
नवी मुंबईत नशाविरोधी जनजागृतीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ
२५० महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग
‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून पोलीस अधिकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. अमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाचे आरोग्य आणि सामाजिक परिणाम तसेच त्यापासून दूर राहण्याचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
प्रत्येक शाळा व महाविद्यालयात ‘अँटी-नार्कोटिक्स कमिटी’ स्थापन करण्यावरही भर देण्यात आला असून, शहरातील सुमारे २५० महाविद्यालयांनी या अभियानाला प्रतिसाद दिला आहे.
कारवाईसोबत पुनर्वसनालाही प्राधान्य
नवी मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि वितरण करणाऱ्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाया करण्यात येत आहेत. मात्र, केवळ कारवाई न करता व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनर्वसनावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नशामुक्त झालेल्या व्यक्तींना इतर तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी सहभागी करून घेण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.
अमली पदार्थांविरोधातील कठोर पोलिसी कारवाईसोबतच विद्यार्थी, पालक, शिक्षक, सामाजिक संस्था आणि नागरिकांना या अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याने ‘नशामुक्ती नवी मुंबई’ अभियानाला व्यापक सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.