नागपूर येथे आज आयोजित ‘मंथनफॉरयुवा’ (Manthan4Yuva) च्या समारोप समारंभात सहभागी होताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे. आपल्या तरुणांना अशा ऊर्जा, नवनवीन कल्पना आणि आकांक्षांसह एकत्र येताना पाहून हा प्रसंग खरोखरच विशेष असल्याचे म्हटले आहे. या उपक्रमाने तरुणांच्या आवाजाला एक अर्थपूर्ण व्यासपीठ मिळवून दिले आहे आणि स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणले आहे.
४१०० ढोल-ताशा वादक आणि ५८५ ध्वजधारक यांनी एकत्र येऊन नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केल्यामुळे, आज महाराष्ट्राची संस्कृती आणि युवाशक्तीचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा झाला. या कामगिरीची दखल ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ यांनी घेतली आहे. केवळ विक्रमच नाही, तर या सादरीकरणातून महाराष्ट्राचा चैतन्यमय उत्साह आणि येथील तरुण पिढीचा आत्मविश्वास, कौशल्य दिसून आले.
समारोप समारंभात तरुण यशस्वी व्यक्ती आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याची संधीही मिळाली. विविध क्षेत्रांतील युवा आयकॉन्सचा (युवा प्रेरणास्थानांचा) सत्कार करण्यात आला आणि ‘मंथनफॉरयुवा’ अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
‘मंथनफॉरयुवा’ कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा सामूहिक संकल्प केल्यामुळे, अधिक आरोग्यदायी आणि उज्ज्वल भविष्याप्रती असलेली त्यांची दृढ कटिबद्धताही दिसून आली. आपल्या तरुणांकडून व्यक्त झालेला हा संकल्प अधिक सक्षम समाज घडवण्याच्या दिशेने टाकलेले एक प्रभावी पाऊल आहे.
संविधान प्रत्येक तरुण नागरिकाला स्वप्न पाहण्याचे आणि ती स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य देते. शिक्षण, कौशल्य विकास, स्टार्टअप्स, क्रीडा आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये तरुणांना पाठिंबा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे; तसेच तरुण उद्योजक आणि स्टार्टअप क्षेत्रातील घटकांशी चर्चा करून धोरणे अधिक बळकट केली जात आहेत.
‘मंथनफॉरयुवा’ या कार्याक्रमासाठी दिसून आलेली ऊर्जा आपल्या तरुणांचा आत्मविश्वास आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा दर्शवते. त्यांच्या स्वप्नांना बळ देणे आणि योग्य संधी निर्माण करणे हे ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विष्णू चांगदे आणि रितेश गावंडे, विविध क्षेत्रांतील युवा आयकॉन्स आणि मोठ्या संख्येने तरुण-तरुणी यावेळी उपस्थित होते.