Friday, September 20, 2024

उद्धव ठाकरेंच्या इंडी आघाडीच्या नेत्याची रामाच्या अस्तित्वावर शंका?

Share

इंडी आघाडी तामिळनाडूच्या मंत्र्यांनी भगवान रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटले आहे

अरियालूर, तामिळनाडू – इंडी आघाडीचे तामिळनाडू मधील डीएमके पक्षाचे नेते व तेथील परिवहन मंत्री एस.एस. शिवशंकर यांनी वादग्रस्त विधान करताना असा दावा केला आहे की भगवान रामाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत. चोल सम्राट राजेंद्र चोल यांच्या जयंतीनिमित्त अरियालूर येथे आयोजित कार्यक्रमात इंडी आघाडीच्या नेत्यांनी ही टीका केली.

“आमच्याकडे इतिहास आणि पुरावे आहेत, परंतु प्रभू रामाच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा किंवा ऐतिहासिक नोंद नाही,” असे शिवशंकर म्हणाले. तामिळनाडूच्या इतिहासात आणि संस्कृतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजेंद्र चोल यांचा वारसा साजरा करण्याचे त्यांनी लोकांना आवाहन केले.

मंत्र्यांच्या या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षासह विविध स्तरातून तीव्र टीका झाली आहे. तामिळनाडू भाजपचे नेते के. अन्नामलाई यांनी सांस्कृतिक बाबींवर ऐतिहासिक भूमिका असूनही द्रमुकला अचानक देशाच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाबद्दल प्रेम निर्माण झाल्याची बोचरी टीका केली.

अण्णामलाई म्हणाले की, “तामिळनाडूचा इतिहास १९६७ मध्ये सुरू झाला असे वाटणाऱ्या DMK या पक्षाला अचानक देशाच्या समृद्ध संस्कृती आणि इतिहासाबद्दल प्रेम वाटणे हे हास्यास्पद आहे,”

तामिळनाडू मधील द्रविड मुनेत्र कळघम अर्थात DMK हा सत्ताधारी पक्ष असून काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी याने हिंदू धर्मावर टीका करताना सनातन संस्कृतीला किड्यांप्रमाणे संपवले पाहिजे असे वादग्रस्त विधान केले होते. द्रमुक पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या इंडी आघाडीचा भाग आहे.

मागे काही वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने राम हे काल्पनिक पात्र असून त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचे शपथपत्र कोर्टात सादर केले होते. अगदी राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यावर सुद्धा काँग्रेस सह इंडी आघाडीच्या अनेक नेत्यांनी बहिष्कार टाकला होता.

महाराष्ट्रातील इंडी आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांची आता यावर काय प्रतिक्रिया असेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. याआधीही उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाष्य करणे टाळले आहे. उलट त्यांच्या भाषणातून त्यांनी शेंडी जानवे व भगव्या ध्वजावर शेलक्या भाषेत टीका केली होती. उबाठा गटाला मुंबई परिसरातील मुस्लिम मतदारांचा मिळालेला पाठिंबा पाहता ते आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहतील असे दिसत नाही.

अन्य लेख

संबंधित लेख