सिंधुदुर्गनगरी: सततच्या पावसामुळे सिंधुदुर्गातील शहरी आणि ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे (Nitesh ane) यांनी दिले आहेत. तसेच, पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बॅकेचे अध्यक्ष मनीष दळवी, पी.एम. विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले की, गणेशोत्सवासाठी अनेक ठिकाणांहून चाकरमानी जिल्ह्यात येत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य असल्याने जिल्ह्याच्या प्रवेशाच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकांवर आरोग्य पथकांची नेमणूक करा. पावसाळा लक्षात घेता साथीचे आजार निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्या. औषधसाठा कमी पडणार नाही याची काळजी घ्या. जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे ही गंभीर समस्या बनली आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. यासह राज्य महामार्ग, जिल्हा परीषद अखत्यारीतील रस्त्यांची डागडूजी आणि दुरूस्तीची कामे 25 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा. दुरूस्तीचे काम करत असताना प्राधान्य क्रम ठरवून कामे पूर्ण करा असेही ते म्हणाले.