सी.जोसेफ विजय (थलपती विजय) याने तामिळनाडूचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाचे सरकार सत्तेत आले. २०२४ साली अभिनेता विजय यानी या पक्षाची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश थलपतीला मिळाले. यानंतर महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी लोक विजयचे गुणगान गायला लागले. सोशल मिडियावरच अस्तित्व राहिलेल्या या पुरोगाम्यांपैकी कोणी तरी एक म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात भाजपेतर पक्षांना म्हणे `विजय’ची गरज आहे.

मुळात, महाराष्ट्र हे कोण्या सिनेस्टारच्या मागे वेडेपिसे होणारे राज्य नाही. तो इथल्या कोणत्याच व्यक्तीचा स्वभाव नाही. महाराष्ट्रातील किंवा देशातील सरकार हे वैचारिक बैठक असलेले सरकार आहे. महाराष्ट्र हे तत्व, विचार आणि समरसता यावर चालणारं राज्य आहे. एकूणच विचार केला तर, कोणाच्याही मागे उभे राहतील असे इथले मतदार नाहीत. भाजप राजकारण आणि भाजपेतर राजकारण असा विचार करताना ध्येय असलेला आणि ध्येय नसलेला पक्ष असा करता येईल. कोणताही पक्ष जेव्हा तीनवेळा सरकारमध्ये येतो तेव्हा त्या ताकदीचं व्हिजन हे त्या पक्षाकडे किंवा नेत्याकडे असतं. त्या ध्येयाकडे जायचा मार्ग शोधणं, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ हे सर्व यामध्ये कामी येतं. हेच आपण कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत विचार करायला गेलो तर यांची नेतेमंडळीच सैरभैर आहेत. यांच्याकडे स्वत:चा खिसा भरणं एवढचं ध्येय आहे. त्यामागे पक्ष, विचार याचा नाममात्रही विचार पहायला मिळत नाही. एकेकाळी २-४ आमदार असलेला पक्ष अनेक वर्षे लढत राहतो आणि स्वबळावर सत्ता स्थापन करतो यासाठी वैचारिक बैठक आणि संघटनात्मक पातळीवरची पकड हेच यामागचं सूत्र आहे.
मात्र, भाजपेतर पक्षांकडे हाच मिसिंग फॅक्टर आहे. भाजपेतर पक्षांचे अध:पतन होण्याची कारणमिमांसा ही संघटनात्म पातळीवर नसलेली पकड आणि शिड नसलेल्या होडीसारखं भरकटलेपण ही आहे.
मुळातच महाराष्ट्रासारख्या सामाजिक, आर्थिक, बौध्दिक आणि राजकीय पातळीवर परिपक्व राज्याला कोणा सिनेक्षेत्रातील माणसाची गरज आहे हे वाटणचं वैचारिक दारिद्राचे लक्षण आहे. कारण आपल्याला आपल्या बळावर चांगलं नेतृत्त्व उभं करता येत नसेल तर ही दिवाळखोरीच म्हणावी लागेल. कारण कोणताही पक्ष हा विचारांवर मोठा होतं असतो. त्यांचं नेतृत्वाला विकसित करावं लागतं.
मुळातला महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधला फरक समजून घेतला पाहिजे तो असा की, दाक्षिणात्य लोक हे सिने अभिनेत्यांची पूजा करणारे आहेत. फॅन म्हणून जीव ओवाळून टाकणारे आहेत. तमिळनाडूच्या राजकारणाचा डीनए संपूर्ण भिन्न आहे. या सिनेमातून मिळालेल्या प्रसिध्दीची एनकॅशमेंट ही राजकारणात करून घेणारे अनेक नट नटी दक्षिणेत झाले आहेत. पण त्यामागचा विचार आणि त्यातून राज्य म्हणून होणारी अधोगती ही बघितली पाहिजे. याआधी एम.जी रामचंद्र, एन.टी.रामराव, करूणानिधी, जयललिता यांच्यासारखे चित्रपटामध्ये काम केलेेले आणि मग राजकारणात अलेले मुख्यमंत्री तामिळनाडूला मिळाले आहेत. पण, हा विचार महाराष्ट्राचा नाही. तामिळनाडूच्या लोकांची मानसिकता, निवडून आलेल्या पक्षाची विचारधारा हे सर्व वेगळ्या धर्तीवर विकसित झाले आहेत. पेज ३ ते मंत्रालय हा प्रवास दक्षिणी चित्रपटांसारखा हवेत होत नाही. पण ही तिथल्या लोकांची निवड आहे. हा लोकशाहीचा निर्णय आहे आणि तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. मात्र हे त्रैराशिक महाराष्ट्रात मांडावे, हे सपशेल चुकीचे आहे.
महाराष्ट्रातील पक्ष हे भाजप असो किंवा कॉंग्रेस बौध्दिकदृष्ट्या सक्षम होते. कोणत्याच पक्षाला अभिनेत्याच्या प्रसिध्दीवर निवडणूक जिंयकायची गरज पडली नाही. पण आज भाजपेतर पक्षांना ही गरज वाटत असेल तर, त्यांचे पक्ष किंवा संघंटना म्हणून असेलेले विचार हे इररेल्व्हंट आहेत असंचं म्हणावं लागेल. संघटना किंवा पक्षाचा मागचा विचार क्षीण होतं जाणं, वैचारिक प्रेरणेचा अभाव असणं हीच यामागची कारणं आहेत. आता यावर काम करायचं की कुठुनतरी विकतचे कु** आणून चिकटवायचे हे सर्वस्वी या नेत्यांच्या हातात आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र हे सर्व पातळीवर अग्रेसर राहिले आहेत. स्वातंत्र्य लढ्यात, देशाला वैचारिक दिशा देण्यात कायम आपलं राज्य हे पुढे राहिलेलं असताना असले परत मागे जायचे विचार या पुरोगाम्यांना सुचतात म्हणजे त्यांची बौध्दिक क्षमता आपल्याला कळून येतेच आहे. प्रगल्भ महाराष्ट्र की व्यक्तीकेंद्रित व्यक्तीपूजक असा महाराष्ट्र बघायचा आहे हे सूज्ञास सांगायला नको.
वास्तविक हे सिनेअभिनेत्यांचे प्रयोग महाराष्ट्रातही झाले आहेत, पण वेळोवेळी जनतेने ते हाणून पाडले आहेत.
| नाव | प्राथमिक क्षेत्र | राजकीय कृती / निवडणूक माहिती | मतदारसंघ (जर असल्यास) |
| डॉ. अमोल कोल्हे | अभिनेता | लोकसभा निवडणूक लढवून विजयी (खासदार) | शिरूर लोकसभा |
| उर्मिला मातोंडकर | अभिनेत्री | २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली | उत्तर मुंबई लोकसभा |
| महेश मांजरेकर | अभिनेता/निर्माता/दिग्दर्शक | २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली | उत्तर-पश्चिम मुंबई |
| आदेश बांदेकर | अभिनेता/निवेदक | २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली | माहिम विधानसभा |
| दिपाली सय्यद | अभिनेत्री | २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली | कळवा-मुंब्रा विधानसभा |
| सयाजी शिंदे | अभिनेता | २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश | – |
| कुलदीप पवार | अभिनेता | विधानसभा निवडणुकीत सहभाग | – |
| रितेश देशमुख | अभिनेता/निर्माता | प्रत्यक्ष निवडणूक नाही, पण कौटुंबिक वारसा व प्रचार | – |
आभासी सोशल मिडियावर उरलेल्या या पुरोगामी लोकांना स्वप्न पण त्यांच्यासारखीच कणा नसलेली पडत आहेत यात त्यांची चूक नाही ही कारण संघटनात्मक काम आणि विचारच त्यांच्याकडे नाही.