छत्रपती संभाजीनगर : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या थोर महात्म्याचा इतिहास, महत्त्व आणि त्यांच्या बलिदानाची महती शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये १५ ते २३ जानेवारी दरम्यान विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) जयश्री चव्हाण व (माध्य.) आश्विनी लाठकर यांनी या नियोजनाची सविस्तर माहिती दिली आहे.
उपक्रमांचे वेळापत्रक
- १५ ते २३ जानेवारी: शाळास्तरावर प्रभात फेरी, माहितीपट आणि कार्यक्रमाच्या विशेष गीताचे सादरीकरण.
- १७ ते १९ जानेवारी: चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन.
- २१ जानेवारी: तालुकास्तरावरील विजेत्यांची जिल्हास्तरीय स्पर्धा.
- २५ जानेवारी: जिल्हास्तरीय विजेत्यांचा ‘हिंद दी चादर’ मुख्य कार्यक्रमात गौरव.
निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे विषय:
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला चालना देण्यासाठी विविध १२ विषयांची निवड करण्यात आली आहे. यात
१.सहा समाज आणि श्री गुरु तेग बहादुर यांचे नाते.
२.शिख,सिकलेकर ,बंजारा,मोहियाल,सिंधी, लबाना या समाजाचे श्री गुरुतेग बहादुर यांचे नाते श्री गुरु तेग बहादुर साहेब यांची शिकवण.
३.भाई सती दास आणि भाई मती दास यांचे गुरु प्रति समर्पण.
४.श्री गुरु तेगबहादुर यांचा गृहस्थाश्रमातील कालखंड
५.श्री गुरु तेगबहादुर यांचे बालपण आणि त्यांचा गृहस्थातील कालखंड
६.श्री गुरु तेगबहादुर यांचा बाबा बकाला येथील कालखड.
७.श्री गुरु तेगबहादुर यांना हिंद दी चादर असे का संबोधित करतात.
८.तेग बहादुर सन्मानाची कथा.
९.भाई माखन शहा लबाना यांना झालेला दिव्य साक्षात्कार.
१०.श्री गुरु तेगबहादुर यांचा बाबा बकाला ते आनंदपुरचा प्रवास.
११.श्री गुरु तेगबहादुर यांचे पटना येथील वास्तव्य.
१२.भाई सती दास, भाई मती दास, भाई दयाला आणि भाई दिलिप जी यांची शहादत.
हे विषय असतील.
पथनाट्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:
केवळ स्पर्धाच नव्हे, तर जनजागृतीसाठी शाळांना पथनाट्य आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पथनाट्यांच्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून त्या शिक्षण विभागाने दिलेल्या लिंकवर अपलोड करावयाच्या आहेत. तसेच शाळांमध्ये भित्तीपत्रकांचे (Posters) वाचन करून गुरु साहेबांच्या शिकवणुकीचा प्रचार केला जाणार आहे.
बक्षीस वितरण:
तालुकास्तरावरून निवडून आलेल्या प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा स्तरावर चुरस पाहायला मिळेल. यातील अंतिम विजेत्यांना २५ जानेवारी रोजी आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.