Saturday, October 19, 2024

संविधानाच्या हितासाठी राजकीय हिंदूत्व प्रबळ हवे – माजी खासदार प्रदिप रावत

Share

हुतात्मा श्रीकांत लिंगायत यांना अभिवादन

पुणे, दिनांक ५ ऑक्टोबर : “हिंदू बहुसंख्य आहेत तो पर्यंतच संविधान सुरक्षित आहे. संविधानाच्या रक्षणासाठी राजकीय हिंदुत्व प्रबळ असायला हवे. कारण तेंव्हाच सांस्कृतिक हिदुत्वाला बहर येतो”, असे प्रतिपादन माजी खासदार आणि ज्येष्ठ अभ्यासक प्रदिप रावत यांनी व्यक्त केले.

डेक्कन कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात आयोजित हुतात्मा श्रीकांत लिंगायत जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक आणि व्याख्याते भरत आमदापुरे, श्रीकांत लिंगायत यांचे बंधू चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते. संविधान रक्षणासाठी आणिबाणी विरोधात सत्याग्रह केला, म्हणून श्रीकांत लिंगायत यांना १९ महिने तुरूंगवास झाला होता. त्यांची पुण्यातील लष्कर भागात १९८२ मध्ये धर्मांध जिहाद्यांकडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त लोकशाही समोरील आव्हानांची जागृती करण्यात आली. हुतात्मा श्रीकांत लिंगायत स्मृती समिती, कै.श्रीकांत लिंगायत मेमोरियल ट्रस्ट, विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. .

संविधान रक्षणासाठी हिंदूंना शत्रुबोध आवश्यक असल्याचे स्पष्ट मत रावत यांनी मांडले. ते म्हणाले,”राजकीय हिंदूत्वात त्रुटी जरी असल्या तरी, त्या दूर करून देशाच्या हितासाठी ते आत्मसात करायला हवे. कारण हिंदू टिकला तरच संविधान टिकेल.”

हिंदू-मुस्लीम असा प्रश्न नसून तो फक्त मुस्लीम प्रश्न असल्याची सडेतोड भूमिका रावत यांनी घेतली. ते म्हणाले, शांततापूर्ण सहअस्तित्व इस्लामला शक्य नाही. हा केवळ आत्ताचा नाही, तर त्याच्या जन्मापासूनचा इतिहास आहे. म्हणून छत्रपती शिवरायांनी एक हजार वर्षाच्या धर्मांध इस्लामी सत्तेचा पाया उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. एक हजार वर्षाच्या अन्याय-अत्याचारात मरण पावलेल्या राष्ट्रीय पित्रांचा दिन आपण आणला पाहिजे. इस्लामला हिंदूंच्या नाही तर इस्लामच्या नजरेतून पाहायला हवे. इस्लाम रक्त बंधुत्व नाही. तर धर्मबंधुत्व मानतो. म्हणूनच ते धर्म म्हणून मतदान करतात. जातीपातीत विभागलेल्या हिंदूंनीही याचा विचार करायला हवा. संविधानाच्या रक्षणासाठी हिंदू म्हणून मतदान करायला हवे.”

संविधान, लोकशाही मुल्यावर निष्ठा ठेवणे जिहाद्यांना मान्य नाही. कुराण आधी की संविधान असा प्रश्न धर्मांध इस्लामच्या अनुयायांना विचारायला हवे, असा रोखठोक सवाल आमदापुरे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले,”हिंदू समाज आज राजकीयदृष्ट्या जागृत झाला असला तरी प्रश्न सुटलेला नाही. केवळ राजकीय परिवर्तन पुरेसे नसून, समाजाचा मानस बदलायला हवा.” सूत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले. आभार महेश पवळे यांनी मानले.

लिंगायत २०० टक्के हिंदूच
शंकराचा पुजारी असलेले लिंगायत तेंव्हाही हिंदू होते आणि भविष्यातही राहतील, असे परखड मत चंद्रकांत लिंगायत यांनी मांडले. ते म्हणाले, हिंदू समाज तोडून जातीपातीत वाद घालण्याचे काम काही लोक करत आहे. लिंगायत समाज हा २०० टक्के हिंदू असून, हिंदू धर्म आणि संविधानाच्या रक्षणासाठी त्याने रक्त सांडले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख