Saturday, July 4, 2026

बाई! एक विचार…

Share

अखेर बाई गेल्याच! त्यांच्या जाण्यानंतर सोशल मीडिया, वृत्तपत्रे यातून बाईंच्या कारकिर्दीवर खूप काही लिहून येणे स्वाभाविकच आहे. त्यात त्यांनी केलेल्या कामाचा संपूर्ण तपशील आलेलाच आहे, येतोच आहे. यानिमित्ताने बाईंचा रंग विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणं मला महत्त्वाचं वाटतं. मुळात अनेक नाटके व्यावसायिक व अव्यवसायिक रंगभूमीवरती दिग्दर्शित करणे, त्यात अभिनय करणे, अनेक यशस्वी नाटके देणे असं करणारे अनेक दिग्दर्शक होते. आजही आहेत. पण बाईंचं सगळ्यात वेगळेपण म्हणजे बाईंचं रंगचिंतन. बाईंच्या रंगचिंतनाची बैठक अतिशय पक्की होती. इब्राहिम अल्काझी, आदि मर्झबान, के नारायण काळे, गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मामा पेंडसे, मो. ग. रांगणेकर. मामा वरेरकर अशा अनेक दिग्गजांबरोबर होणाऱ्या चर्चा, बाईंचे स्वतःचे वाचन आणि प्रत्यक्ष काम यातून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली.


नाटक कशासाठी आणि कसं याबद्दलचा त्यांचा विचार ठाम होत गेला आणि त्यातून रंगभूमीवर एक नवचैतन्याचे वारे दिसू लागले. बाईंनी काम करायला सुरुवात केली तेव्हा संगीत नाटकाची मोहिनी उतरून तीन अंकी सामाजिक नाटक घडत होतं. कुठलाही काळ हा एका क्षणात संपत नाही त्याच्या सावल्या पुढे काही काळ रेंगाळत राहतात. तत्कालीन रंगभूमीवरील अभिनय आणि दिग्दर्शनात संगीत रंगभूमीवर असलेली काहीशी कृतकता अशीच रेंगाळत होती. बाईंनी त्याला तडा दिला. आणि वास्तवदर्शी अभिनय आणि दिग्दर्शनातील संरचना या दृष्टीने काम करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी आपल्याला हवी तशी नाटके निवडली. निवडलेल्या नाटकांमध्ये हवे तसे बदल करून घेतले. आणि स्वतःच्या विचारातली रंगभूमी प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली.


मुळात बाईंचं मत असं होतं की, नाटक हा एक सृजनशील धर्म आहे. आणि त्यांचं सृजन हे रंग, चित्र, शिल्प, साहित्य अशा सर्व कलाप्रकारांचा समुच्चय होता. त्यामुळे बाईंच्या रंगायनमध्ये अनेक चित्रकार, शिल्पकार, कवी, लेखक, गायक, वादक अशा सर्वांचा राबता होता. कुठल्याही रंगकर्मीने या सर्व कलाप्रकारांचे संस्कार आपल्यावर करून घेतले पाहिजेत. त्यातूनच आपल्या सृजनाची वाट चोखाळली पाहिजे हे बाईंचं पक्क मत होतं.


त्या म्हणत, “वर्षानुवर्षे चालत आलेल्या मराठी रंगभूमीच्या संकेतांशी संबंध ठेवायचा आणि त्याच्या अनुषंगानेच नवनवीन शोध घ्यायचे. सृजनशील कलाकृती आजुबाजूला घडत असलेल्या वातावरणातूनच कित्येकदा त्याला उत्तर देत, तर कित्येकदा त्याला प्रश्न विचारीत उभी राहते. नावीन्य लादता येत नाही. विद्यार्थी वृत्तीने जुने पाहिले पाहिजे आणि नव्याचा अंदाज घेतघेत वाटचाल केली पाहिजे.” अशाप्रकारे परंपरेत अडकून न पडता आणि तिच्याशी फटकूनही न राहता नाविन्याचा शोध कसा घ्यायचा हे बाई आपल्या व्याख्यानातून सतत मांडत राहिल्या.
मी इतकी वर्षं नाट्यसृष्टीत का वावरले?? या प्रश्नाचे उत्तर बाईंकडूनच ऐकण्यात मजा आहे. ‘झिम्मा’ मध्ये त्या लिहितात, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पिकासो या जगप्रसिद्ध चित्रकाराकडून. तो म्हणतो, “सर्व कला (त्यात नाट्यकलेचाही समावेश आहे) हा ‘धादांत खोटेपणा’ आहे. चित्रकाराकडे पाहा त्याच्या हाती साधनं पेंट ब्रश, रंग, समोर कॅनव्हासचा तुकडा – या सर्वातून तो ब्रह्मांड निर्माण करू इच्छितो! जीवनातील वास्तवाविरुद्ध हे बंडच नाहीतर दुसरं काय? शिल्पकार-सुसाट वाहणारं वारं, तलम वस्त्राची लयकारी पकडतो आणि धातूला, दगडाला, लाकडाला गती, ताल आणि लय देण्याचा प्रयत्न करतो. ‘प्रत्यक्षा’ विरुद्ध केलेलं हे ‘बंडच’ की!”


बाई रंगायननंतर व्यावसायिक रंगभूमीवर गेल्या. त्याला त्या लोकमान्य रंगभूमी म्हणत. त्या काळात व्यावसायिक रंगभूमीकडे उपहासाच्या दृष्टीने पाहणाऱ्या काही समीक्षकांना बाईंचं हे व्यावसायिक रंगभूमीवर जाणं खटकलं होतं. “अखेर विजयालाही तिथेच जावे लागले” असंही लिहिलं गेलं. परंतु बाईंनी व्यावसायिक रंगभूमीचं रूपच पालटलं. बॅरिस्टर, महासागर, हमीदाबाईची कोठी, जास्वंदी, वाडा चिरेबंदी अशा एका मागोमाग एक लखलखीत कलाकृती त्यांनी तिथे निर्माण केल्या.


इथेही केवळ यशस्वी नाट्यकृती देणाऱ्या अभिनेत्री दिग्दर्शिका म्हणून त्यांच्याकडे पाहता येत नाही तर त्यांनी आपला रंगविचारच व्यावसायिक रंगभूमीवर नेला. नुसता नेलाच नाही तर तो रुजवला. तो विचार घेऊन वावरणाऱ्या अनेक पिढ्या त्यांनी निर्माण केल्या. वास्तवदर्शी अभिनयाचा पायंडा तिथे पाडला. आशयघन संहिता लिहून घेतल्या. मनोरंजनाच्या पलीकडे जाणारं केवळ भावनेलाच नव्हे तर बुद्धीलाही आव्हान देणारं नाटक त्यांनी निर्माण केलं.


धंदेवाईक रंगभूमी असा शब्द वापरला जाण्याच्या काळात बाईंनी वेगळ्या व्याख्याच रंगकर्मी पुढे मांडल्या. धंदेवाईक न होता व्यावसायिक वृत्ती होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी हाती घेतलेल्या कामाविषयी आदर बाळगणारा तो व्यावसायिक आणि नाट्यकलेशी कुठचाही संबंध न ठेवता पैसा व प्रसिद्धीसाठी काम करणारा तो धंदेवाईक, असे त्यांनी सांगितले.
मला नेहमी असं वाटतं की, प्रयोगशीलता हा स्वभाव असतो. ती जर तुमच्या स्वभावात असेल तर तुम्ही कुठेही काम केलं तरी काहीतरी नवं करून पाहता. आणि ती नसेल तर अगदी प्रायोगिकतेचा आव आणत तुम्ही छापाचे गणपती तयार करता. मला असं वाटण्याला बाईंची समग्र कारकीर्दही कारणीभूत आहे.


कलावंत आणि सामाजिक बांधिलकी, नाटक आणि चळवळ या संदर्भातील त्यांची मते अत्यंत स्पष्ट होती. कुठलाही इश्यू घेऊन त्याच्यावर नाटक रचणं हेच मला मान्य नाही. म्हणजे याचा अर्थ तो इशू तुम्ही वापरता. तुम्ही प्लॅटफॉर्मच्या ऐवजी थेटर चा उपयोग करता. आणि त्याला त्याचा वास येतो. त्याला राजकारणाचा वास येतो. जयवंत दळवी राजकीय दृष्ट्या प्रचंड अँलर्ट होते. पण त्यांच्या पात्रांना तो वास येत नाही. हे त्या सांगत. बाईंना अनेक स्त्री दिग्दर्शिका विशेषतः दिल्ली मधल्या विचारत असत की, तुम्ही कधीच स्त्रीवादी नाटक केलं नाही का? बाई त्यांना सांगायच्या माझी प्रत्येक व्यक्तिरेखा ही स्त्री केंद्रित आहे. माझं नाटक पूर्णतः बाईपणाविषयी आहे. उदाहरणार्थ पुरुष हे नाटक. रेप हा इश्यू घेऊन केलेलं नाटक नाही तर त्याचा विषय आहे पौरुष. स्त्रीत्व. पुरुषांनी आणि स्त्रियांनीही केलेली स्त्रीची वाताहत.


इथे बाई नाटकाला कुठल्याही चळवळीपेक्षा मोठं करतात. एकूणच नाटक या कलाप्रकारालाच त्या व्यापक करतात. म्हणूनच ‘माझं नाटक हा कुठल्याही चळवळीचा किंवा विचारसरणीचा माऊथपीस असणार नाही’ हे त्या आग्रहांनी मांडायच्या. आजकाल नाट्यकलेला आणि साहित्याला अशा काही प्रयोजनांशी बांधून घालण्याच्या, संकुचित करण्याच्या मागणीला बाईंनी दिलेलं हे उत्तर चिरंतन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून बाईंचं नाटक हे सभोवतालाच भान देतं, पण ते केवळ समकालीन तपशीलात अडकणारं नाटक राहत नाही. ते कुठल्याही काळामध्ये बद्ध होऊन राहत नाही.


नाटकाराला उमगलेला एखादा जीवनाअनुभव हाच त्या नाटकाचे केंद्रस्थान असतो असं त्या म्हणत त्यांनी नाटककार घडवले. नाट्यलेखनाच्या प्रक्रियेपासून मी नाटककार सोबत असते असे त्या नेहमी म्हणायच्या. आणि त्याचे प्रत्यंतर त्यांच्या नाटकात आपल्याला दिसत असे. अनुभवाच्या उकलण्यातून, व्यक्तिरेखांच्या परस्पर संबंधातून, त्यांच्या प्रवासातून नाट्य आपसूक फुलले जाते, तेव्हा ते खऱ्या अर्थी सकस नाटक ठरते, अस्वस्थ करते, मग ते प्रकृतीने विनोदी असो अथवा गंभीर असो.


बाईंनी मराठी नाटक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं. फ्रीट्झ बेनिव्हिट्स या जर्मन दिग्दर्शकाला त्या मित्रही मानत आणि गुरुस्थानीही. त्या दोघांनी जर्मनी आणि भारत अशा दोन्ही ठिकाणी एकत्र प्रोजेक्टस केले. दोन्हीकडच्या कलावंतांना सांस्कृतिक देवाणघेवाणीची एक छान संधी दिली.


बाईची नाटकाची तयारी कुठल्याही संशोधनापेक्षा कमी नसे. माझ्यामते आधुनिक मराठी रंगभूमीवरील सर्वश्रेष्ठ नाटक म्हणजे बॅरिस्टर! त्यातला ग्रामोफोन मिळवण्यासाठी त्यांनी चोर बाजारातल्या गल्ल्या अक्षरशः पालथ्या घातल्या. आपलं पात्र कसं बसेल, कसं दिसेल, कसं बोलेल या सगळ्याच्या पाठीमागे त्याची पार्श्वभूमी आणि मानसिकता कारण असते. यासाठी पात्राच्या मानसिकतेचा आणि भूतकाळाचा खोल आणि गहिरा वेध घेणे त्यांच्या नटांना अनिवार्य ठरे. बाई नटांसोबत तो घेत असत. बाईंचं नाटक म्हणजे परफेक्शन. केवळ अभिनय आणि दिग्दर्शन नव्हे तर पार्श्वसंगीत प्रकाश योजना नेपथ्य सर्व सर्व विभाग कसे परिपूर्ण. कशातही त्रुटी राहता कामा नये यावर त्यांचे बारीक लक्ष असे. म्हणूनच बाईंचं नाटक पाहणं हा एक अनुभवच असे.
बाईंचे ‘वाडा चिरेबंदी’ मी सात वेळा पाहिले. मला एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटे. पुरुष बॅरिस्टर या नाटकांनीही खूपच वेगळा अनुभव दिला. कोल्हापुरात असल्यामुळे आणि शाळकरी वयात बाईंची अन्य नाटक पाहण्याची संधी दुर्दैवाने हुकली.


पण एखाद्या संस्थेचे अथवा व्यक्तीचे मोठेपण काय किती हे त्यांनी घडवलेल्या विद्यार्थ्यांमधून जाणवते असे म्हणतात. बाईंनी घडवलेले विद्यार्थी रंगकर्मी पाहिले तर ते आपल्या लक्षात येतं. बाईंनी मराठी रंगभूमीला निश्चितच एक दिशा दिली. विचार दिला. नव्हे, नाटकाला चिंतनाची जोड देणे म्हणजे काय हे शिकवलं. मात्र, बाईंबद्दल आमच्या पिढीच्या काही तक्रारी आहेत. त्याही इथे नमूद कराव्याशा वाटतात. सुरुवातीच्या काळात असंख्य वर्कशॉप घेणाऱ्या बाईंनी नाटक करणं थांबवल्यानंतर आमच्यासाठी वर्कशॉपस घ्यायला हवी होती किमान बाईंची भाषणं, व्याख्यानं, त्यांच्याशी चर्चा याद्वारे आम्हाला खूप काही शिकता आलं असतं. पण बाई आमच्या पिढीत मिसळल्याच नाहीत. त्या आमच्यापासून दूर राहिल्या. नव्या पिढीची नाटके पहाणेही त्यांनी टाळले. ना त्यांच्याशी संवाद घडला ना आमचे प्रश्न संभ्रम आम्हाला त्यांच्यासमोर मांडून सोडवून घेता आले. त्या आमच्यासाठी अप्राप्यच राहिल्या.


नॅशनल स्कूल ड्रामाच्या चेअरमनपदी बाई विराजमान झाल्या तेव्हाही आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना विनवले की आमचे काही क्लासेस, घ्या मास्टर क्लास घ्या. पण बाईंनी साफ शब्दात नकार दिला. एनसीपीएचं काम बाईंनी जेव्हा हातात घेतलं तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला. पु ल देशपांडे, अशोक रानडे यांच्यानंतर आता बाईंच्या हातात ही धुरा जाणार होती. पण पु ल आणि अशोक रानडे यांच्या काळात रंगकर्मींनी गजबजलेलं, रंगकर्मींचा सृजनशील अड्डा असलेलं एनसीपीए बाईंच्या कार्यशैलीमुळं आम्हाला परकं झालं. बाईंसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुरूचा सहवासच आम्हाला लाभला नाही. ही खंत कायमच मनात आहे, राहील. मात्र, बाईंकडून विविध मार्गाने जे काही घेता आलं शिकता आलं ते आमच्या पिढीने आणि आमच्या नंतरच्याही पिढ्यांनी मनमुराद लुटलं. त्यांच्या रंगचिंतनावर आमचं भरण पोषण झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


बाई गेल्या आणि खरोखरच असं वाटतं एक वटवृक्ष कोसळला. बाई गेल्या पण जाताना एक रंग विचार, चिंतन आमच्या झोळीत टाकून गेल्या. त्या पायावर आता आम्हाला स्वतःचं चिंतन स्वतःचा विचार शोधायचा आहे.


– अभिराम भडकमकर
(लेखक नामवंत नाटककार आणि कादंबरीकार आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख