Tuesday, September 17, 2024

“पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका

Share

मुंबई : पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे,हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) केली आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्या प्रकरणी अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात ट्विट करत निशाणा साधला होता. त्यानंतर आता यावर चित्रा वाघ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, “१०० कोटींची वसुली, मनसुख हिरेनची हत्या, लादेन उर्फ वाझे, हेही तेव्हा तुम्ही तथ्यहिनच म्हणाला होतात ना? राज्यात गुंतवणूकच येऊ नये म्हणून उद्योगपतींच्या घरांसमोर स्फोटके पेरण्याचे काम कोण करीत होते? हे विकृत आणि घाणेरडे राजकारण कोण करीत होते? थेट महाराष्ट्राच्या अस्मितेशी गद्दारी कोण करीत होते,” असा प्रश्न त्यांनी केला.
 
त्या पुढे म्हणाल्या की, “पापं करायची आणि काही झाले की, आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे. निवडणुकीत दोन हात होऊनच जाऊ द्या. यंदा जनता तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही,” असा सूचक इशाराही चित्रा वाघ यांनी अनिल देशमुखांना दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख