मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपने महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे,” अशा शब्दांत त्यांनी या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे.
नेतृत्वाचा विजय आणि कार्यकर्त्यांची मेहनत
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय साकार झाला आहे.”
तसेच, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी अहोरात्र घेतलेल्या कष्टांमुळेच भाजप पुन्हा एकदा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘विकासाच्या राजकारणावर’ मोहोर
“हा विजय म्हणजे भाजपच्या प्रगती आणि विकासाच्या व्हिजनवर जनतेने दाखवलेला अढळ विश्वास आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महायुती सरकारने गेल्या काही काळात घेतलेले लोकहिताचे निर्णय आणि पायाभूत सुविधांच्या कामांना मतदारांनी पसंती दिल्याचे या निकालांवरून दिसून येत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.