Thursday, June 26, 2025

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

Share

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून “भेदाभेद भ्रम अमंगल” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत धर्माला वैचारिक अधिष्ठान देऊन पुंडलिकाने या परंपरेला मजबुत केले.

ज्ञानदेव रचिला पाया | उभारिले देवालया ||

नामा तयाचा किंकर | तेथे केलासे विस्तार ||

जनार्दनी एकनाथ | खांब दिला भागवत ||

तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||

( अर्थ – संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संपद्रायाचा पाया रचला आणि त्यातून वारकरी संप्रदायाचे मंदिर उभे राहिले. संत नामदेव महाराज यांनी या मंदिराचे म्हणजे वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. त्यानंतर संत एकनाथ महाराजांनी समन्वयाचे कार्य केले यातून मंदिरांचे अर्थात संप्रदायाचे खांब तयार झाले. अर्थात याला मंदिर भक्कमपणे उभे राहिले. संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले .संत तुकोबा या भागवत संप्रदायरूपी इमारतीचे कळस ठरले .)

संत बहिणाबाई यांनी रचलेला हा अभंग म्हणजे वारकरी सांप्रदायातील सामाजिक बांधणीच्या जडणघडणीचे प्रतिक म्हणुन प्रचलित आहे.

वासुदेव धर्म या नावाने पुरातन काळापासून ओळखला जाणारा हा संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय हे मुळात एकच. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मधे उल्लेख केलेला “विश्वस्वधर्म”, म्हणजेच ‘Universal Religion’
वारी करणारा तो वारकरी. वारकरी गळ्यात तुळशीमाळ धारण करतात म्हणुन त्यांना “माळकरी” म्हणून देखिल संबोधित करतात. पंढरीचा पांडुरंग ही या सांप्रदायाची देवता, आणि त्या विठ्ठलाच्या ठायी अखिल वारकरी संप्रदायाची प्रेम जिव्हाळ्याची सारी नाती एकवटलेली आहेत, आपल्या वैयक्तिक संसारात कितीही कामे, कितीही त्रास असला तरी विठ्ठल भक्त त्याच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीमधे अतुट श्रध्देने सहभागी होत असतो.
वारकऱ्यांच्या विठ्ठल दर्शनाच्या ओढीबाबतचे वर्णन संत तुकाराम महाराज खालील अभंगातून करतात…

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन ।

तैसें माझें मन वाट पाहे ॥१॥

दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली ।

पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥

भुकेलिया बाळ अति शोक करी ।

वाट पाहे परि माउलीची ॥३॥

तुका म्हणे मज लागलीसे भूक ।

धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥

( अर्थ – देवा तुझ्या भेटीची मला आस लागली आहे. मी तुझी वाट रात्रंदिवस पाहत आहे .पौर्णिमेचा चंद्र म्हणजे चकोराचे जीवनच आहे त्यामुळे तो चकोर चंद्र उगवण्याची वाट पाहत असतो, त्याप्रमाणे देवा मी तुझी वाट पाहत आहे. सासरी गेलेल्या मुलीने दिवाळीच्या वेळेस माहेर कडुन कोणीतरी बोलावण्याची जशी वाट पहावी त्याप्रमाणे माझे मन पंढरीची वाट पाहत आहे .जसे भूक लागल्यानंतर लहान मुले शोक करते ते फक्त त्याच्या मातेचीच वाटत पाहते. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे हे देवा आम्हाला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे आणि त्यामुळे तू लवकर धावत आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझे श्रीमुख दाखवायचं.)

अषाढी वारी सोहळा म्हणजे द्वैताकडुन अव्दैताकडे सुरू झालेला प्रवास, वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ. महाष्ट्रातील वारकरी संत परंपरेचा अभ्यास केल्यास हे सहज लक्षात येते की, श्रीविठ्ठल हाच संताची प्रेरणा व आत्माभान जागृत करणारे तत्व आहे. तो संताच्या जीवाचा जिवलग, सगासोईरा, पतितपावन आहे.

” न विचारी कळधर्म । जपता नाम निशिदिनी ।जातवित्तगोत न पाहेची काही ॥”

हि भगवान पांडुरंगाचे वेगळेपण आहे. सोवळ्या ओवळ्या सारख्या रूढींना थारा न दिल्यामुळेच संत चोखा महाराज म्हणतात…

“कोण तो सोंवळा । कोण तो ओंवळा । देहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥”

विविध समाज घटकांमधे एकता निर्माण करून समता व बंधुता या अचारधर्माचा जागर आणि “पाया पडो जण एकमेका” या परस्परांना पाया पडण्याची प्रथा परस्पर सन्मानाची प्रतिक बनली आहेत.

समता या वृत्तीची मुळ प्रेरणा असलेला हा विठ्ठल भक्तवत्सल आहे. तो कधी जनाबाई सोबत घरकाम करतो, चोखा महाराजांची ढोरे चारतो, संत सावता महाराजांच्या शेतात खुरपणी करतो, नामस्मरणात दंग असलेल्या सेना महाराजाच्या ऐवजी जाऊन नाभिकाचे काम देखिल करतो आणि नाथांच्या घरी पाणी देखिल भरतो. कारण भक्त हेच विठ्ठलाच्या जीवाचे प्राण आहेत. आपल्या भक्तीसाठी भक्तांचे मनोरथ पुर्ण करणारा हा विठ्ठल महाराष्ट्राने जगाला दाखवला.

विठ्ठलावरील भक्ती, प्रेम आणि श्रध्देमुळेच भक्त याती,कुळ हरपुन सामाजिक विषसमतेची बेडी तोडुन, समरस होऊन जातात.म्हणुन तुकाराम महाराज म्हणतात हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे,माणसामाणसांमधे भेद करणे हि अमंगल बाब आहे.शरीराच्या एका अवयवाला दुख तर संपूर्ण शरीराला वेदना होते त्याचप्रमाणे कुठल्याही जीवाचा मत्सर आपल्या हातुन घडला तर तो ईश्वराचाच मत्सर केल्यासारखा आहे. (अभंग 21, तुकाराम गाथा)

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।

भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥

अइका जी तुम्ही भक्त भागवत ।

कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥

कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।

वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥

तुका म्हणे एका देहाचे अवयव ।

सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥

(अर्थ – हे जग विष्णुमय आहे, वैष्णव हा एकच धर्म सर्वत्र आहे, माणसामाणसांमध्ये भेद करने ही अमंगल बाब आहे .हे भक्तजनहो, तुम्ही भगवंतचे श्रवण, चिंतन करून आपले हित साधुन घ्या .आपल्या हातून कोण्याही जीवांचा मत्सर घडू नये, हीच खरी ईश्वर भक्ति आहे .तुकाराम महाराज म्हणतात, की शरीच्या कुठल्याही अवयवाला दुःख झाले तर ते संपुर्ण शरीराला, तसेच शरीरातील जीवाला जाणवते त्याप्रमाणे विष्णुमय जगातील कोणत्याही जीवाचा मत्सर आपल्या हातून घडला असता तो इश्वराचा मत्सर केल्यासारखा आहे .)

भक्त आणि देव यांच्यामधील अपुर्व प्रेमामुळेच संतानी भक्तीप्रेमाचा एक बंधण निर्माण करून भक्तीच्या निरपेक्ष तत्वांनी ते घट्ट बांधले आहे. यामुळेच विठु त्याच्या भक्तांसाठी लेकुरवाळा झाला. भक्तीप्रेमाच्या या संबधामुळेच वयोगट,जात,लिंग,व्यवसाय या भेद नष्ट करत विठ्ठलाच्या लेकरांत परस्पर स्नेहभाव, बंधुभावपूर्ण संबध निर्माण होतात.

जे का रंजले गांजले| त्यांसी म्हणे जो आपुले|

तोचि साधू ओळखावा| देव तेथेचि जाणावा||

या अभंगात संत तुकाराम महाराजांनी संतांच्या कार्याचे जणू सर सांगितले आहे. दारिद्र्यात खितपत पडलेले, दुखाच्या खाईत लोटले गेलेले अशा दीनदुबळ्या लोकांची सेवा करणारच खरा संत होय. त्याच्याच ठिकाणी देव राहत असतो.

संत तुकाराम महाराज असोत वा अन्य कोणतेही संत असोत, ते केवळ शाब्दिक उपदेश करीत नव्हते. ते स्वतःच्या कृतीतून लोकांना उपदेश करीत होते. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या मुलांसाठी घेतलेला ऊस वाटेत भेटलेल्या दुसऱ्यांच्या लहान मुलांना वाटला, कारण त्यांना त्या लहान मुलांमध्ये स्वतःची लहान मुले दिसली. याच तुकाराम महाराजांनी दुष्काळात घरेच्या घरे उपाशी तडफडू लागली तेव्हा स्वतःच्या घरातले धान्य लोकांना मुक्तहस्ते वाटून टाकले.

ज्या काळामध्ये अस्पृश्यता उघडपणे पाळली जायची, त्या काळात अस्पृश्याची सावली अंगावर पडली तरी तथाकथित उच्चवर्णीय लोक पाप झाले असे मनात असत, त्या काळात संत एकनाथांनी एका महाराच्या व्याकूळ होऊन रडणाऱ्या बाळाला कडेवर घेतले आणि त्याला त्याच्या घरी पोहचवले. या कृतीतून संत एकनाथांनी जातीयते विरोधात बंड करण्याचा विचार मांडला होता.

संत नामदेवांनी भारतभर भ्रमण करून अफाट कार्य केले. गुजरात, राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, सिंध अशा विविध प्रांतातल्या बोलीभाषांमध्ये त्यांनी काव्यरचना केल्या. त्यांना सर्व ठिकाणी प्रतिष्ठा मिळाली. अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे उभारली गेली. शीख बांधवांच्या ‘ग्रंथसाहिबा’ या धर्मग्रंथात संत नामदेवांच्या रचना विराजमान झाल्या आहेत! संत नामदेव त्या काळामध्ये वारकरी सांप्रदायाला एक प्रकारे आंतरभारतीय उंचीवर नेऊन भारतीय एकात्मता घडवुन आणली.

अन्य लेख

संबंधित लेख