Tuesday, September 17, 2024

सर्वांच्या साथीने इथपर्यंत पोहोचलो आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

ठाणे : “माझ्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असे काही मोठे काम केलेले नाही. सर्वांच्या साथीने मी इथपर्यंत पोहोचलो आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन आयोजित प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ. अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथील नाट्यगृहात पार पडला यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ मंचावर आणून याचे प्रकाशन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा. मला काय मिळाले, यापेक्षा मी समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतोय. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे, आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. मी असे मानतो की, सी. एम. म्हणजे कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणूस. त्याआधारे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. माझ्याकडे आलेला माणूस रिकाम्या हाताने कधीच जात नाही आणि कधी जाणारही नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे मी माझे कुटुंब मानतो. यश आले तर हुरळून जाऊ नये आणि अपयश आले तर खचून जावू नये, ही आईची शिकवण मी आजही कायम स्मरणात ठेवली आहे.”

यासच, “हे शासन चोवीस तास लोककल्याणासाठी काम करीत आहे. हे शासन विकास आणि कल्याण याची सांगड घालून लोकांसाठी चांगल्या योजना राबवीत आहे. यापुढेही हे शासन लोककल्याणाचा विचार करूनच निर्णय घेणार, राजकीय हिताचे कधीही निर्णय घेतले जाणार नाहीत. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्यासाठी आम्ही सर्व एकत्र मिळून प्रयत्नशील आहोत. त्यामुळे जे काम करीत आहोत ते सर्वसामान्य जनतेसाठीच. यामुळे माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी समाजासाठी काम करीत राहणार, माझ्या या सर्व वाटचालीत माझ्या पत्नीचा खूप मोठा वाटा आहे. तिची खंबीर साथ मला नेहमी समाजासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देते. माझ्या या सामाजिक कार्यात माझे सर्व कुटुंबिय सदैव माझ्या पाठीशी असतात,” असेही ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख