नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून खारघरमध्ये आयोजित होणाऱ्या भव्य सोहळ्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व नियोजन समित्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच यशस्वीपणे संपन्न झाली.
२० लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित
खारघरमधील सेक्टर २९ येथील ओवे मैदानावर सुमारे ६२ एकर विस्तीर्ण परिसरात हा सोहळा पार पडणार आहे. या समागमासाठी देशभरातून २० लाख हून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रचंड जनसमुदायाचे व्यवस्थापन करण्यासाठी नियोजन बैठकीत सुरक्षा, लंगर सेवा, वैद्यकीय शिबिर, प्रदर्शन क्षेत्र आणि भाविकांच्या निवास-वाहतुकीच्या सोयींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रत्येक विभागावर जबाबदारी सोपवली
बैठकीत सोहळ्याची संपूर्ण रूपरेखा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक विभागाला त्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थितपणे हा कार्यक्रम पूर्ण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. हा समागम केवळ एक कार्यक्रम नसून शहादत, सेवा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा ऐतिहासिक संगम असेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.
कार्यक्रमाचा तपशील
स्थान: ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई.
दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६.
वेळ: सकाळी ८:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत.
आयोजक समितीने सर्व भाविकांना या पवित्र सोहळ्याचा हिस्सा होण्याचे आवाहन केले आहे.