महामार्गावरील प्रवास सुकर करण्यासाठी तंत्रज्ञानआधारित सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी काल
मुंबई येथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये ‘भारताचा इंटेलिजेंट हायवे: टोलिंग आणि मोबिलिटी फायनान्सचे एजेंटिक भविष्य’ या विषयावर भाषण दिले. यामध्ये फास्टॅग, वार्षिक पास, बॅरियर-फ्री टोलिंग आणि एआय-चलित तंत्रज्ञान भारताच्या प्रवासाची पद्धत कशी बदलत आहेत यावर त्यांनी यावेळी बोलताना प्रकाश टाकला.
तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरुन वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्याने नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खाते बदलल्यास फास्टॅग बदलण्याची आता गरज नाही.
‘वन टॅग’च्या परिचयामुळे फास्टॅग अधिक सोयीस्कर होईल, कारण वापरकर्त्यांना तोच फास्टॅग वापरून बँक बदलण्याची परवानगी मिळेल. पूर्वी, वापरकर्त्यांना नवीन फास्टॅग खरेदी करून जुना फास्टॅग त्यांच्या वाहनातून काढावा लागत असे. आता, हे अगदी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीप्रमाणे काम करेल—तुमची बँक बदला, तुमचा टॅग ठेवा आणि प्रवास सुरू ठेवा.
आज, राष्ट्रीय महामार्गावरील ९८% पेक्षा जास्त वापर-शुल्क संकलन फास्टॅगद्वारे डिजिटल पद्धतीने होते, ज्यासाठी सुमारे १३ कोटी फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. एआय आणि फ्री-फ्लो टोलिंगमुळे, भारत टोल प्लाझावर थांबण्याऐवजी त्यातून सहजपणे प्रवास करण्याकडे वाटचाल करत आहे. उद्याचा महामार्ग इंटेलिजेंट, सीमलेस आणि कॅशलेस असेल.