कोल्हापूर : “महाराष्ट्राला लाभलेली संतांची परंपरा आणि त्यातून जोपासले गेलेले भजन-कीर्तन हे आपल्या संस्कृतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. हा वारसा जतन करणे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत नेणे हेच राज्य सरकारचे मुख्य ध्येय आहे,” असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचानालयच्या वतीने डॉ. व्ही. टी पाटील स्मृतीभवन (राजारामपुरी) येथे 21 ते 23 फेब्रुवारी, तीन दिवसीय ‘कव्वाली महोत्सवाच्या’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कव्वाली हा प्रकारही संगीताची एक प्रकारे साधनाच आहे. राज्यात कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सुमारे बाराशेहुन अधिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक आर्थिक वर्षात 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी 25 हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णयही सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागामार्फत घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विठू माऊली सप्तशृंगीसईम देव या तीन महिला भजनी मंडळ तर दत्त, डाक्रोबा पायराई आणि दत्त प्रसादिक यापुरुष भजनी मंडळाला रुपये 25 हजार रुपयांच धनादेश देऊन मंत्री शेलार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या कवाली महोत्सवात राज्यातील विविध कलाकारांचे कव्वाली गायन होणार आहे. आयुष्याचे सार सांगणाऱ्या “चढता सुरज धीरे धीरे” या कव्वालीने या महोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी प्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाजा (मुंबई) व कव्वाल तौहिद अली (पुणे) यांचा सत्कार शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.