नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची रचना केली. या संविधानात नागरिकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करता येईल, अशी व्यवस्था केली. अनेक आव्हानांचा सामना करत आपली लोकशाही, संविधानिक संस्था प्रगल्भ झाल्या. संसदीय लोकशाहीची अतिशय सुंदर अशी रचना देखील संविधानाने केली आहे. संसदीय अभ्यासवर्गातून लोकशाहीची प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानभवन येथे ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष ॲड.आशिष शेलार, विधानमंडळ सचिव मेघना तळेकर आदी उपस्थित होते.
संसदीय अभ्यासवर्ग लोकशाहीची ओळख करून देणारा वर्ग आहे. पुस्तकी अभ्यासक्रमांमध्ये आपण लोकशाहीची मूल्ये, प्रक्रिया वाचतो. अभ्यासवर्गात मात्र ही प्रक्रिया जवळून बघता येते. राज्याचा कारभार कसा चालला पाहिजे याचा नियम संविधानाने दिला. विधानसभा आणि विधानपरिषद या दोनही सभागृहाचे नियम, त्यातील एक एक शब्द, तरतूद संविधानाच्या आधारावरच झाली आहे. विधानमंडळाच्या कामकाजाची सुंदर रचना संविधानाने दिली, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विधानमंडळात विविध प्रकारचे कायदे केले जातात. हे कायदे लोकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणारे असतात. कायदे तयार होत असताना सभागृहात होत असलेली चर्चा गुणात्मक असते. राज्यातील शेवटच्या माणसावर एखाद्या कायद्याचा काय परिणाम होईल, याची बाजू देखील सभागृहात मांडली जाते. विधानमंडळाच्या मंजुरीशिवाय राज्याच्या तिजोरीतील एक रुपया देखील खर्च होऊ शकत नाही. विभागांना आपल्या मागण्या सभागृहासमोर ठेवाव्या लागतात. त्यावर चर्चा होते, मान्यतेनंतर अर्थसंकल्प तयार होतो आणि त्यानंतर कायदा तयार करावा लागतो. हा कायदा म्हणजे राज्याच्या तिजोरीची चावी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्यातील एखाद्या छोट्या घटनेचे पडसाद देखील विधिमंडळात उमटत असतात. लोकशाहीची प्रक्रिया विधिमंडळाच्या कामामुळे जीवंत राहते. सभागृहातील सभापती, अध्यक्ष आमचे हेडमास्टर आहेत, त्यांच्या मंजुरीशिवाय सभागृहात कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही. संसदीय लोकशाहीत विविध प्रकारची आयुधे आहेत. ही आयुधे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाची साधने आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
अभ्यासवर्गात राज्यभरातील विविध १२ विद्यापीठांतील राज्यशास्त्र या विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत.