ग्लासगोमध्ये भारताच्या चुकीच्या नकाशावर बोट ठेवत, लव्हलिन बोरगोहेनने भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या अनुपस्थितीकडे वेधले लक्ष
बहुतेक खेळाडूंसाठी बक्षिस समारंभासोबतच त्यांचा प्रवास संपतो. परंतु लव्हलिन बोरगोहेन हिच्यासाठी खरी कहाणी व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर सुरू झाली.
कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत, आसामच्या या ऑलिम्पियन खेळाडूने दोनदा हेडलाईन्समध्ये स्थान मिळवले. पहिले आपल्या राज्यातील पूरग्रस्तांना आपले पदक समर्पित करून, आणि दुसरे ग्लासगोमधील एका रेस्टॉरंटमध्ये भारताचा चुकीचा नकाशा पाहिल्यावर ही घटना सर्वांसमोर आणून.
सहाजिकच, या दोन्ही गोष्टी पूर्वनियोजित नव्हत्या. बॉक्सिंगशीही त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या दोन्ही घटनांनी हेच दाखवून दिले की, विजेत्यांना केवळ त्यांनी जिंकलेल्या पदकांसाठीच नव्हे, तर त्यांनी जपलेल्या मूल्यांसाठीही कायम का लक्षात ठेवले जाते.
‘आसाम’साठी एक पदक
रौप्य पदक जिंकल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, लव्हलिनचे विचार स्वतःच्या आनंदापलीकडे जवळपास ८,००० किलोमीटर दूर असलेल्या आसामकडे गेले; जिथे हजारो कुटुंबे अलीकडच्या काळातील सर्वात भीषण पूरस्थितीशी लढा देत होती.
केवळ आपल्या यशाबद्दल मिरवण्याऐवजी, तिने हे पदक आपल्या मातृभूमीतील संघर्ष करणाऱ्या लोकांना समर्पित केले.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे राहिलेल्या कोणत्याही खेळाडूसाठी ही अत्यंत मानवीय आणि संवेदनशील भावना होती. ज्या वेळी संपूर्ण प्रकाशझोत साहजिकच तिच्यावर असायला हवा होता, अशा वेळी तिने तो प्रकाशझोत अशा लोकांसोबत सामायिक करणे पसंत केले, ज्यांनी आपली घरे, उपजीविका आणि अनेक प्रकरणांत आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले होते.
या समर्पणाने एका वैयक्तिक क्रीडा यशाचे रूपांतर थेट एकात्मतेच्या आणि जिव्हाळ्याच्या संदेशात केले. यामुळे देशाला पुन्हा एकदा जाणीव झाली की, खेळाडू बऱ्याचदा ज्या मातीतून आणि समुदायातून घडतात, त्यांच्याशी त्यांचे हृदय किती घट्ट जोडलेले असते.
एका विजेत्याच्या नजरेस पडलेला तो नॅपकिन
मिस्टर सिंग्सच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा

दुसऱ्या दिवशी, ग्लासगोमधील ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ (Mister Singh’s India) या प्रसिद्ध भारतीय रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली, जिथे स्पर्धा संपल्यानंतर भारतीय बॉक्सिंग पथकातील सर्व सदस्य एकत्र जमले होते.
संघाच्या यशाचा आनंद साजरा करत असताना, रेस्टॉरंटच्या फलकावर आणि कागदी नॅपकिन्सवर छापलेल्या त्यांच्या लोगोमध्ये भारताचा नकाशा चुकीचा आहे, हे लव्हलिनच्या चटकन लक्षात आले. त्या नकाशातून ईशान्येकडील राज्ये पूर्णपणे गायब होती, तर जम्मू-काश्मीरचे काही भागही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते.
त्याकडे दुर्लक्ष करून सोडून देण्याऐवजी, तिने क्षणाचाही विलंब न लावता अतिशय नम्रपणे पण ठामपणे व्यवस्थापनाचे या चुकीकडे लक्ष वेधले.
तिचे शब्द शांत होते, पण त्यांचा अर्थ अत्यंत स्पष्ट होता. “कृपया याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. यामुळे मला खूप वाईट वाटले आहे. या नॅपकिनवरील भारताच्या नकाशात आपली ईशान्येकडील राज्येच नाहीत. ईशान्येकडील व्यक्ती म्हणून, या गोष्टीने आम्हाला खरोखरच खूप वाईट वाटते. कृपया पुढच्या वेळी ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप खूप धन्यवाद.”
नंतर घडलेला प्रकार सांगताना ती म्हणाली, “आम्ही एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. मला हे पाहून मनातून खूप वाईट वाटले आणि मी माझा आवाज उठवला. त्यांनी लगेच आपली चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आणि तो नकाशा बदलण्याचे आश्वासन दिले.”
त्या रेस्टॉरंटने नंतर जाहीरपणे माफी मागितली आणि त्यांचा लोगो पुन्हा डिझाइन करण्याचे मान्य केले.
रिंगबाहेरची अचूक नजर

ग्लासगोच्या ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ रेस्टॉरंटच्या लोगोमध्येही भारताचा अपूर्ण नकाशा दिसत आहे.
उत्कृष्ट बॉक्सर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या बचावातील अगदी लहानातील लहान त्रुटी हेरण्यासाठी प्रशिक्षित असतात. लव्हलिनने रिंगबाहेरही आपली हीच तीक्ष्ण नजर आणि जागरूकता दाखवली.
कित्येक ग्राहकांनी कदाचित ते नॅपकिन्स वापरले असतील आणि त्याकडे लक्षही दिले नसेल. पण ज्या मातीतून ती येते, तोच आपला प्रदेश त्या नकाशातून गायब आहे, हे तिच्या सजग डोळ्यांनी लगेच टिपले.
तिची प्रतिक्रिया ना रागावलेली होती, ना त्यात कोणतीही नाटकीपणा होता. तिने कसलाही सार्वजनिक वाद किंवा गोंधळ घातला नाही. तिने फक्त अत्यंत संयमाने ती चूक दाखवून दिली आणि ती गोष्ट का महत्त्वाची आहे, हे समजावून सांगितले. तिच्या याच संयमी स्वभावाने तिचा संदेश अधिक शक्तिशाली ठरला.
एका चुकीच्या नकाशाचा मुद्दा का महत्त्वाचा आहे?
काहींना ही केवळ एक साधी डिझाईनची चूक वाटू शकते. पण नकाशे म्हणजे केवळ कागदावरील रेषा किंवा सजावटीचे भाग नसतात. ते कोणत्याही राष्ट्राच्या अस्मितेचे आणि सीमांचे थेट प्रतिबिंब असतात.
भारताच्या बाबतीत सांगायचे तर, ईशान्य भारत असो वा जम्मू-काश्मीर, या क्षेत्रांशी जोडलेली प्रत्येक गोष्ट अतिशय संवेदनशील असते कारण ती आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि एकात्मेशी जोडलेली असते.
असे चुकीचे नकाशे, विशेषतः स्वतःला भारताचे प्रतिनिधित्व करणारे म्हणून मिरवणाऱ्या व्यवसायांकडून जेव्हा वापरले जातात, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांच्या मनात चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे लव्हलिनचा हा आक्षेप केवळ एका लोगोची चूक सुधारण्यापुरता मर्यादित नव्हता, तर देशाची ओळख अचूक असणे किती महत्त्वाचे आहे, याची ती आठवण होती.
ईशान्य भारताचा बुलंद आवाज
तिच्या या कृतीमागे आणखी एक खूप महत्त्वाची भावना होती. अनेक दशकांपासून, भारताच्या ईशान्येकडील लोकांच्या मनात अशी एक खंत असते की ते भौगोलिक आणि भावनिक दोन्हीदृष्ट्या मुख्य प्रवाहापासून थोडे दूर फेकले गेले आहेत. हा प्रदेश देशाला शूर सैनिक, अव्वल खेळाडू, कलाकार आणि उद्योजक देतो, तरीही आजही अनेकांना आपण दुर्लक्षित राहिल्याची किंवा लोक आपल्याला समजावून घेत नसल्याची भावना जाणवते.
जेव्हा लव्हलिन म्हणाली, “ईशान्येकडील व्यक्ती म्हणून, यामुळे खरोखरच आम्हाला वाईट वाटते,” तेव्हा ती केवळ स्वतःसाठी बोलत नव्हती. ती या संपूर्ण प्रदेशातील लाखो लोकांच्या भावनांना वाट करून देत होती – की आमची ओळख महत्त्वाची आहे आणि भारताच्या प्रत्येक कोपऱ्याला समान मान आणि आदर मिळालाच पाहिजे.
किती विरोधाभास आहे ना? एका परदेशी भूमीवरील रेस्टॉरंटला, ईशान्य भारत हा भारताचाच एक अविभाज्य भाग आहे हे समजावून सांगण्यासाठी, कोणत्याही राजकारण्याला किंवा मुत्सद्याला नव्हे, तर आसामच्या एका साध्या बॉक्सरला पुढे यावे लागले.
जर या दोन्ही घटनांकडे वेगवेगळ्या दृष्टीने पाहिले, तर पूरग्रस्तांना पदक समर्पित करणे आणि चुकीचा नकाशा सुधारणे या दोन गोष्टी अगदी वेगळ्या वाटू शकतात.
परंतु, जेव्हा आपण त्या एकत्र करून पाहतो, तेव्हा आपल्याला एका खऱ्या आणि संवेदनशील माणसाचे दर्शन घडते. एका कृतीतून तिची अथांग करुणा दिसून आली, तर दुसऱ्या कृतीतून तिची प्रखर नागरी जाणीव आणि देशाबद्दलचे कमालीचे प्रेम दिसून आले.