मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ तर पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७, ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दुपारी १:३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात सरासरी ३७.९४ टक्के इतके मतदान झाले आहे.
जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना ग्रामीण राजकारणाची ‘मिनी विधानसभा’ मानले जाते, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवरून मोठी चुरस पाहायला मिळत आहे. यावेळी नवमतदार आणि तरुणांचा कल मतदानाकडे अधिक असल्याचे चित्र प्राथमिक आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून, कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.
संध्याकाळी ५:३० वाजता मतदानाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल. सकाळी संथ गतीने सुरू झालेले मतदान दुपारनंतर वेगाने वाढेल. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. उन्हाचा कडाका कमी झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.