महाराष्ट्रात उत्तर आणि दक्षिण भारताचा सुरेख संगम येथे बघायला मिळतो. हरी आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यात भेद न मानून दोन्ही एकच आहेत असे मानण्यात येते. त्यांच्या एकत्वाची पूजा इथे श्रीविठ्ठल स्वरुपात केली जाते.
संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात याविषयी म्हणतात,
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥
उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
म्हणजेच, हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये. कारण ते दोन्ही एकच आहेत, जसे साखर आणि तिची गोडी. फरक करणार्यांच्या डोळ्याला केवळ एका वेलांटीचा फरक दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखेच आहेत.
श्री विठ्ठलाची उपासना करणारा हा ‘ वारकरी’ संप्रदाय महाराष्ट्रात १२ -१३ व्या शतकात उदयास आला. वैदिक धर्मानुगामी हा संप्रदाय जनमानसात सहज- साध्या भाषेत भक्तीप्रसार करण्याचे काम करत होता. लोकांच्या मनातील भीती, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संतांनी ओव्या, अभंग, भारुड या माध्यमातून प्रबोधन केले. जातीपातीची बंधने दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,
या रे या रे लाहान थोर ।
याति भलते नारीनर ।
करावा विचार ।
न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥
कामी गुंतले रिकामे ।
जपी तपी येथें जमे ।
लाविले दमामे ।
मुक्ता आणि मुमुक्षा ॥२॥
एकंदर शिक्का ।
पाठविला इहलोका ।
आलों म्हणे तुका ।
मी नामाचा धारक ॥३॥
मी कास बळकट करून काळीकाळाशीही लढण्या करिता पाय वाट बळकट केले आहे मी. आहो लहान मोठे भलत्या जातीचे पुरुष स्त्रिया या हो या येथे कोणाचाही विचार करायला नको. आहो येथे कामात गुंतलेले जपी तपी मुक्त झालेले मोक्षाची वाट पाहणारे सगळे या सर्वांना समजण्यासाठी दमामे नौबती लावले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात हरिनामाचा शिक्का या इहलोकामध्ये सरसकट पाठविला आहे आणि हेच सांगण्यासाठी मी नामाचा धारक येथे आलो आहे.
सामान्य लोकांनी आपल्या आयुष्यात या भक्ती मार्गाचा अवलंब करावा तसेच समाजप्रबोधनासाठी त्यांना सोप्या भाषेत समजावे म्हणून संत नामदेवांनी कीर्तन सेवा सुरु केली.
नाचू कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी॥
असे म्हणत जनसामान्यांना शहाणे करण्याचे काम केले.
संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन करण्यासाठी या संप्रदायाने विशेष कार्य केले. आषाढी – कार्तिकीला लांब लांबहून विठ्ठल भक्तांची पंढरपुरापर्यंत जाणारी पायी वारी हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या वारीत सगळेच आपली जात- पंथ विसरून ‘ज्ञानोबा- तुकोबा’ असा नाम गजर करत पुढे जातात. जातीपातीची बंधने गळून पडतात, उरते ती फक्त ‘विठ्ठल भक्ती’.
वारकरी परंपरा ही जातीभेदावरचे खणखणीत उत्तर आहे. पूर्वी जातींनुसार गावामध्ये वस्त्यांची विभागणी होत होती. जी पुढे ही सुरु राहिली त्यातून मने कलुषित झाली. संतांनी या जातीभेदाच्या भिंती पडण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी देखील झाला.
आज २१व्या शतकात मात्र अराजकतावादी समाजकंटक, संतांनी पाडलेल्या या जातीभेदाच्या भिंतींमधल्या विटा गोळा करून स्वतःचा वेगळा महाल उभारू पाहतायेत. या घटना महाराष्ट्रापुरत्या नसून हे समाजकंटक स्वतःच्या स्वार्थासाठी देशभरातील हिंदू समाजाला जातींमध्ये विभाजित करून त्यांच्यात वाद पेटवून देत आहेत. एकाच्या मनात दुसऱ्याविषयी विष पेरले जात आहे. अशावेळी संत विचार पुन्हा एकदा आचरणात आणण्याची गरज आहे. तेव्हाच जातीपातीत विखुरलेला हिंदू समाज पुन्हा एकत्रित येईल. संघटित होऊन परधर्मीयांच्या आक्रमणाला बळी न पडता त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकेल.
आज वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या आजच्या महाराज, महंत, फडकरी यांनी ही जातीभेदाची भिंत फोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी त्यांनी संत विचारांचा प्रसार योग्य पद्धतीने समाजात केला पाहिजे. याची अनेक उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे संजय महाराज पाचपोर.
बुलढाणा जिल्ह्यातील संजय महाराज पाचपोर यांनी समाजातील हे जातीभेद दूर व्हावे या उद्देशाने विविध सेवा उपक्रम सुरु केले आहेत. या उपक्रमातून समाजातील सर्वच स्तरातील हिंदू व्यक्ती एकत्रित येत आहेत. महाराज कीर्तन आणि श्रीराम कथा सांगतात. संतांचे अभंगांचे निरुपण करून समाजातील विविध प्रश्नांवर उत्तरे देतात. व्यसनमुक्ती, पर्यावरण जागृती, शिक्षण प्रसार, आरोग्य विषयक माहिती सांगतात. यामुळे समाजात जागृती वाढत आहे. विविध माया जालात अडकलेल्या तरुणाईला आपल्या मूळ विचारांकडे नेण्याचे काम करतात. भरकटलेल्या तरुणाई समोर भगवान श्रीरामाचा आदर्श ठेवतात.
लहान मुले ही मोबाईलच्या आहारी जात आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरात आई वडील आणि मूल रहातात. मुलांवर संस्कार करण्यासाठी आजी – आजोबा नसतात. यामुळे ते बालपणापासून वेगळ्या वातावरणात रहातात. भारतीय मुल्ये त्यांना माहित नसतात अशावेळी त्यांना आपले भारतीय विचार कळावेत आणि त्यांच्यावर संस्कार व्हावेत या उद्देशाने बालसंस्कार शिबीर घेतले जातात. देशभरात महाराष्ट्रासह ६ राज्यात ही शिबिरे घेतली जातात. दरवर्षी शिबिरांमध्ये २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांवर भारतीय विचारांचे संस्कार केले जातात.
अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘साप्ताहिक महाआरती’. ही आरती विदर्भातील ४ जिल्ह्यात ९५० गावात सुरु आहे. हा उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विभागलेल्या हिंदू समाजाला एकत्रित आणण्याचे काम आहे. यात आठवड्यातील एका दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ जातीभेद विसरून ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र येतात. ग्रामदेवतेसमोर आरती करतात. आरती करण्याचा मान प्रत्येक समाजातील व्यक्तीला दिला जातो, याशिवाय प्रत्येकाला प्रसाद वाटण्याचा मान दिला जातो. यात कुठेही जातीभेद केला जात नाही. प्रत्येक जातीची व्यक्ती सहभागी होते. आनंदाने व उत्साहाने आरती केली जाते. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. गावातील भांडणे कमी झाली यासाशिवाय अनेक गावातील निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या आहेत. हिंदू म्हणून प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या जवळ येत आहेत. गावातील निर्माण झालेल्या एकीमुळे परधर्मीयांकडून ( मुस्लिमांकडून) होणारे त्रास कमी झाले. हिंदू म्हणून एकत्र आल्यामुळे अनेक गावातील धर्मांतर देखील कमी झाले आहे.
ज्यापद्धतीने समर्थ रामदास स्वामींनी ११ मारुतींची स्थापना केली. तिथे भक्ती उपासना आणि बलोपासना एकत्र सुरु केली. यातून हिंदू म्हणून लोक एकत्र आले. भक्ती आणि शक्ती यांचा संगम झाला. शत्रूंवर याचा वचक बसला. असाच प्रयत्न आता संजय महाराज पाचपोर करत आहेत. ते महाआरती सोबतच गावोगावी जाऊन जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे काम करत आहेत.
आतापर्यंत ४५० मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी लागणारा निधी समाजसेवी उपक्रमातून जमवला जातो. सोबतच गावोगावी मंदिर स्वच्छता केली जाते. प्रत्येक गावासाठी एका सदस्याची नेमणूक केली आहे. यामुळे अनेक गावातील मोडकळीस आलेली मंदिरे पुन्हा नव्याने उभी राहण्यास सुरुवात झाली. ज्या मंदिरातील पूजाअर्चा बंद झाल्या असतील त्या पुन्हा सुरु झाल्या. आता आपण बघतो की, अनेक हिंदू मंदिरात जिथे जास्त कोणी जात नाहीत अशा ठिकाणी मुस्लिम जातात आणि नमाजपठण करतात मग नंतर तिथे सामुदायिक नमाज पठण होते. मग ती त्या मंदिरावर ते हक्क सांगू लागतात आणि ती जागा वफ्कच्या ताब्यात घेतली जाते. मंदिर जीर्णोद्धार या उपक्रमामुळे या घातक गोष्टीवर आळा बसत आहे.
गाय ही हिंदू धर्मात देवतेसमान पुजली जाते. मुस्लिमांकडून गाईंची तस्करी केली जाते आणि त्यांची कत्तल केली जाते. याला आळा बसावा म्हणून ६२ गोशाळा सुरु केल्या आहेत.
याशिवाय राम फेरी, हरीनाम सप्ताह संवर्धन या सारख्या सामुहिक उपक्रमांची सुरुवात केली आहे. ज्यातून हिंदू म्हणून सर्व एकत्र येत आहेत. वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्मानुगामी आहे. संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणण्याची ताकद यात आहे. हेच काम सर्व संतानी केले आहे. आता देखील संतांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी याचे अनुकरण करण्याची गरज आहे.
वारकरी संप्रदाय हा केवळ भक्तीचा प्रवाह नाही, तर तो हिंदू समाजाला एकत्र आणणारी एक जिवंत शक्ती आहे. संतांच्या विचारांनी जातीपातीची भिंत नाहीशी झाली, हृदयात समानतेचा दीप प्रज्वलित केला. आजच्या काळात संजय महाराज पाचपोर यांसारख्या व्यक्ती या विचारांची नव्याने मांडणी करत आहेत, त्यांना कृतीत उतरवत आहेत. कीर्तन, कथा, महाआरती, बालसंस्कार शिबिरे, मंदिर जीर्णोद्धार, गोसेवा यांसारख्या उपक्रमांमुळे समाजात नवचैतन्य निर्माण होत आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी केवळ महाराज, महंत नव्हे तर प्रत्येक सजग नागरिकाने आपली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. संतांचा विचार हेच आपल्या समाजाचे रीतीनिती, नीति-धैर्य आणि एकात्मतेचे अधिष्ठान आहे. या संतपरंपरेच्या प्रकाशातच हिंदू समाज पुन्हा एकसंघ, सशक्त आणि सजग होईल, यात शंका नाही.
स्वामिनी मोरे