Friday, September 20, 2024

मराठा आरक्षण आंदोलनाचे राजकारणात रूपांतर : नरेंद्र पाटील

Share

सोलापूर : कालपर्यंत मनोज जरांगे (Manoj Jarange) हे समाजकारण करीत होते. परंतु आज ते केवळ पाडापाडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी केला आहे. सोलापूर जिल्याच्या दौऱ्यावर असतांना ते माध्यमांशी बोलत होते.

नरेद्र पाटील यांनी सोलापूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत जरांगेच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर टीका केली आहे. ते म्हणाले, “वेगवेगळ्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या मराठा नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे. समाजाचं भलं कोणाच्या माध्यमातून झालं ते भलं ज्यांच्यामुळे झालं त्यांचबद्दलची मागणी रास्त आहे. कालपर्यंत सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सर्वच घटकांनी मनोज जरंगेंना पाठिंबा दिला. आम्ही पण त्यांना पाठिंबा दिला. परंतु ज्यावेळी त्यांनी राजकीय पक्ष, पाडापाडीच राजकारण, खासदारकीला पडणार, आमदारकीला उमेदवार आम्ही रिंगणात उतरणाऱ्याचं वक्तव्य त्यांनी केलं. कि हे पूर्णपणे संकेत कुठेना कुठे तरी विशिष्ट पक्षाच्या विरोधामध्ये हे आंदोलन छेडलेलं आहे. म्हणून मराठा समाज आता सावध झाला आहे, हे समाजकारण राजकारणात रूपांतरित झाले आहे. हे स्पष्टपणे दिसलेलं आहे,” असं ते म्हणाले.

यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला नरेंद्र पाटील यांनी भेट दिली. आपल्या भाषणात, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याचा आढावा घेतला आणि जरांगे यांच्या आंदोलनाचे राजकीय स्वरूप असल्याने होणारे नुकसान समजावून सांगितले. ईडब्ल्यूएस नाकारल्यामुळे होणाऱ्या नुकसानीवरही त्यांनी भाष्य केले.

दरम्यान, शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात लोकमंगल बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या लाभार्थी मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते. बँकेच्या आणि महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले गेले, ज्याचा आढावा नरेंद्र पाटील यांनी घेतला.

यानंतर नरेंद्र पाटील यांनी सोलापूर शहरातील विविध गणपती मंडळांना भेटी देण्यात आल्या. सर्किट हाऊसमध्ये मराठा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये 21 तारखेच्या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन करण्यात आले. या भेटीमुळे बार्शी येथील मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रबोधन मंच सोलापूरच्या माध्यमातून आयोजित उद्योजकांची बैठक सुरेश हळबे यांच्या उपस्थितीत झाली, जिथे नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या आकडेवारीवर चर्चा केली.

दिनांक 21 सप्टेंबरला सोलापूर शहरात लोकमंगल बँकेच्या माध्यमातून मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर, 22 सप्टेंबरला बार्शी तालुक्यात आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थी मेळावा आयोजित केला आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदारकीच्या निधीतून मराठा भवन उभारलेलं आहे

अन्य लेख

संबंधित लेख