Friday, October 18, 2024

शेती विजेकरिता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

मुंबई : “महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे काम सुरू झाले आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत महायुती सरकारच्या कार्यकाळातील विकासाची गती आणि प्रगती यावर प्रकाश टाकला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले, सदाभाऊ खोत व अन्य नेत्याची उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, ज्याने शेतीसाठी स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीद्वारे सोलर ऊर्जेच्या माध्यमातून १४,००० मेगावॅट वीजनिर्मितीचे काम सुरू झाले आहे आणि पुढील १५ ते १८ महिन्यांत हे सर्व प्रकल्प पूर्ण होतील. त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज उपलब्ध होईल. ही केवळ घोषणा नसून, हा अत्यंत क्रांतिकारक निर्णय आहे, ज्याचे प्रत्यक्ष काम जमिनीवर सुरू झाले आहे. पूर्वी ८.३० रुपये प्रति युनिट पडणारी वीज आता ३ रुपयांना मिळेल, ज्यामुळे महाराष्ट्र सरकारचे १०,००० कोटी रुपये बजेटमधून आणि ५,००० कोटी रुपये क्रॉस सब्सिडीतून बचत होणार आहे.”

“याच आधारावर शेतकऱ्यांसाठी मोफत विजेची योजना राबवण्यात आली आहे. अजित पवारांनी जसे सांगितले की, मागील काँग्रेस सरकारने ज्या घोषणाबाजी करून बदल केले, तसे हा निर्णय नाही. हा निर्णय दीर्घकाळ टिकेल अशा पद्धतीने, विचारपूर्वक आणि कृतीतून अमलात आणला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेले असून, त्यांना भविष्यातही दिवसा १२ तास वीज मिळत राहील,” असे ते स्प्ष्टपणे म्हणले.

अन्य लेख

संबंधित लेख