दोन दिवसापूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हरियाणातील काही शाळांवरचा एक विस्तृत ब्लॉग वाचायला मिळाला, जिथे बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकही विद्यार्थी पास झाला नाही. हा लेख वाचताना माझ्या मनात दोन जुन्या, पण आजही तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आठवणी जागृत झाल्या. त्या आठवणींनी मला हे शब्दबद्ध करण्यास भाग पाडले. ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे पण, काही गोष्टी स्मृतीतून कधीच पुसल्या जात नाहीत.
गेली अनेक वर्षे, कामाच्या निमित्ताने राज्यभर जाणे होते. माझी भूमिका एका मूक दर्शकाची किंवा साक्षीदाराची असली तरी, मेंदू अनेक गोष्टींची नोंद घेत राहतो आणि त्या कधीतरी डोकं वर काढून मनाचा तळ ढवळून काढतात. हरियाणातील शाळांमधील शिक्षक आणि अन्य सोयींच्या अनुपलब्धतेबद्दल सविस्तर माहिती वाचल्यानंतर मला माझ्या महाराष्ट्रातील, माझे हे अनुभव मांडावेसे वाटले.
“कलेक्टर बिलेक्टर होऊन जायचे ना?”
असा एकदा माझा साधारणतः दोन दिवसांचा मुक्काम अजिंठा लेण्याजवळच्या MTDC विश्रामगृहात होता. रात्री जवळच्याच एका धाब्यावर जेवण करायला आम्ही जात असू. जो एक मध्यमवयीन मावशी आई-वडिलांच्या मदतीने चालवत असत. त्यांना एक मुलगा होता. त्यांची पहिली भेट झाली तेव्हा तो मुलगा B.Sc. च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याचे कॉलेज लांब दुसऱ्या गावात होते. मी सहज विचारले, “सगळा दिवस लेक्चर आणि प्रॅक्टिकलमध्येच जात असणार?” त्यावर तो सहज म्हणाला, “रोज काय जायला लागत नाही, परीक्षेआधी थोड्या दिवसात प्रॅक्टिकल करतो नि पास होतो.” प्रॅक्टिकलसाठी विषयाचा अभ्यास करणे त्याच्या गावीही नव्हते. “प्रमुख विषय काय आहे?” असे विचारल्यावर तो म्हणाला, “केमिस्ट्री.” त्याला ‘केमिस्ट्री’ हे ‘केमिस्ट्री’ आहे हेच कळत नव्हते! अज्ञानातच सुख असतं ते हे असं. यावर काय बोलावे कळेना म्हणून मी विषय बदलला.
पुढच्या वेळी भेट झाली तेव्हा तो शेवटच्या वर्षाला होता. “पुढे काय करणार?” असे विचारल्यावर तो म्हणाला, “शिकणार पुढे, M.Sc. करणार.” (अर्थात, केमिस्ट्रीमध्येच). “त्यापुढे?” यावर तो काहीशा सहजपणे आणि काहीशा बेफिकिरीने म्हणाला, “मग काय कलेक्टर बिलेक्टर होऊन जायचे कुठेतरी ना?” आता मलाच सुचेना काय बोलावे ते. मावशी आपल्या मुलाच्या भविष्याच्या कल्पनेत आनंदाने आणि अभिमानाने रमल्या होत्या. मी पुन्हा निरुत्तर होऊन पाहात राहिले.
पुढे काही काळ शासकीय नोकरीचे स्वप्न पाहण्यात गेला. मग तो एक-दोनदा मी गेलेले असताना दिसला नाही, तेव्हा कळले की, तो गुजरातला कामाच्या शोधात गेला होता. पण मनासारखे काम न मिळाल्याने परत आला. आता तो एका शाळेत सेवक म्हणून काम करतो. शासकीय पगार मिळत नसला तरी आपण फार महत्त्वाचे काम करतो, असा आविर्भाव मात्र असतो. यथावकाश त्याचे लग्न झाले, आता त्याला एक लहान मुलगीही आहे. आजही त्याला पटापट हिशोब करता येत नाही, पण जेमतेम शाळेचे तोंड पाहिलेली त्याची आई मात्र चटकन आणि बिनचूक हिशोब करते.
‘शिक्षण’ की केवळ ‘निकाल’?
दुसरा प्रसंग, जळगाव जिल्ह्यातला. एका लहानशा गावात सगळ्यांनी एकत्र येऊन एक हायस्कूल काढले आहे, आजूबाजूच्या मुलांना लांब जावे लागू नये म्हणून. (जवळजवळ बऱ्याच शाळा याच कारणाने परवानगी मिळवतात). मी या शाळेत नेहमी जात असल्याने, मुलांशी त्यांच्या करिअरबद्दल बोलायला यावे, असा शाळेचा आग्रह होता. माझ्या मनात शिक्षक असूनही धाकधूक होती. ग्रामीण भागातील मुलांशी कसा संवाद साधावा याचा अंदाज येत नव्हता, मी स्वतः शिक्षक असूनही ही परिस्थिती. त्या मुलांचा कल, अपेक्षा किंवा भविष्याबद्दलची स्वप्ने कशाचीच माहिती नव्हती. पण तो अनुभव कायमचा मनावर कोरला गेला.
गावकऱ्यांनी शाळेची इमारत बांधली होती खरी, पण काम पूर्ण झाले नव्हते. टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होईल तसे बांधायचे नियोजन होते. जिथे दहावीच्या मुलांशी चर्चा होणार होती, त्या एकाच वर्गात फरशी बसवली होती. बाकीच्या वर्गात फक्त सिमेंटचे काम झाले होते. जिन्याच्या बाजूला कठडा देखील नव्हता.
मुलांनी बोलते व्हावे म्हणून मी हरप्रकारे प्रयत्न केले. त्यांच्या शांत व स्थिर नजरा काही केल्या बदलल्या नाहीत. वयाला न शोभणाऱ्या लहान चणीच्या आणि मूक असलेल्या त्या मुलांपर्यंत कसे पोहोचावे हा मोठा प्रश्न होता. माझ्यासारख्या अनुभवी शिक्षकाची देखील कसोटीच होती ती. फार यश मिळाले नाही. यावेळचा संवाद हे एक प्रकारचे स्वगतच ठरले. त्यांच्या मनापर्यंत पोहोचू न शकल्याची खंत आजही मला अस्वस्थ करते. एका अर्थाने ते गर्वहरणच होते.
यानंतर सगळे शिक्षक खोलीत गेलो. तिथे एक थोडे लांबट आयताकृती टेबल होते. शास्त्र शिक्षकाने मोठ्या उत्साहाने सांगितले की, प्रयोग परीक्षेसाठी बाहेरून शिक्षक येतात तेव्हा इथे प्रयोग लावले जातात आणि परिक्षा पार पडते. शेजारीच एका कपाटात शास्त्र प्रयोगाचे काचेचे सामान दिसले. मग प्रयोगशाळा कुठे आहे, हा प्रश्न मनातच विरला. हिंमतच नाही झाली विचारायची. पलीकडे एक अरुंद जागा होती, काचेने बंद केलेली. त्याच्या आतमध्ये दोन कॉम्प्युटर होते, पण ते वापरले गेल्याचे चिन्ह दिसत नव्हते. लक्षात आले की, ही कॉम्प्युटर लॅब आहे. खात्री करायचे धाडस नाही झाले. संगणक शिक्षकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मान्यताप्राप्त होते, अर्थात गुणवत्ताधारक होते. शासकीय वेतनश्रेणीवर होतेच. “आमचे शिक्षण विभागाचे संबंध चांगले आहेत,” मुख्याध्यापक काहीशा अभिमानाने म्हणाले. दहावीचा निकाल ९५% पेक्षा जास्त होता. “एक मुलगा संगणकात नापास झाला म्हणून १००% नाही लागू शकला,” काहीसे खांदे उडवत व जबाबदारी झटकत शिक्षक म्हणाले. मी स्तिमित झाले.
जवळजवळ तीन तासानंतर गावातील प्रतिष्ठित कुटुंबियांना भेटायला निघालो, तशी चपळाईने सर्व शिक्षकवर्ग दोन चारचाकी गाड्यांत बसले. सगळ्यांच्याच गाड्या होत्या. वर्ग मोकळे आहेत याचे भान असण्याचे कारणच नव्हते. मी पूर्ण हरवले, खरंच फार ताण आला, अर्थपूर्ण संवाद व्हावा म्हणून शब्द शोधता सापडेनासे झाले.
नंतर एक-दोन वर्षांनी त्याच रस्त्याने जाताना एक नवी इमारत पाहायला मिळाली. अशा सगळ्या शाळांची नावे लॉर्ड गणेशा किंवा लॉर्ड रामा या धर्तीवर होती. आता याच शाळांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. आसपासच्या प्रतिष्ठित कुटुंबाची मुले इथे शिकतात. इयत्ता न सांगता ‘स्टँडर्ड’ शब्द वापरतात. मात्र इंग्रजी माध्यमात शिकतानाही ती भाषा बोलल्याचे आढळत नाही. पालकांना मात्र उदंड उत्साह आणि अभिमान वाटतो.
गंभीर प्रश्न आणि भविष्याचा वेध
हे सगळे वाचून आणि आठवून एक प्रश्न मनात उभा राहिला, तो इतक्यावर्षांनंतरही अनुत्तरितच आहे. या अशा संस्थांमधून मुले पास तरी कशी होतात? मुलांची नैसर्गिक गुणवत्ता त्यांना तारते ? की इन्स्पेक्शन, मान्यता, वार्षिक मूल्यमापन अशा अनेक प्रणाली असूनही परिस्थितीत अजूनही बदल दिसत नाही?
याचे मूल्यमापन करणे आणि योग्य दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. माझ्या मते सर्व प्रणाली आणि व्यवस्था पडताळून पाहणे आणि त्यांची घडी नीट बसविण्याची गरज आहे. हे करत असताना शिक्षण व्यवस्था ही पहिल्या क्रमाकांवर घेण्याची गरज आहे कारण पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आपली आहे.
- विद्या देशपांडे