भाजप (BJP) नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत, अशी टीका नितेश राणे यांनी केलीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पुतळा कोसळल्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) सरकारविरोधात काल रविवारी जोडे मारो आंदोलनही केलं. हुतात्मा चौक ते गेट ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीने मोर्चाही काढला. यावरून नितेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेवर चांगलाच हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे हे पाकिस्तानी एजंट असल्याचे म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ‘औरंग्याच्या पिलावळीने दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. एवढंच नव्हे तर ‘ बाळासाहेब ठाकरे कडवट हिंदू होते. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे रक्त असूच शकत नाही. बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेला लाथ मारून मातोश्री बाहेर काढले असते’ अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पाहायला मिळाले.