Tuesday, September 17, 2024

रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद

Share

नागपूर : मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर (Riddhpur) येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती. सत्ता बदलामुळे मध्यंतरीचा कालखंड हा या विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करुन कुलगुरुंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त येथील सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात केले. या वेळी विध्वंस बाबा, परम पूजनीय कारंजेकर बाबा, कापूसतळणीकर बाबा, बिडकर बाबा, मु.धो.व्यास बाबा, आमदार परिणय फुके, कृपाल तुमाने, इतर संत-महंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरातमध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्थानपर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा, धर्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह धरला. खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली.

ज्या-ज्या भागात मराठी बोलल्या जाते तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशा सोप्या भाषेत श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्राची व्याख्या केली. मराठी भाषेच्या अनुषंगाने रिद्धपूरला एक विशेष महत्त्व आहे. मराठीतील पहिला ग्रंथ रिद्धपूरला साकारला व तो महानुभाव पंथाने निर्माण केला अशी धारणा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह धरताना आपल्याकडे मराठीतील हे ग्रंथच महत्त्वाचे प्रमाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जवळपास 230 कोटी रुपयांचा विकास आराखडा रिद्धपूरसाठी मी मुख्यमंत्री असताना तयार केला होता. आपल्या आग्रहामुळे हे काम आजवर पुढे वाढवू शकलो असे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक पाहता त्याच वेळेस आपण एक समिती तयार केली होती असा उल्लेख करुन भगवान चक्रधर स्वामींचा पुन्हा आशीर्वाद मिळाल्याने सत्तेत आलो. यामुळेच समितीचा अहवाल पुन्हा समोर घेऊन अर्थमंत्री नात्याने अगोदर आर्थिक तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

आज मराठीचे पहिले विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झाले असून त्याच्या कुलगुरुपदी महानुभाव पंथाच्या अभ्यासकाची नियुक्ती करता आल्याचा आनंद वेगळा असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील 25 कोटीचा निधी देण्याचा निर्णय केला आहे. श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे निधी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याचबरोबर इतर देवस्थानांना निधीची उपलब्धता आपण केली आहे. जवळपास 78 कोटी रुपयांचा हा निधी आहे. काटोल येथे कामाबाबत जो प्रस्ताव आलेला आहे. त्याबाबत 25 कोटीचा आराखडा आपण तयार करुन टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करुन देऊ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महानुभाव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. आमदार परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने यांच्यासह महंताचे समयोचित भाषणे झाली. रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अविनाश अवलगावकर व इतर महंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख