Saturday, May 24, 2025

वनवासींसाठी झटलेला ‘वनयोगी’ ः बाळासाहेब देशपांडे

Share

स्वाभिमानी, धर्मप्रेमी आणि आपला विकास स्वबळावरच करायचा आहे अशा मन:स्थितीत देशातील वनवासी समाज आज खंबीरपणे उभा राहिला आहे. हे घडू शकले त्यात ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक ‘वनयोगी’ बाळासाहेब देशपांडे यांचे परिश्रम आणि दूरदृष्टीचा खूप मोठा वाटा आहे. २१ एप्रिल हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने…

१९५२ साली मध्यप्रदेशातील जशपूरनगर येथे ‘वनवासी कल्याण आश्रमा’ची (Vanvasi Kalyan Ashram) स्थापना एका छोट्याश्या छात्रावासाच्या माध्यमातून झाली. मात्र कल्याण आश्रमाच्या हजारो कार्यकर्त्यांनी केलेल्या साधनेच्या बळावर आज जवळपास संपूर्ण देशामध्ये असलेल्या वनवासी क्षेत्रात कल्याण आश्रमाने आपल्या कार्याची मुळे नेऊन पोहोचवलेली आहेत. वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार समोर ठेवून अखंडपणे कार्यरत असणारी ‘वनवासी कल्याण आश्रम’ ही वनवासी क्षेत्रातील कदाचित एकमेव सामाजिक संघटना म्हणावी लागेल.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तत्कालीन मध्य प्रांताचे मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ल जेव्हा रायगड जिल्ह्यातील जशपूरनगर भागात आपल्या पहिल्या वहिल्या दौर्‍यासाठी गेले, तेव्हा त्या भागातील अराष्ट्रीय शक्तींच्या चिथावणीवरून हजारो वनवासींनी त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत केले. एवढेच नव्हे तर ‘या भागातून चालते व्हा’ असे फलक त्यांना दाखवले गेले. या सार्‍या कृत्यांमागे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ख्रिश्चन मिशनर्‍यांनी वर्षानुवर्षे सेवेच्या नावाखाली भोळ्याभाबड्या वनवासींना फितवल्याचे त्यांच्या लक्षात आले. वनवासी क्षेत्रात गेल्या दीडदोनशे वर्षांमध्ये परकीय शक्तींनी कसे हातपाय पसरले आहेत याची जाणीव देखील त्यांना झाली. याबाबत ठक्कर बाप्पांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. ठक्कर बाप्पांनी या सर्व भागात राष्ट्रीय भावनेचे जागरण करण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली आणि त्यासाठी तशा प्रकारच्या शाळा वनवासी भागात सुरू करण्याची सूचना केली.

ही सूचना महत्त्वाची होती, पण हे सर्व कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला. कारण वनवासी भागात अशा प्रकारचे कार्य नेटाने करणारी आणि अराष्ट्रीय शक्तींचा विरोध मोडून काढणारी खंबीर व्यक्ती त्यासाठी आवश्यक होती. ठक्कर बाप्पांचे सहकारी श्री. पांडुरंग वणीकर यांनी त्यावेळी नाव सुचवले ते रमाकांत केशव तथा बाळासाहेब देशपांडे (Balasaheb Deshpande) या नागपूरमधील तरूण वकिलाचे.

कोण होते बाळासाहेब देशपांडे ?
बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१३ ला अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण एम.ए., एल.एल.बी. पर्यंत नागपूरमध्येच झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याशी बाळासाहेबांचा संपर्क आला. वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजे १९२६ साली ते संघाचे स्वयंसेवक बनले. वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाळासाहेबांनी प्रारंभी नागपूरमध्ये आणि नंतर रामटेकमध्ये वकिलीस प्रारंभ केला. संघाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची वैचारिक बैठक पक्की असल्याने त्यांच्याकडे संघाच्या तालुका कार्यवाहपदाची जबाबदारी आली. याच दरम्यान १९४२ साली महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले. बाळासाहेब देशपांडे देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. रामटेकमधील आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. रामटेकमधील तालुका कचेरीवर तिरंगा झेंडा फडकवण्यात आंदोलकांना यश आले. मात्र या प्रकरणी बाळासाहेबांना इंग्रज सरकारने अटक केली. हे प्रकरण एवढे गंभीर होते की, बाळासाहेबांना थेट फाशीच होऊ शकली असती, पण सुदैवाने तहसीलदार हरकरे यांनी बाळासाहेबांच्या बाजूने साक्ष दिल्याने ते निर्दोष सुटले. भविष्यात त्यांच्या हातून खूप मोठे कार्य होणार ही कदाचित नियतीचीच इच्छा असावी.

जशपूरनगरमध्ये दाखल
ठक्कर बाप्पांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आवश्यक ते सर्व अधिकार देऊन बाळासाहेबांना मागास घटक विकास योजनेचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून जशपूरनगर भागात पाठवण्यात आले. ही घटना साधारण १९४८ सालची. योगायोग कसा असतो ते पहा. महात्मा गांधीच्या हत्येवरून तत्कालीन केंद्र सरकारने संघावर बंदी घातली होती, त्याच संघाच्या एका स्वयंसेवकाला मध्यप्रदेश सरकारने सरकारी अधिकारी म्हणून विशेष नियुक्तीसाठी एका भागात पाठवले होते ! बाळासाहेबांनी आपली सारी शक्ती पणाला लावून शेकडो शाळा या भागात काढल्या. आतापर्यंत शाळा चालवायच्या म्हणजे फक्त मिशनऱ्यांनी अशीच पद्धत या भागात रूढ होती, पण बाळासाहेबांनी या पद्धतीला छेद देत राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शेकडो शाळा काढून या भागात प्रथमच ‘भारत माता की जय’चा जयघोष शाळाशाळांमधून घुमवला. स्वत: ठक्कर बाप्पांनी त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी जशपूरनगर भागास खास भेट देऊन त्यांच्या कामाची प्रशंसा केली.

तीन, चार वर्षे बाळासाहेबांनी कार्य केल्यानंतर एकूणच सरकारी काम करत असताना येणार्‍या अडचणी त्यांना लक्षात येऊ लागल्या. त्याच काळात या कार्याचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान ठक्कर बाप्पांचेही निधन झाल्यानंतर त्यांना एक पोकळी जाणवू लागली. वनवासी कार्याकडे संवेदनशीलतेने पाहणार्‍या व्यक्ती देखील नंतर कमी झाल्या. त्याचे पर्यवसान बाळासाहेबांनी राजीनामा देण्यात झाले.

‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना
बाळासाहेबांनी जरी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला, तरी हेच कार्य जशपूरमध्येच राहून करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. संघाचे तत्कालीन सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरूजी यांनी देखील बाळासाहेबांना हेच कार्य पुढे चालू ठेवण्यास सांगितले. त्यातूनच २६ डिसेंबर १९५२ या दिवशी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या आजच्या घडीला असलेल्या वनवासी क्षेत्रातील सर्वात मोठ्या सेवाभावी संस्थेचा जन्म झाला. जशपूरनगर येथेच ८ मुलांच्या छोट्या वसतिगृहाच्या माध्यमातून या कार्याचा आरंभ झाला. अर्थात छोटे वसतिगृह असले तरी देखील ते चालवणे तेवढे सोपे काम नव्हते. मात्र जशपूरनगरचे राजे विजय भूषणसिंह जुदेव कल्याण आश्रमाच्या मदतीला आले. त्यांनी वसतिगृहासाठी जागा देण्यापासून आवश्यक ती सर्व मदत बाळासाहेबांना केली. प.पू.श्रीगुरूजींनी देखील या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन संघाचे खांडवा विभाग प्रचारक श्री. मोरूभाऊ केतकर यांना बाळासाहेबांना सहकार्य करण्यासाठी जशपूरनगरला पाठवले. हे सगळे कार्य आर्थिकदृष्ट्या कसे स्थिर होईल व हे करत असतानाच कार्याचा विस्तार कसा होईल याकडे श्रीगुरूजींनी जातीने लक्ष घातले होते. त्यातूनच हळूहळू या कार्याचा विस्तार होत गेला आणि टप्प्याटप्प्याने हे कार्य जशपूरनगर व्यतिरिक्त बिहार, ओरिसा या प्रांतांमध्ये देखील पसरले.

प्रत्यक्ष कार्य प्रारंभ झाल्यानंतर वनवासी समाजाच्या भीषण समस्या कार्यकर्त्यांच्या ध्यानात येऊ लागल्या. आपल्याच हिंदू समाजाचे, इथल्या गौरवशाली परंपरेचे एक अभिन्न अंग असलेला व याच मातीतील श्रेष्ठ अशा जीवनमूल्यांचे प्राणपणाने जतन करणारा, पण उर्वरित हिंदू समाजाच्या चुकांमुळे उपेक्षेचे जीवन जगत असलेला वनवासी समाज केवळ याच भागात नाही तर संपूर्ण देशभरात पसरलेला असल्याचे लक्षात आले. या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण करून उर्वरित हिंदू समाज बंधुत्त्वाच्या भावनेने लवकरात लवकर त्यांच्याशी समरस झाला नाही, तर देशाच्या अखंडतेपुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतील असे त्यावेळी श्री. बाळासाहेब देशपांडे आणि अन्य कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्याच दरम्यान १९७५ साली देशात अणीबाणी लागू झाली. कल्याण आश्रमावर देखील सरकारने बंदी घातली. बाळासाहेबांसह अनेक कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. १९ महिन्यांच्या कारावासात असताना संघाच्या अनेक धुरिणांनी एकूण देशकाल परिस्थितीवर गहन चिंतन केले. त्यातूनच ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कार्याचा संपूर्ण देशभरात विस्तार करण्याचा निर्णय तत्कालीन सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी घेतला. १९७७ नंतर अनेक प्रांतामध्ये कार्याचा प्रारंभ करण्यात आला. संघाच्या अनेक अनुभवी प्रचारकांना ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या कार्याची जबाबदारी देण्यात आली.

वनवासी कल्याण आश्रमाची हजारो सेवाकार्ये
आजच्या घडीला विचार केला तर वनवासी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार समोर ठेवून अखंडपणे कार्यरत असणारी ‘कल्याण आश्रम’ ही वनवासी क्षेत्रातील एकमेव सामाजिक संघटना आहे असे निर्विवादपणे म्हणता येईल. २० हजारच्या आसपास चालणारे सेवाप्रकल्प, वनवासी समाजाच्या विविध अंगांचा समग्र विचार करणारे १४ विविध आयाम, समर्पित भावनेने कार्य करणारे १००० पूर्णवेळ कार्यकर्ते आणि त्याच मन:स्थितीचे पण आपला व्यवसाय, नोकरी सांभाळून अधिकाधिक वेळ या कार्यासाठी देणारे शब्दश: हजारो कार्यकर्ते हे एक संघटना म्हणून या कार्याचे ढोबळ स्वरूप म्हणता येईल. आपल्या देशातील १२ कोटींपेक्षा अधिक असलेल्या वनवासी समाजाची संख्या लक्षात घेता संघटनेचे हे स्वरूप छोटे वाटत असले तरी या अल्पशा वाटणार्‍या बळावर ‘वनवासी कल्याण आश्रमा’ने संपूर्ण वनवासी क्षेत्रात राष्ट्रीय विचारावर आधारित आपल्या कार्याचे एक मजबूत असे जाळे विणले आहे. एका अर्थाने ‘सेवा’ हा एकमेव आधार घेऊन सुरू झालेल्या कल्याण आश्रमाच्या कामाचा प्रभाव म्हणून एक स्वाभिमानी, धर्मप्रेमी आणि आपला विकास स्वबळावरच करायचा आहे अशा मन:स्थितीतील वनवासी समाज आज खंबीरपणे उभा राहिला आहे.

या साऱ्या कार्यामागे कल्याण आश्रमाचे संस्थापक ‘वनयोगी’ बाळासाहेब देशपांडे यांचे परिश्रम आणि दूरदृष्टीचा खूप मोठा वाटा आहे.

महेश काळे
(लेखक ‘जनजाती कल्याण आश्रम’ या संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते असून अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख