Sunday, June 8, 2025

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्यासाठी पोहोचले कर्नाटक पोलीस; नोएडा पोलिसांनी हाणून पाडला डाव

Share

नोएडा: आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी पत्रकार अजीत भारती यांना उत्तर प्रदेशातील नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी अटक करण्याचा प्रयत्न केला. अजीत भारती यांच्यावर बेंगळुरूमध्ये दाखल केलेल्या एका गुन्ह्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल कथितपणे वादग्रस्त टिपण्णी केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153A आणि 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेने वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य पोलीस बळाच्या वापराने दडपून टाकण्याच्या काँग्रेस सरकारच्या कृतीचा देशभरात निषेध होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक पोलिसांचे तीन जवान एका खाजगी टॅक्सीने अजीत भारतींच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी पोलिसांचा गणवेश परिधान केला नव्हता. ते साध्या वेशात आले होते. स्थानिक पोलिसांना कोणतीही कल्पना न देता पत्रकार अजीत भारती यांना अटक करण्याचा कर्नाटक पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र नोएडा पोलिसांनी तातडीने अजीत भारती यांच्या निवासस्थानी धाव घेऊन कर्नाटक पोलिसांचा डाव हाणून पाडला. यानंतर नोएडा पोलिस कर्नाटक पोलिसांच्या तीन जवानांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात घेऊन गेले.

कर्नाटक पोलिसांनी बजावलेल्या या नोटिशीत अजीत भारती यांनी समाजात द्वेष आणि शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने राहुल गांधींबद्दलचा व्हिडिओ बनवला असे म्हटले आहे. याप्रकरणी यांच्याविरोधात १५ जून २०२४ रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. कर्नाटक काँग्रेस कमिटीचे लीगल सेल सचिव आणि सचिव बेके बोपण्णा यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर नोंदवताना अजीत भारती यांनी १३ जून २०२४ रोजी राहुल गांधींबद्दल खोटा व्हिडिओ बनवल्याचा दावा करण्यात आला होता, तर गुरुवारी (२० जून २०२४) त्यांना दिलेल्या नोटीसमध्ये त्यांचा व्हिडिओ द्वेष पसरवत असल्याचे म्हटले आहे. अजित भारती यांना नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत बेंगरूळू येथील हाय ग्राउंड पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश कर्नाटक पोलिसांनी दिले आहेत.

या घटनेची प्रतिक्रिया म्हणून अनेकांनी सोशल मीडियावर आपला आक्रोश व्यक्त करत अजित भारती यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. #WeStandWithAjeetBharti हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अनेकांनी पत्रकारांना धमकावणे बंद करण्याचे आवाहन करत आहेत कर्नाटक सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे. डरो मत असे म्हणणारे राहुल गांधी एका पत्रकाराच्या टीकेला घाबरले आहेत अशी टीका एका एक्स वापरकर्त्याने केली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी मध्यस्थी करून कर्नाटक पोलिसांच्या पथकाला भारतीला अटक करण्यापासून रोखले. वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ओरड मारणाऱ्या काँग्रेसने स्वतःच कायद्याची पायमल्ली केल्याची टीका यानिमित्ताने होता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख