मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत मिळतील आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवता येतील. आजच्या डिजिटल युगात आरोग्य व्यवस्थेचे डिजिटायझेशन आणि एआय आधारित उपाययोजना अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग, आरोग्य सेवांचा समीक्षा अहवाल, आरोग्य हेल्पलाईन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, तसेच सेवा गुणवत्तेचे नियमित रिव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे नागरिकांचा आरोग्य सेवांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.
या सर्व बाबींवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून दीर्घकालीन सुधारणा करण्यावर शासनाचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.