या पिढीचा तेव्हा एकतर जन्मही झाला नव्हता किंवा ही सगळी तेव्हा नकळती बाळे होती. पण ११ सप्टेंबर, २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे विमानतळावरील सुरक्षेच्या रांगांपासून ते स्मार्टफोनवरील पाळतीपर्यंत, जनरेशन झेड (Gen Z) निराळ्याच जगात वावरत आहेत.
एका विमानतळाच्या टर्मिनलवरून चालत असल्याची कल्पना करा. हातात गरम कॉफी, खिशात फोन आणि पायात बूट तसेच घालून तुम्ही जेटवेवर (विमानात जाण्याचा मार्ग) पाऊल ठेवता. विमानात चढताना तुम्ही मागे वळून गेटवर उभ्या असलेल्या तुमच्या कुटुंबाला शेवटचा निरोप देण्यासाठी काचेतून पाहता. सुरक्षेसाठी कोणतीही रांग नाही, द्रवपदार्थांवर कोणतेही निर्बंध नाहीत, बेल्ट काढण्याची गरज नाही आणि कोणतेही बॉडी स्कॅनर नाहीत.
२००१ नंतर जन्मलेल्या कोणालाही हे एखाद्या विज्ञानकथेतील (सायन्स फिक्शन) किंवा ऐतिहासिक काल्पनिक चित्रपटातील दृश्य वाटेल. पण पंचवीस वर्षांपूर्वी अमेरिकेत ही मंगळवारची एक सर्वसाधारण सकाळ होती. सन १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २०१० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जन्मलेल्या ‘जनरेशन झेड’साठी हे जग नेहमीच पाळत ठेवणारे, ध्रुवीकरण झालेले आणि कठोर सुरक्षा नियमांनी वेढलेले राहिले आहे. तरीही, या पिढीतील बहुतेकांना हे वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेली ती घटना आठवत नाही.
११ सप्टेंबर २००१ रोजी अशी एक घटना घडली जिने जागतिक सुरक्षा, नागरी स्वातंत्र्य, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय धोरण पूर्णपणे बदलून टाकले. पंचवीस वर्षांनंतर, ‘जनरेशन झेड’ला ९/११ पूर्वीचे जग आठवत नाही.
नेमकं काय घडलं होतं?
वर्तमान समजून घेण्यासाठी, आधुनिक जगाला बदलून टाकणाऱ्या त्या सकाळकडे मागे वळून पाहावे लागेल. ११ सप्टेंबर २००१ रोजी, अल-कायदा या अतिरेकी गटाशी संबंधित १९ दहशतवाद्यांनी अमेरिकेवर एका सुनियोजित दहशतवादी हल्ल्याचा भाग म्हणून चार व्यावसायिक विमानांचे अपहरण केले.
हा हल्ला अमेरिकेच्या आर्थिक आणि लष्करी शक्तीच्या प्रमुख प्रतीकांवर करण्यात आला होता:
• न्यूयॉर्क शहर : सकाळी ८:४६ वाजता, अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट ११ वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला धडकले. सतरा मिनिटांनंतर, युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट १७५ साऊथ टॉवरवर आदळले. अवघ्या दोन तासांच्या आत, ११० मजली असलेल्या या दोन्ही गगनचुंबी इमारती धूळ आणि तुटलेल्या लोखंडाच्या ढिगाऱ्यात कोसळल्या आणि संपूर्ण लोअर मॅनहॅटन उद्ध्वस्त झाले.
• आर्लिंग्टन, व्हर्जिनिया : सकाळी ९:३७ वाजता, अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट ७७ अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या पश्चिमेकडील भागावर कोसळले.
• शँक्सविले, पेनसिल्व्हेनिया : सकाळी १०:०३ वाजता, युनायटेड एअरलाइन्सचे फ्लाइट ९३ एका शेतात कोसळले. या विमानातील प्रवासी आणि कर्मचारी वर्गाला इतर हल्ल्यांची माहिती मिळाल्यावर त्यांनी अपहरणकर्त्यांचा जोरदार प्रतिकार केला होता. या विमानाचे लक्ष्य अमेरिकेचे कॅपिटल (संसद भवन) किंवा व्हाईट हाऊस होते असे मानले जाते.
हे हल्ले संपेपर्यंत २,९७७ निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता. ते अमेरिका आणि इतर अनेक देशांमधील होते. हजारो आपत्कालीन मदतनीस, स्वयंसेवक आणि स्थानिक रहिवाशांना त्या विषारी धुळीचा सामना करावा लागला आणि पुढील अनेक वर्षे त्यांना गंभीर आजारांनी ग्रासले.
आज संकटे टिकटॉक, इन्स्टाग्राम रील्स आणि पुश नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात जगभर पसरतात. मात्र याच्या अगदी उलट, ९/११ ची घटना संपूर्ण जगाने थेट टेलिव्हिजनवर (टीव्हीवर) पाहिली होती. जगभरातील घरांमध्ये, कार्यालयांमध्ये आणि शाळा-कॉलेजांमध्ये टीव्ही स्क्रीनद्वारे अनुभवलेला हा एक सामूहिक आणि भयंकर आघात होता.
भारतीयांचा बळी
११ सप्टेंबरच्या या हल्ल्यात अधिकृतपणे भारतीय पासपोर्ट असलेल्या ४१ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. या संख्येत अमेरिकेचे नागरिकत्व किंवा कायमस्वरूपी रहिवास असलेले भारतीय-अमेरिकन आणि भारतीय वंशाच्या इतर लोकांचा समावेश नाही.
या सर्व गटांचा विचार केल्यास, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार या हल्ल्यात बळी पडलेल्या भारतीय वंशाच्या लोकांची एकूण संख्या १०० ते १०७ च्या घरात होती. यांपैकी बहुतांश तरुण व्यावसायिक होते जे फायनान्स, आयटी आणि कन्सल्टिंग क्षेत्रात डब्ल्यूटीसीमध्ये काम करत होते किंवा त्या विमानांत होते.
जग बदलून गेल्याची तीन प्रमुख कारणे
११ सप्टेंबर २००१ रोजी ही बातमी आली तेव्हा भारतातील बहुतांश लोकांनी टीव्हीवर ही घटना पाहिली. परंतु त्याचे परिणाम भारतातही वेगाने पोहोचले, ज्यामुळे दैनंदिन प्रवासापासून ते परदेशवारीच्या अनुभवापर्यंत सर्व काही बदलले.
१. विमान प्रवास कायमचा बदलला : ९/११ पूर्वी, कुटुंबातील सदस्य प्रवाशांना निरोप देण्यासाठी बोर्डिंग गेटपर्यंत सोबत जाऊ शकत असत. या हल्ल्यांनंतर, जगभरातील विमानतळांवर ही पद्धत कायमची बंद झाली. सुरक्षेसाठीची तपासणी केंद्रे टर्मिनलच्या प्रवेशद्वारांजवळ हलवण्यात आली. द्रवपदार्थांवर कडक निर्बंध लादले गेले, तपासणीसाठी बूट आणि बेल्ट काढणे सक्तीचे झाले, आणि विमानाच्या कॉकपिटचे दरवाजे अधिक मजबूत करून ते कुलूपबंद ठेवण्यात येऊ लागले.
दहशतवादाच्या वाढत्या भीतीचा प्रभाव भारतातील अंतर्गत सुरक्षेवरही पडला. आज भारतीय विमानतळे, मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल्स आणि आयटी पार्क्समध्ये दिसणारी बॅगेची कडक तपासणी, मेटल डिटेक्टर्स आणि सशस्त्र रक्षक ही २००१ नंतर विस्तारलेल्या व्यापक सुरक्षा संस्कृतीचा भाग आहेत.
२. डिजिटल ट्रॅकिंगचे युग आणि व्हिसा मिळणे झाले कठीण : ९/११ पूर्वी, अनेक देशांमध्ये सरकारी पाळतीवर कायदेशीर आणि प्रक्रियेच्या मर्यादा होत्या. या हल्ल्यांनंतर दहशतवाद रोखण्याच्या नावाखाली संभाषण, आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारी अधिकारांचा विस्तार वेगाने वाढला.
• जागतिक पाळत : जगभरातील सरकारांनी फोन कॉल, ईमेल आणि आर्थिक नोंदींपर्यंत व्यापक पोहोच मिळवून देणारे कायदे लागू केले किंवा त्यांचा विस्तार केला. आज सोशल मीडियावर अॅप प्रायव्हसी, फोन हॅकिंग आणि डेटा संकलनाबाबत जी चर्चा होते, तिची मुळे याच ९/११ नंतरच्या सुरक्षा वातावरणात दडलेली आहेत.
• भारतीयांसाठी बायोमेट्रिक्स : परदेशात शिक्षण घेण्याची किंवा काम करण्याची इच्छा असलेल्या तरुण भारतीयांसाठी ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची झाली. प्रवास आणि इमिग्रेशनमध्ये फिंगरप्रिंट्स, छायाचित्रे, बायोमेट्रिक नोंदी आणि सखोल पार्श्वभूमी तपासणी यांचा समावेश वाढला, विशेषतः अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांसाठी.
३. ‘ब्राऊन’ ओळख आणि बदलता शेजार : परदेशात राहणारे भारतीय आणि प्रवास करणारे दक्षिण आशियाई लोक यांच्याबाबत, ९/११ मुळे ‘ब्राऊन स्किन’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विमानतळावर अचानक होणारी तपासणी आणि अतिरिक्त चौकशी सामान्य झाली. हिंदू, शीख किंवा मुस्लिम असोत, भारतीय आणि इतर दक्षिण आशियाई लोकांना अनेकदा एकाच चष्म्यातून पाहिले गेले. त्यांचा पेहराव, नावे किंवा पार्श्वभूमीमुळे त्यांना पूर्वग्रहांना, त्रासाला किंवा अतिरिक्त तपासणीला सामोरे जावे लागले.
भारताचा सामरिक शेजार बदलला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानवरील आक्रमणामुळे भारताच्या अगदी जवळ एक मोठे युद्ध सुरू झाले. त्यानंतरच्या संघर्षांमुळे सीमापार सुरक्षेच्या चिंतांचे स्वरूप बदलले, भारताचा दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावित झाला आणि पुढील दोन दशके अफगाणिस्तान व पाकिस्तान भारताच्या धोरणात्मक चर्चा आणि बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिले.
पंचविसाव्या स्मृतिदिनाचे महत्त्व
या भयंकर दुर्घटनेचा पंचविसावा स्मृतिदिन समजून घेणे हा केवळ इतिहासात रमण्याचा प्रकार नाही. हा नागरिक म्हणून साक्षर असण्याचा एक भाग आहे. फोन एन्क्रिप्शन, विमानतळावरील सुरक्षा, इमिग्रेशन, पाळत ठेवणे आणि वैयक्तिक गोपनीयता नियंत्रित करणारे नियम हे ११ सप्टेंबर, २००१ नंतर आले आहे.
पंचवीस वर्षांनंतर, ९/११ ची आठवण म्हणजे या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून तयार केलेल्या आपत्कालीन उपाययोजना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या कायमस्वरूपी व्यवस्थांमधील फरक समजून घेणे. ‘जनरेशन झेड’ला वारशात मिळालेले जग त्याच सकाळी नव्याने जन्माला आले. ते समजावून घेणे, आवश्यकच नाही का?