साहित्य समाजाचा आरसा आहे. त्यातून समाजात सुरु असणाऱ्या घडामोडींचे चित्र उमटत असते. संतांनी अभंग, ओवी , भारुड यातून केवळ भक्ती भावनेचा प्रसार केला, नाही तर त्यासोबत समाजात सुरु असलेल्या घटनांची देखील माहिती दिली. एका अर्थाने संतसाहित्य ऐतिहासिक दस्ताऐवज आहेत. या साहित्याकडे या दृष्टीने बघणे देखील आवश्यक आहे.
यादवांच्या राज्यात ११८९ ते १३१८ या कालखंडातील संतचळवळीची खरी पार्श्वभूमी तयार झाली. वास्तविक पाहता यादवांचे राज्य हे न्यायसंपन्न आणि कलागुणांना वाव देणारे होते. ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात रामदेवराव यादव राजाबद्दल पुढील ओवी आढळते :-
‘तेथ यदुवंशविलासु । सकळकळानिवासु । न्यायाते पोषी क्षितीशु । श्रीरामचंदु ।।”
वरील ओवीवरून यादव वंशातील रामदेवराव राजा न्यायी, सकलकलांनी युक्त व यादववंशाला ललामभूत असा होता, असे दिसते, अखेरचा काळ वगळता यादवांच्या राज्यात सुबत्ता होती. ‘यादवांचा कीर्तिसूर्य आपल्या तेजाने तळपत होता. पंरतु इस्लामी अक्रमणांपुढे यादव टिकू शकले नाही.
पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य येईपर्यंत महाराष्ट्रावर इस्लामी राज्यकर्त्यांचे राज्य राहीले. यादवांचा र्हासकाळ हा संतचळवळीचा प्रारंभकाळ म्हटला जातो. इस्लामी अक्रमकांचा सुरवातीचा काळ अस्थिरतेचा होता. हिंदुच्या मंदिरातील मूर्त्या फोडणे, देवळे पाडून मशिदी बांधणे, हिंदुच्या पाठशाळा पाडणे, जिझिया लावणे, युध्दात पकडलेल्या स्त्रियांना जनानखान्यात घालणे, गौ-हत्या करणे, सक्तीचे धर्मांतरण असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते.
इस्लामी अत्याचाराप्रणाने भौगोलिक परिस्थितीने गांजलेला समाज ईश्वरास शरण येऊ लागले आणि संकटातून मार्ग दाखवणारे म्हणून संताकडे बघू लागला. अल्लाउद्दीन खिलजीच्या रूपाने महाराष्ट्रावर कोसळलेले आक्रमण, उत्तरेकडील इस्लामी अक्रमणाचे भयंकर स्वरूप हा हिंदू धर्माला बसलेला मोठा धक्का होता. अवतीभोवती असलेली परिस्थिती, अशा वेळी ज्ञानहिन आणि गोंधळून गेलेल्या समाजास संतानी आपल्या उपदेशातुन मार्ग दाखवला.
प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संतापुढे जातीभेदाप्रमाणेच हिंदु धर्मावर काळ होऊन आलेल्या इस्लामचेही अव्हान होते. या अव्हानाला संत संयमाने व वीरवृत्तीचा जागर करत सामोरे गेले.
समाजात चैत्यन निर्माण करून या प्रवृत्तीचा सामना कसा कराव ते ही शिकवले.
या परिस्थितीचे वर्णन समर्थ दासबोध करतात….
म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुतां दिसांचे माजले बंड । या कारण अखंड । सावधान असावे ॥
धर्म स्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ॥
जाते आहेत पुढें होणार ।देणे ईश्वराचे ॥
मुर्ती भजन,व मंदिरे फोडणे या परिस्थितीचा उल्लेख करतानी संत नामदेव म्हणतात.. (नामदेव गाथा – १६३०)
देव दगडाचा भक्त हा मायेचा । संदेह दोघांचा फिटे कैसा ॥
ऐसे देव तेही फोडीले तुरकी। घातले उदकी बोभातीना॥
समर्थ रामदास स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या स्थितीवर म्हणतात….
“किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टविल्या ।
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या ।
किती शामुखी जाहजी फाकविल्या ।
किती येक देशांतरि त्या विकील्या ।
किती येक त्या विख खाऊनी मेल्या ।
किती सुंदरा हाल होऊनि मेल्या ।”
– (रामदास स्फुट प्रकरण)
राजे-रजवाडे देखील या अक्रमणाच्या अत्याचाराला कसे बळी पडले,हि स्थिती संत नामदेव महाराज सांगतात…
राजे भ्रष्ट यवन जाले । ठायी ठायी दोष घडले ।
मग इही अवतार घेतले । कलिदोष हरावया ।
नामा म्हगें पुढे हे जन । यवनसंसर्गे कठिण ।
होतां, गातां हरिचे गुण । ते उदरती सर्वथा ।।”
-(श्री नामदेवगाथा ९७९)
भजन,किर्तन संत परंपरेतील नामदेवांच्या एका अभंगातून कीर्तन- प्रवचनादी पारंपरिक समाजमाध्यमांनी केलेल्या भक्तिकार्याचे स्वरूप आपल्याला दिसते तो अभंग असा –
‘काळ देहासी आला खाऊं । आम्ही आनंदें नाचू गाऊं ।।
कोण वेळे काय गानें। हैं तो भगवंता भी नेणें ।।
टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणें पश्चिमेकडे ।।
नाना म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ।।’
(ना.गा.१६६४)
नामदेवरायांनी या अभंगात केलेले काही शब्दप्रयोग फार बोलके आहेत. दक्षिण दिशेच्या विरोधी उत्तर दिशेचा उल्लेख येऊ शकला असता. पण त्याऐवजी नामदेवरायांनी पश्चिम दिशा निवडली. कारण ते पश्चिमोत्तर भारतातच प्रवास करीत गेले होते. आपले गाणे नव्हे तर ‘टाळमृदंग’ दक्षिणेकडे राहिल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अभंगातील “काळ” हा शब्द म्हणजेच इस्लामी आक्रमणाला उद्देशुन असावा. एखाद्या सैन्याच्या धर्तीवर नेटकेपणाने चालणाऱ्या दिडींचे वर्णन करतानी संत नामदेव म्हणतात…
“आले आले रे हरिचे डिंगर । वीर वारीकर पंढरीचे ।।
ध्वजां कुंचे गरूडटके । वैष्णव चालिले नेटिके ।।
आलें वैष्णवांचें दळ । भेणें पळे कळिकाळ “
– (श्रीनामदेव गाथा, महाराष्ट्र शासन ८३३-३४/३१०-१०)
याशिवाय ….
आले आले हरिदास । कळीकाळावर घाला कास ॥
तुळसी मंदिरीचे भाले । देखोनी यमदूत पळाले ॥
-संत नामदेव
अशाच परिस्थितीचा उल्लेख करतानी संत तुकाराम महाराज म्हणतात….
न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दु:खी होते ।।१।।
काय तुम्ही येथें नसालसें जालें । आम्हीं न देखिलें पाहिजे हें ।।२।।
परचक्र कोठें हरीदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ।।३।।
तुका म्हणे माझी लाजविली सेवा । हिनपणें देवा जिणें जालें ।।४ ||
सततचा दुष्काळ या परिस्थितीने गांजलेल्या व इस्लामी राज्यकर्त्यांच्या जाचाला कंटाळून आपले राज्य असावे असे जनतेला का वाटू नये. संत तुकाराम महाराजाचा परिसर म्हणजे तत्कालीन मावळ प्रांत. संत तुकाराम महाराजांनी पाईकाच्या अभंगातून मावळ्यांमधे देशभक्तीची बीजे रोवली. छत्रपती शिवाजीमहाराजांना मिळालेले मावळे अशाच देशभक्तीने प्रेरित झालेले होते, तुकोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व हिंदवी स्वराज्याची वाट तयार करून ठेवली, असे आपण म्हणु शकतो. शिवछत्रपतींच्या सैनिकांस पाईकीचे अभंग संत तुकाराम महाराजांनीं दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्य स्थापता आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें.त्या पाईकीचे अभंग पुढीलप्रमाणे…
१) पाईकपणें जोतिला सिध्दांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥२॥
तरि व्हावें पाईक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥३॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥४॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार । पाईक अपार सुख भोगी ॥५॥
२) पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाइकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥२॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥३॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥४॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥५॥
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात.
“दिवटया छत्री घोडे। हे तो बऱ्यात न पडे॥
आता येथे पंढरिराया। मज गोविसी कासया॥
मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ।।
तुका म्हणे देवा । माझे सोडववणे धांवा ।।”
एकंदरीत, संतांच्या रचनांना लाभलेली सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी समस्यांनी पीडित होती. समग्र संत चळवळीचा पायाच या समस्या, संकटे, वेदनांवर आधारलेला आहे. परकीय आक्रमणे, धर्मावरील हल्ले, श्रद्धास्थानांची मोडतोड, जुलमी राजवटी, दुष्काळ व नैसर्गिक व भौगोलिक संकटे, अस्थिर वातावरण, अनीती, दुराचार, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, कर्मठपणा ह्या सगळ्या अडचणींच्या दुःखद पार्श्वभूमीवर उभी झालेली संत चळवळ पुढे महाराष्ट्रीय समाजाला दिशा देणारी ठरली, एका सूत्रात बांधती झाली; पण ही लढाई संतांना दीर्घकाळपर्यंत लढावी लागली, हे विसरता येत नाही.