मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आता महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन अर्ज करून घेता येणार आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती देताना सांगितले की, शेतकऱ्यांना तात्काळ आणि पारदर्शकपणे मदत पोहोचवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ऑफलाइन स्वीकारले जाणारे अर्ज आता डिजिटल केल्यामुळे मदतीची प्रक्रिया जलद होणार आहे.
योजनेचे स्वरूप आणि लाभ:
राज्यात १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना राज्य सरकार राबवत आहे. शेतीत काम करताना विविध कारणांमुळे (उदा. वीज कोसळणे, सर्पदंश, पाण्यात बुडणे, अपघाती मृत्यू किंवा अवयव निकामी होणे) शेतकऱ्याला मदत दिली जाते.
- अपघाती मृत्यू: २ लाख रुपये.
- अपंगत्व: एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रुपये मदत दिली जाते.
१२० कोटी रुपयांची तरतूद
या योजनेसाठी २०२५-२६ या वर्षाकरिता १२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४,३५९ शेतकरी प्रस्तावांना ८८.१९ कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
या डिजिटल बदलामुळे राज्यातील गरजू शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा लाभ वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय घेणे शक्य होणार आहे.