धिनी संस्थेमार्फत बारव पुनरुज्जीवन प्रकल्प –
सेवावर्धिनी संस्थेतर्फे गेले एक वर्ष बारव पुनरुज्जीवन हा प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. या अंतर्गत जल आणि वारसा संवर्धन करण्यात आले आहे आणि अजूनही हे काम सुरु आहे.
बंगाली बारव अहिल्यादेवी होळकर यांनी बांधली आहे. जेजुरीमध्ये येणाऱ्या खंडोबाच्या भक्तांना पाणी या उद्देशाने याची निर्मिती केली गेली. अनेक वर्षापासून या बारवमध्ये घाण, दगडगोटे साचले होते. तसेच झाडे उगवली होती. मार्च २०२३ मध्ये सेवावर्धिनीने बारव पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली होती. गेल्या वर्षी आषाढी वारीच्या काळात या बारवांमधून वारकऱ्यांना पाणी पुरवण्यात आले, ज्यामुळे त्या हजारो भक्तांना शुद्ध पाण्याची उपलब्धता झाली. त्याचप्रमाणे, या वर्षीच्या तीव्र उन्हाळ्यात या बारवांमधून दररोज सुमारे एक लाख लिटर पाणी उपसा करण्यात आला, जो पिण्यायोग्य असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

याशिवाय जेजुरी येथील जानाई बारव, सुपे येथील राखुंडी बारव, तसेच धामारी येथील वाघेश्वर बारव जेजुरीजवळील इजाळा (कडेपठार) आणि सुपे येथील सिद्धेश्वर बारव यांचा समावेश होतो. महाराष्ट्राबाहेरही कर्नाटकातील गुडीबंडे येथे वसलेली बेलागिरी रंगणा बारव याचा ही समावेश यात आहे.

याशिवाय इजाळा (कडेपठार, जेजुरी, पुणे), सिद्धेश्वर बारव (सुपे, पुणे), मुक्ताई बारव (पिचडगाव, अहिल्यानगर), गुरुपन्ना बावी (गुडीबंडे, कर्नाटक), अंधारी बारव (कोंढापुरी, पुणे), ओढा (कोंढापुरी, पुणे), मस्तानी तलाव (पाटस, पुणे), जुना बाजारतळ (पाटस, पुणे), गाव वेस (पाटस, पुणे) येथील कामे प्रगतीपथावर आहेत.
नेवरी (सांगली), जयराम स्वामी मठ (वडगाव ज.स्वा, सातारा), शिंदे विहीर (वडगाव ज.स्वा, सातारा), मामलेदार कचेरी (सासवड, पुणे), भापकर आळी (लोणी भापकर, पुणे), नारायणेश्वर (नारायणपूर, पुणे) येथील बारव पुनरुज्जीवन प्रकल्प प्रस्तावित आहेत.
सेवावर्धिनी संस्था यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्प” हा समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम आहे. या माध्यमातून ऐतिहासिक वारशाचे संवर्धन होते, पारंपरिक पाणीस्रोताचा वापर होतो आणि पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर पर्यायी मार्ग मिळेल. अहिल्यादेवींना वाहिलेली ही खरी आदरांजली असून, त्यांच्या लोकहितकारी कार्याची ही आधुनिक पुनःप्रचिती आहे. प्रत्येकाने अशा कार्यातून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.