मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ तसेच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
“मराठी चित्रपटसृष्टी आमचं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.