Saturday, June 21, 2025

वारीवरील आक्रमण

Share

वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक जीवनवाहिनी आहे. पांडुरंगाच्या चरणांशी जोडलेला हा प्रवास, समाजात समतेचा, सेवा-भावाचा आणि संयमाचा प्रसार करणारा आहे. पण हीच वारी आज ‘अर्बन नक्षलवादी’ गटाचे लक्ष ठरते आहे.

विचारवंतांच्या नावाखाली, कलाकारांच्या गाण्यांमध्ये, आणि सामाजिक आंदोलकांच्या घोषणांमध्ये  ही मंडळी वारीचा उपयोग लोकमत निर्माण करण्यासाठी, सरकारविरोधात भडकावण्यासाठी आणि पारंपरिक श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठी करत आहेत.

संत परंपरेचा गाभा हा “संघर्ष” नव्हे, तर “समरसता” आहे. ‘विठोबा’ केवळ मूर्तीत नाहीत तर अंतःकरणातील चैतन्यात आहेत. अभंग हे फक्त शब्दसंगती नव्हे, ते आत्मोद्धाराचं माध्यम आहे.

आज या परंपरेवर फक्त शाब्दिक नव्हे, तर वैचारिक हल्ले होत आहेत. याला उत्तर द्यायचं असेल, तर संतांच्या शिकवणीचे पुनुरूज्जीवन होणे आवश्यक आहे. स्मारकं उभारणं पुरेसं नाही. त्यांचा विचार कृतीत उतरवणं यानेच खरी ‘वारी’ होईल.

डफली-तुणतुणं घेऊन, अभंगांचा सूर लावून, समता आणि क्रांतीच्या घोषणांमध्ये लपवून या मंडळींकडून वारकरी परंपरेचे आणि संत विचारांचे बौद्धिक अपहरण केले जात आहे. हे केवळ अभंगाच्या ओळींचं विकृतीकरण नाही, तर ती वारकरी संप्रदाय संपवण्याची एकत्री मोहीम आहे. ही विचारधारा स्वतःला ‘बौद्धिक’, ‘प्रगत’, आणि ‘क्रांतिकारी’ म्हणून मिरवते, पण प्रत्यक्षात भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राष्ट्रीय एकतेच्या मुळावर घाव घालणाऱ्या शक्तींचा बौद्धिक मुखवटा आहे. या विचारसरणीचा पाया ‘विभाजन’ आणि ‘असंतोष’ या दोन तत्त्वांवर उभा आहे. 

संतांचे अभंग, भक्तीपरंपरेची भाषा, लोकवाद्यांचा वापर हे सगळं त्यांच्यासाठी समाजमनावर प्रभाव टाकण्याची केवळ साधनं आहेत. भक्तीचे हे अस्त्र त्यांनी जातीद्वेषाच्या रणांगणात परावर्तित केलं आहे. पण हे नक्षलवादी संतांच्या त्या वाणीतून निवडक ओळी घेऊन काही मंडळी “ब्राह्मणवादविरोधी संघर्ष”, “सामाजिक क्रांती” अशा चौकटी लावून संतांचा उपयोग केवळ जातीय ध्रुवीकरणासाठी करत आहेत. मुळात यांचा वारकरी संप्रदाय आणि वारीबद्दल वरवरची माहिती आहे. 

संतविचार म्हणजे संघर्ष नव्हे, तो समरसतेचा आरंभ आहे. चोखोबांपासून तुकोबांपर्यंत सर्वच संतांनी समाज जोडणारे विचार दिले. त्यांनी धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या भेदांवर करूणा, भक्ती आणि समतेने उत्तर दिलं. “हरिपाठ” करणाऱ्या वारकऱ्यांनी कधीही समाज फोडण्याचा प्रयत्न केला नाही उलट, त्यांनी सर्वांमध्ये “विठोबा” पाहण्याची दृष्टी दिली. म्हणूनच तर वारीत वय , जात-पात, लिंग काहीच न बघता सर्व जण एकमेकांच्या पाया पडतात.

हे अर्बन नक्षलवादी आज या वारीच्या मूळ विचारांपासून नवीन पिढीला दूर नेण्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळेच आज “तुकाराम-नामदेव” म्हणताना फक्त एकाच नावाचा गजर होताना दिसून येत आहे. “ज्ञानोबा माऊली” यांचा उल्लेख हळूहळू गाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. संत हे जणू काही केवळ ‘ब्राह्मणशाहीविरोधी योद्धे’ होते असा अपप्रचार होतो. यात आ.ह. साळुंखे, भालचंद्र नेमाडे, सचिन माळी आणि शीतल साठे (कबीर कला मंच) असे अनेक कथाकथित “विचारवंत” कार्य करतात. 

या सर्व समाज विघातक दुष्पप्रवृत्तींना ठेचण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी 
मऊ मेनाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठीं देऊं माथां ॥२॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥
तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥

या अभंगात आम्ही विष्णुदास मेणाहूनही मऊ नम्र शीतल शांत आहोत.तसेच आम्ही कठीण आहोत की दगडासही भेदू.आम्ही देह बुद्धीने मरून सुद्धा आत्मस्तीतीने जागे आहोत.आम्हाला जो जो जे जे मागेल आम्ही त्याला ते ते देऊ.आमची नेसलेली वस्त्रे सुद्धा आम्ही त्याला देऊ,पण जर एखादा नाठाळ असेल तर आम्ही मात्र त्याच्या डोक्यात कठी घालू.आई वडील माया करतात त्या पेक्षाही आम्ही मायाळू आहोत,पण शत्रू पेक्षाहि घात पात करू.अमृतापेक्षाही आम्ही गोड आहोत आणि विष पेक्षाही आम्ही कडू आहोत.तुकाराम महाराज म्हणतात आम्ही अवघे सगळेच गोड आहोत. पण ज्याच्या त्याच्या पद्धती प्रमाणे आम्ही त्याचे लाड पुरवितो. सांगितलेल्या अभंगाप्रमाणे कार्य करण्याची गरज आहे. 

अन्य लेख

संबंधित लेख