तामिळनाडू मधील चेन्नई येथे ऐतिहासिक ‘एगमोर गव्हर्नमेंट म्युझियम’ (Egmore Government Museum) संकुलातून अलीकडेच अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर आले आहे. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेल्या फोटोंनुसार, सातव्या शतकापासून ते चौदाव्या शतकातील चोळ (Chola) आणि होयसाल (Hoysala) कालखंडातील कोट्यवधी रुपयांच्या अमूल्य, ऐतिहासिक पाषाणमूर्ती आणि जुने मंदिर खांब उघड्या प्रांगणात, कचऱ्यासारखे धूळ खात पडलेले पाहायला मिळाले. चालू असलेल्या ‘हेरिटेज रिस्टोरेशन’ आणि नवीन ब्रॉन्झ गॅलरीच्या बांधकामा दरम्यान या प्राचीन मूर्तींची अत्यंत बेजबाबदारपणे हाताळणी करण्यात आली असून, काही मूर्तींची मोडतोड झाल्याचेही समोर आले आहे.
एका बाजूला आपली संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि देवदेवतांच्या मूर्ती अशा प्रकारे असुरक्षित आणि उघड्यावर टाकून त्यांची मोडतोड होऊ दिली जात आहे; तर दुसऱ्या बाजूला याच संकुलात 7 फेब्रु.२०२६ कॉनेमरा लायब्ररीच्या आवारात ₹८५.८० लाख रुपयांचा सरकारी निधी खर्च करून परदेशी विचारवंत कार्ल मार्क्स यांचा भव्य कांस्य पुतळा उभारण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करत होती. हा विरोधाभास तामिळनाडूतील द्रमुक (DMK) शासनाची स्वतःच्या वैभवशाली संस्कृतीप्रती असलेली कमालीची उदासीनता आणि केवळ डाव्या पक्षांना खूश करण्यासाठी चाललेले वैचारिक लांगूलचालन उघड करतो.
मूर्तींच्या दुरवस्थेचे आणि मोडतोडीचे वास्तव
तामिळनाडू राज्यात ऐतिहासिक एगमोर गव्हर्नमेंट म्युझियम, चेन्नई (Egmore Government Museum) आणि त्यालाच लागून असलेले ‘कॉनेमरा पब्लिक लायब्ररी’ (Connemara Public Library) संकुल हे केवळ दक्षिण भारताच्या नव्हे, तर संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक व बौद्धिक वारशाचे केंद्र राहिले आहे.. सोशल मीडिया आणि मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेल्या अधिकृत छायाचित्रांनुसार, सातव्या शतकापासून ते चौदाव्या शतकातील चोळ (Chola), पल्लव (Pallava), आणि होयसळ (Hoysala) कालखंडातील कोट्यवधी रुपयांच्या अमूल्य, ऐतिहासिक पाषाणमूर्ती आणि शेकडो वर्षे जुने मंदिर खांब उघड्या प्रांगणात, एखाद्या कचऱ्यासारखे धूळ खात पडलेले पाहायला मिळाले.
सोशल मीडिया आणि स्थानिक पुरातत्व रक्षकांनी समोर आणलेल्या तथ्यांनुसार, चालू असलेल्या बांधकामाच्या नावाखाली प्राचीन वारशाची झालेली दुरवस्था स्पष्ट होते. तामिळनाडू पोलीस विभागाच्या ‘आइडल विंग’ने (Idol Wing) आंतरराष्ट्रीय तस्करांकडून जप्त केलेल्या आणि राज्यातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारादरम्यान काढलेल्या सुमारे २५० हून अधिक पाषाणमूर्ती, नक्षीदार खांब आणि शिलालेख म्युझियमच्या मागच्या उघड्या आवारात फेकून देण्यात आले आहेत. हे मौल्यवान खांब आणि मूर्ती गेल्या अनेक महिन्यांपासून थेट ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत आहेत. यामुळे सातव्या ते दहाव्या शतकातील पल्लव आणि चोळ कालखंडातील वाळूच्या दगडातील (Sandstone) शिल्पांची रासायनिक झीज (Weathering) वेगाने होत आहे. बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मिक्सर, अवजड क्रेन आणि मजुरांच्या सततच्या वावरामुळे अनेक प्राचीन मूर्तींच्या कोपऱ्यांची तोडफोड झाली आहे. क्रेनच्या बेजबाबदार वापरामुळे काही शिल्पांना ओरखडे आले असून काहींचे हस्त व आयुधे खंडित झाली आहेत, जी पुरातत्व कायद्यानुसार (Antiquities and Art Treasures Act, 1972) अक्षम्य गुन्हा आहे.
एगमोर म्युझियम आणि होयसाल (Hoysala) साम्राज्याचा ऐतिहासिक संबंध
चेन्नईतील एगमोर म्युझियम हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने संग्रहालय आहे (स्थापना: १८५१). सध्या तामिळनाडू सरकारद्वारे या हेरिटेज वास्तूचे मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन (Restoration) केले जात आहे.
थोडक्यात इतिहास
होयसाल राजवंश (१२ वे ते १४ वे शतक) प्रामुख्याने आजच्या कर्नाटक प्रदेशात केंद्रित होता. मात्र, वीर सोमेश्वर आणि वीर बल्लाळ (तिसरा) या होयसळ राजांच्या काळात त्यांचा राजकीय प्रभाव तामिळनाडूतील कावेरी खोऱ्यापर्यंत, विशेषतः समयपुरम (कन्ननूर) पर्यंत पसरला होता. चोळ आणि पांड्य राजांच्या अंतर्गत संघर्षात मध्यस्थी करत होयसालांनी तामिळ भूमीवर आपली सत्ता आणि सांस्कृतिक ठसे उमटवले होते.
एगमोर म्युझियमच्या ‘अमरवती गॅलरी’ आणि ‘मूर्ती दालनात’ दक्षिण भारतातील विविध कालखंडातील सुमारे २,५०० हून अधिक दुर्मिळ पाषाण आणि कांस्य मूर्ती जतन करण्यात आल्या आहेत. यात होयसाल कालखंडातील क्लोराईटिक शिस्ट (Soapstone) प्रकारच्या मऊ दगडात कोरलेली त्रिभंग मुद्रेतील शिल्पे, द्वारपाल आणि विष्णू-शिव यांच्या नक्षीदार मूर्तींचा समावेश आहे.तामिळनाडू सरकारने या संग्रहालयाच्या संवर्धनासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याचा मूळ उद्देश होयसाल , चोळ आणि पल्लव कालखंडातील अमूल्य शिल्पे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (उदा. डिजिटल कॅटलॉगिंग आणि ३D स्कॅनिंग) जागतिक पर्यटकांसाठी उपलब्ध करून देणे हा आहे.
कार्ल मार्क्सच्या पुतळ्याची स्थापना: राजकीय आणि वैचारिक अर्थकारण
7 फेब्रु.२०२६ कॉनेमरा लायब्ररीच्या आवारात ₹८५.८० लाख रुपयांचा सरकारी निधी खर्च करून परदेशी विचारवंत कार्ल मार्क्स यांचा भव्य कांस्य पुतळा उभारला होता एप्रिल २०२५ मध्ये तामिळनाडू विधानसभेत ‘नियम ११०’ अंतर्गत या पुतळ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. तामिळनाडूच्या संस्कृती आणि पुरातत्व विभागाने यासाठी ₹८५,८०,००० (८५.८० लाख रुपये) निधी मंजूर केला होता . हा पुतळा पूर्णपणे कांस्य (Bronze) धातूचा असून त्याचे एकूण वजन १,२०० किलो आहे. त्याची उंची ९.५ फूट असून तो ‘रेड-स्टोन’ फिनिशिंगमध्ये तयार करण्यात आला होता. शिल्पकार के. कार्तिक यांनी ३ महिन्यांत हा पुतळा साकारला. डाव्या पक्षांनी आधी चेन्नईच्या ‘मरीना बीच’ किंवा ‘नंदनम’ परिसराची मागणी केली होती. मात्र, अंतिम मंजुरी ‘कॉनेमरा लायब्ररी’च्या प्रांगणाला मिळाली.
भाजपचे वैचारिक आक्षेप
भारतीय जनता पक्ष या पुतळ्याच्या स्थापनेला तीव्र विरोध केला आहे. हा पुतळा भारताच्या राष्ट्रीय अस्मितेवर आणि तामिळनाडूच्या स्थानिक सांस्कृतिक वारशावर डाव्या-द्रविडीयन विचारसरणीने केलेले वैचारिक आक्रमण आहे. भाजप नेत्या डॉ. तमिळिसाई सौंदरराजन यांनी काही प्रमुख आक्षेप मांडले होते.
विदेशी आणि हिंसक विचारसरणीचे उदात्तीकरण
“कार्ल मार्क्स हे एका पाश्चात्य आणि परदेशी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात, ज्या विचारसरणीने जगभरात (विशेषतः सोव्हिएत युनियन, चीन आणि कंबोडियामध्ये) कोट्यवधी लोकांच्या नरसंहाराला आणि लोकशाहीच्या गळचेपीला खतपाणी घातले. “ज्या कम्युनिस्ट पक्षांना स्वतःच्या मूळ देशांमध्ये किंवा भारतातही (त्रिपुरा, पश्चिम बंगाल) जनतेने नाकारले आहे, त्यांच्या नेत्याचा पुतळा तामिळनाडूच्या करदात्यांच्या पैशातून उभारणे हा तामिळ संस्कृतीचा अपमान आहे,” असा आक्षेप भाजपने घेतला.
स्थानिक तमिळ आणि भारतीय महापुरुषांची उपेक्षा
भाजपने असा युक्तिवाद केला आहे की, एगमोर म्युझियम आणि कॉनेमरा लायब्ररी हे दक्षिण भारताच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे केंद्र आहे. या संकुलात जर पुतळा उभारायचाच होता, तर तो भारताच्या आणि तामिळनाडूच्या मातीतील महापुरुषांचा असायला हवा होता. एगमोर म्युझियममध्ये होयसाल (Hoysala) कालखंडातील, तसेच चोळ, पल्लव आणि पांड्य राजघराण्यातील अमूल्य शिल्पे आहेत. तामिळनाडूच्या सांस्कृतिक विकासात या राजांचे योगदान अफाट आहे. भाजपच्या मते, महान तमिळ संत तिरुवल्लुवर, स्वातंत्र्यसेनानी सुब्रमण्यम भारती, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, किंवा तामिळ बौद्ध चळवळीचे जनक अयोध्यादास पंडितर यांचे पुतळे उभारण्याऐवजी मार्क्सला प्राधान्य देणे हे द्रमुकचे मानसिक गुलामगिरीचे लक्षण आहे.
राजकीय स्वार्थासाठी इतिहास वाकवण्याचा प्रयत्न
द्रमुक सरकार कार्ल मार्क्सचा भारताशी संबंध जोडण्यासाठी खोटा इतिहास पसरवत आहे. मार्क्स यांनी न्यूयॉर्क डेली ट्रिब्यूनमध्ये ब्रिटिश राजवटीवर लिहिलेले लेख हे भारताच्या प्रेमापोटी नव्हते, तर ते त्यांच्या भांडवलशाहीच्या सिद्धांताचा भाग होते. मार्क्स यांनी भारतातील ग्रामीण व्यवस्थेला “बुरसटलेली आणि प्रगतीविरोधी” म्हटले होते, याकडे संघ परिवाराने लक्ष वेधले आहे.