ठाणे : “हिंदु धर्माच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवून सत्य उजेडात आणण्याची वेळ आता आली आहे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक असून ‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट त्या दिशेने प्रेरणा देणारा ठरत आहे,” असे ठाम प्रतिपादन हिंदु मंचचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिनेश देशमुख यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी या चित्रपटातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
दिनेश देशमुख यांनी चित्रपटाचे विश्लेषण करताना खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले
१. प्रभावी अभिनय: अभिनेते परेश रावल यांनी ‘विष्णु शर्मा’ या पात्राची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली असून, ताजमहालच्या इतिहासाविषयीचा वेगळा दृष्टीकोन आणि सत्य शोधण्याची धडपड यात अधोरेखित केली आहे.
२. पिढ्यांचा संघर्ष: तीन पिढ्यांपासून पर्यटकांना मार्गदर्शन करणाऱ्या एका कुटुंबाचा ऐतिहासिक सत्यासाठीचा संघर्ष या कथेतून प्रभावीपणे मांडला आहे.
३. न्यायालयीन लढाई: केवळ कल्पकता नसून न्यायालयीन लढाई, सबळ पुरावे आणि साक्षीदार यांच्या माध्यमातून इतिहासातील सत्य मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटात दिसतो.
४. शिक्षणव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह: आपली शिक्षणव्यवस्था इतिहास कसा शिकवते आणि त्यात कोणत्या त्रुटी आहेत, यावरही चित्रपटात गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
“हिंदु संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येणे आवश्यक आहे. हा चित्रपट समाजात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल,” असे सांगून दिनेश देशमुख यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पाहून त्यातील विचारांचे मंथन करावे, असे आवाहन केले आहे.