Saturday, January 31, 2026

“हे काम पाहून अजितदादांची खूप आठवण आली…”; नवी मुंबईत वकील प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री फडणवीस भावूक

Share

नवी मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी मुंबई येथे ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर’चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नवोदित वकिलांना प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
यावेळी अकॅडमीची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री म्हणाले, “या इमारतीचा दर्जा पाहून मला आज अजितदादांची प्रकर्षाने आठवण येत आहे. सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेबाबत आणि कामाच्या वेगाबाबत त्यांचा दृष्टिकोन अत्यंत काटेकोर होता. या वास्तूची गुणवत्ता त्यांच्याच आग्रहाची फलश्रुती आहे.” मुख्यमंत्र्यांनी यावेळी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’चे अभिनंदन करत सांगितले की, महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेचा अत्यंत प्रभावी आणि दर्जेदार वापर करण्यात आला आहे. अवघ्या एका वर्षात पूर्ण झालेल्या या इमारतीतील वर्गखोल्या, ऑडिटोरिअम आणि प्रशिक्षण सुविधा या सर्व बाबी उच्च दर्जाच्या असून, या संकल्पनेमागील नियोजन आणि अंमलबजावणी उल्लेखनीय आहे, असे त्यांनी नमूद केले.

कायद्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यपद्धती यातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थेची नितांत गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नव्या न्याय, दंड आणि साक्ष संहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित वकिलांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि संशोधनाला चालना देणारे हे केंद्र न्यायव्यवस्थेची गुणवत्ता वाढविण्यास मोलाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या ऐतिहासिक सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे तसेच न्यायदान आणि कायदे क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या केंद्रातून प्रेरणा घेऊन आगामी काळात देशातील इतर राज्यांतही अशाच स्वरूपाच्या अकॅडमी उभारल्या जातील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख