Saturday, September 21, 2024

स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन

Share

मराठ्यांचा सेनापती अण्णासाहेब पाटील
महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी पुरुषांची तथा समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणा-या महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीने आपल्या देशाला देश, देव, धर्म रक्षणासाठी लढणा-या वीर पुरुषांच्या काळानुरुप मालिका निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या थोर परंपरेमध्ये अजरामर राहिलेले व सामान्य माणसांच्या मनात कायम कोरलेलं नांव म्हणजे मराठ्यांचे सेनापती अण्णासाहेब पाटील हे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीत राहणारा आणि मातीच्या रक्षणासाठी लढणारा व महाराष्ट्राच्या वैभवासाठी संघर्ष करणारा प्रत्येक माणूस मराठा आहे, अशी विशाल व साधी सोपी संकल्पना अण्णासाहेब पाटील यांनी मांडली होती. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड, बारा बलुतेदार हिंदूना मराठा या विशाल संकल्पनेत भगव्या घ्वजाखाली एकत्र आणले होते, त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असणारी मराठ्यांची व्याख्या करुन देश, देव,धर्मची प्रतिबध्दता व्यक्त केली. शिवरायांच्या कल्पनेतील मराठा शब्दाला अनुसरुन त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली होती म्हणूनच अण्णासाहेब पाटील यांना मराठ्यांचा खरा सेनापतीसुध्दा म्हटले जाते. अण्णासाहेब पाटील यांचा जन्म दि.25 सप्टेंबर, 1933 रोजी पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे येथे शेतकरी कुटुंबात झाला आणि शिक्षण सांगली येथे झाले, त्यांना सामाजिक कार्य करण्याची जन्मजात आवड असल्याने शिक्षण आटोपून ते मुंबई येथे स्थायिक झाले. तेंव्हा कामगारांची अवस्था बिकट होती, न्याय मिळत नव्हता म्हणून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी माथाडी कामगार संघटना स्थापन केली. पुढे तर विधान परिषदेचे सदस्य सुध्दा होते.

माथाडी कामगार संघटनेची स्थापना.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अण्णासहोब पाटील आपलं शिक्षण अपूर्ण सोडून मुंबईमध्ये दाखल झाले, तेंव्हा कामगारांची अवस्था अत्यंत बिकट होती, श्रममुल्य सुध्दा मिळत नव्हते. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी विखुरलेल्या कष्टकरी कामगारांना एकत्र करुन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढा उभारला. माथाडी कामगार संघटना उभी केली. कामगारांना पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, हक्क व सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी लढा उभा केला. सरकार दरबारी कष्टकरी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या हक्कासाठी जीवाचे रान केले. अण्णासाहेब पाटील यांचा जनरेटा इतका प्रभावी होता की, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करुन माथाडी कामगार संघटनेला शासकिय दर्जा प्राप्त करुन दिला आणि दि.05 जून, 1969 रोजी महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे माथाडी कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागले. माथाडी कामगार कायद्याबरोबरच नवीमुंबईमध्ये माथाडी हॉस्पीटल, माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटी, सिडकोमार्फत घरे, उच्च शिक्षण, वैद्यकियसेवा अशा माथाडी कामगारांसाठी कल्याणकारी योजना का असू नयेत? यास्तव अण्णासाहेब पाटील यांनी अशा त-हेच्या माथाडी कामगार कल्याणकारी संस्था निर्माण केल्या. अशा विविध सुविधांमुळे कामगार व त्यांच्या परिवारांचे जीवनमान उंचावले गेले आहे आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच माथाडी कामगार क्षेत्रात अण्णासाहेब पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे.

मराठा आरक्षण मागणीच्या मोर्चाचे जनक अण्णासाहेब पाटील.
अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी प्रचंड कष्ट घेतले होते, त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्रात उभी झाली होती. शिवरायांना अपेक्षित असणा-या बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकत्र करुन मराठ्यांचे संघटन उभे राहावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधील लहान मोठ्या संस्था, संघटना, गणेशोत्सव मंडळे यांना भगव्या ध्वजाखाली एकत्र आणून अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापन केली. मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आधारीत आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरु लागली तेंव्हा त्यांनी संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन मराठा आरक्षण,आर्थिक निकषांवर मिळावे म्हणून मुंबईत विधानभवना वर मोर्चा काढण्याचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे अण्णासाहेब पाटील व ऍड.शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात आझाद मैदान, मुंबई येथून शिवरायांचा भगवा हातामध्ये घेऊन दि.२२ मार्च, १९८२ रोजी मोर्चा विधानभवनावर धडकला. कोणतीही राजकिय रसद न घेता भगवे झेंडे फडकवत असलेला विरोट मोर्चातील जनसमुदाय मुंबईकरांचे लक्ष वधून घेत होता.अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्यांचे निवेदन सादर केले होते. आरक्षण मागणीचा विचार होणार नाही हे लक्षात येताच मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास आपण उद्याचा सूर्योदय पाहणार नाही असे ठणकावून सांगणा-या अण्णासाहेब पाटील यांनी दि.२३ मार्च, १९८२ रोजी आपली जीवन यात्रा संपवून या जगाचा कायमचा निरोप घेतला

हिंदुत्वाची प्रतिबध्दता.
विधान परिषदेचे आमदार असलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी शिवरायांचा भगवा ध्वज हातामध्ये घेऊन “चलो विधाभवन” ची गर्जना केली होती, दि. २२ मार्च, १९८२ रोजी आपल्या नऊ मागण्याचे निवेदन घेऊन विधान भवनावर विशाल मोर्चा काढला होता. आपल्या नऊ मागण्यांमध्ये त्यांची हिंदुत्वनिष्ट विचारांची प्रतिबध्दता दिसून येत त्यांनी आपल्य मागण्यांमध्ये आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणसह देशाला सतत भेडसावणा-या समस्यांवर उपाय शोधणा-या पुढील मागण्या सुध्दा केल्या होत्या. (१) समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा, (२) धर्मांतरावर बंदी घाला, (३) भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा. अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईमध्ये काढलेल्या मोर्चामध्ये उपरोक्त तीन मागण्यां करुन त्यांनी आपली देश, देव, धर्म यासाठी लढणारी किंवा हिंदूत्वासाठी संघर्ष करण्याची प्रतिबध्दता व्यक्त केली होती. स्वामी विवेकानंद यांनी धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण म्हटले आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आमिष दाखवून होत असलेल्या बाटवाबाटवीच्या विरोधात होते. तसेच धर्मनिरपेक्ष देशात समान नागरी कायदा का नाही? भिवंडी कल्याणमध्ये शिवद्रोही जमातीने शिवजयंती उत्सव मिरवणुकांवर हल्ले करुन शिवजयंती उत्सव बंद पाडले होते, त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय समास्यांवर सामान्य माणसाचे तथा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला होता. अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा विचार केल्यास किंवा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी संघर्ष करण्यात खर्ची झालेलं असून, ख-या अर्थाने ते मराठ्यांचे खरे सेनापती ठरतात तसेच त्यांचा माथाडी कामगार संघटना स्थापनेपासून विधा परिषदेचे सदस्य असा खडतर प्रवास महाराष्ट्रामधील प्रत्येक माणसाला प्रेरणा देणार आहे.अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंती दिनानिमित्त मराठ्यांचा खरा सेनापती असलेल्या अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन.

पोपटराव उपाख्य नानासाहेब देशमुख
मुंबई

अन्य लेख

संबंधित लेख