तेराव्या शतकातील महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादळाच्या उंबरठ्यावर उभा होता. उत्तरेकडून होणाऱ्या परकीय आक्रमणांचे सावट गडद होत होते आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याची शक्ती क्षीण होत चालली होती. अशा काळात जेव्हा हिंदू समाजाला आत्मविस्मृती आणि अंतर्गत भेदभावांनी ग्रासले होते, तेव्हा संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ लिहून केवळ भगवद्गीतेवर भाष्य केले नाही, तर एका दूरगामी राष्ट्र-जागरणाचा पाया रचला. ज्ञानेश्वरी हे केवळ आध्यात्मिक विवेचन नसून, ते विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करून, त्याच्यात आत्मविश्वास आणि स्वधर्माची चेतना जागवणारे एक तेजस्वी शस्त्र होते. ज्ञानेश्वरांचे कार्य हे हिंदुत्वाच्या त्या चिरंतन तत्त्वाचा उद्घोष आहे. जे व्यक्ती आणि समाज यांना त्यांच्या मूळ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळखीतून शक्ती प्रदान करते.
ज्ञानेश्वरांनी अचूकपणे ओळखले होते की, कोणत्याही बाह्य आक्रमणाला तोंड देण्यापूर्वी समाजातील अंतर्गत दुही आणि वैचारिक गोंधळ दूर करणे आवश्यक आहे. तत्कालीन हिंदू समाज जन्म-आधारित श्रेष्ठत्वाच्या पोकळ कल्पनांमध्ये आणि कर्मकांडाच्या निरर्थक अवडंबरात अडकला होता. या सामाजिक विकृतीमुळे समाज आतून पोखरला गेला होता. म्हणूनच, ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम या भेदांवर प्रहार केला.
“म्हणौनि कुळ जाति वर्ण । है आघवेंचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥” (अ. ९:४५६)
या ओवीतून त्यांनी स्पष्ट केले की, हिंदू म्हणून एकत्र येण्यासाठी कुळ, जात आणि वर्ण हे भेद पूर्णपणे निरर्थक आहेत. ईश्वराप्रती असलेली निष्ठा आणि स्वधर्माचे पालन हीच खरी ओळख आहे. त्यांनी अग्नी आणि लाकडाचे रूपक वापरून सांगितले की, जसे विविध प्रकारची लाकडे अग्नीत पडल्यावर एकरूप होतात, त्याचप्रमाणे भक्ती आणि राष्ट्रकार्याच्या यज्ञात सर्व भेद गळून पडतात आणि केवळ एक तेजस्वी हिंदू समाज शिल्लक राहतो.
समाजातील प्रत्येक घटकाला ज्ञानेश्वरांनी विशेषतः स्त्रिया आणि तथाकथित निम्न जातींना, या व्यापक हिंदू ऐक्याच्या प्रवाहात सामील करून घेतले. “तैसे क्षेत्री वैश्य स्त्रिया।कां शूद्र त्यादिइया। जाती तंव चि वेगळालिया। जंव न पवती माते॥” (अ. ९:४६०), या शब्दांतून त्यांनी केवळ मोक्षाचा अधिकारच दिला नाही, तर राष्ट्ररूपी शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे, हे ठसवले. जेव्हा समाज एकत्र येतो, तेव्हाच तो शक्तिशाली बनतो. हा केवळ सामाजिक सुधारणेचा विचार नव्हता, तर परकीय आक्रमणांच्या काळात हिंदू समाजाला एकसंध ठेवण्याची ती एक प्रभावी रणनीती होती. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी समाजाला निष्काम कर्मयोगाचा संदेश दिला. प्रत्येकाने आपापले कर्तव्य पार पाडणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे, ही शिकवण त्यांनी दिली.
त्याचबरोबर, ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा अहंकार बाळगणाऱ्या आणि समाजाला दुर्बळ करणाऱ्या पंडितांवरही कठोर टीका केली.
“मोराच्या अंगी असोसे ।
पिसे अहाती डोळसे ।
परी एकली दिठी नसे ।
तैसे ते गा ॥”
या रूपकातून त्यांनी दाखवून दिले की, केवळ ग्रंथपाठ करून आत्मदृष्टी नसलेले पंडित समाजाला योग्य दिशा देऊ शकत नाहीत. अशा पोकळ विद्वत्तेमुळे समाज परावलंबी बनतो. ज्ञानेश्वरांनी गीतेचे ज्ञान संस्कृतच्या चौकटीतून बाहेर काढून प्राकृत मराठीत आणले. हा केवळ भाषांतराचा प्रयत्न नव्हता, तर तो सांस्कृतिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता. आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपले तत्त्वज्ञान हेच राष्ट्राला सामर्थ्य देतात, हा विश्वास त्यांनी मराठी माणसाच्या मनात निर्माण केला. ‘माझा मराठाचि बोलू कौतुके’ असे म्हणत त्यांनी मराठी भाषेला प्रतिष्ठा दिली आणि परकीय सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी वैचारिक शस्त्रसज्जता केली.
ज्ञानेश्वरांनी रचलेला भागवत धर्म हा हिंदू समाजाला एकत्र आणणारा एक राजमार्ग होता. त्यांनी कोणत्याही विशिष्ट पंथाचा किंवा देवतेचा संकुचित विचार न करता, ‘विश्वात्मक’ देवाची संकल्पना मांडली. पसायदान हे केवळ विश्वकल्याणासाठी केलेले मागणे नाही, तर ते एका सुसंघटित, तेजस्वी आणि विजयी हिंदू राष्ट्रासाठी केलेले संकल्प-प्रार्थना आहे.
‘दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।’ ही ओळ म्हणजे समाजातील आंतरिक दोष आणि बाह्य संकटरूपी अंधार नाहीसा होऊन, हिंदू स्वधर्माचा सूर्य तळपावा, यासाठीची आंतरिक तळमळ आहे.
थोडक्यात, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून केवळ एका आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी एका मोठ्या धोक्याच्या काळात हिंदू समाजाच्या पुनरुत्थानाचा आणि संघटित होण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी जातीय भेद नाकारून, कर्मकांडाचा पोकळपणा दूर करून आणि स्वभाषेचा अभिमान जागवून एका सशक्त आणि आत्मविश्वासू समाजाची उभारणी केली. त्यांचे कार्य हे केवळ भक्तीपुरते मर्यादित नसून, ते एका महान राष्ट्रकार्याची पायाभरणी होते. ज्ञानेश्वरी हा हिंदुत्वाचा तो जिवंत विचार आहे, जो आजही समाजाला एकत्र करून राष्ट्राला सामर्थ्य देण्याची प्रेरणा देतो.