Monday, March 2, 2026

श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा इतिहास आता पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Share

नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांनी भारतीय धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान ही जगाच्या इतिहासातील अद्वितीय घटना आहे. हा गौरवशाली इतिहास केवळ भाषणांपुरता मर्यादित न राहता तो पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये भिनावा, यासाठी शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश केला जाईल, अशी ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नवी मुंबई परिसरात गुरुजींच्या नावाने एक अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची घोषणाही केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शीख समाजाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी १६७५ मध्ये आपले बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळे आज आपण स्वाभिमानाने आपली श्रद्धा जोपासू शकतो. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात शहिदी समागम आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

हा कार्यक्रम केवळ शीख समाजापुरता मर्यादित नसून सर्व श्रद्धावान नागरिकांचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर, नांदेड आणि नवी मुंबई येथे शहिदी समागम मोठ्या प्रमाणावर पार पडल्याचे सांगून देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब यांचे नातेही विशेष आहे. संत नामदेव महाराज महाराष्ट्रातून पंजाबमधील घुमान येथे गेले. त्यांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत. तसेच गुरु गोविंद सिंह महाराष्ट्रात आले आणि त्यांनी नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला. गुरु गोविंद सिंह यांच्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी शहादत दिली, असे उदाहरण जगात क्वचितच आढळते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख