Thursday, September 19, 2024

आरक्षणप्रश्नी राजेंद्र राऊत यांचे बार्शीत मनोज जरांगे विरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू

Share

मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलनाचे मनोज जरांगे-पाटील यांच्याविरुद्ध बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, तसेच मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण द्यावे की नाही याबाबत सर्वच पक्ष, नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी आमदार राऊत यांनी या वेळी केली आहे.बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह आमदार राऊत यांनी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी त्यांना विविध संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळाला.

राऊत म्हणाले, की मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेले आंदोलन हे भरकटलेले आहे. या प्रश्नी राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देण्याबाबत राज्यातील सर्व प्रमुख पक्षांनी आपली भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली आहे.अनेक पक्ष या भूमिकेबाबत मौन बाळगून मराठा समाजाची मते घेत आहेत मात्र त्यांची भूमिका ते स्पष्ट करत नाहीत.

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्यांनी देखील अद्याप या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष, त्यांच्या नेत्यांनी मराठा समाजास ओबीसींमधून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. या प्रत्येकाची भूमिका स्पष्टपणे जनतेसमोर आली पाहिजे, म्हणजे जनतेलाही कुणाला मतदान करायचे हे ठरवता योईल. अनेक पक्ष या मुद्द्यावर मोघम भूमिका घेत समाजाला फसवत आहेत. यांना आता असे समाजाच्या भावनांशी खेळता येणार नसल्याची टीकाही राऊत यांनी या वेळी केली.

दरम्यान प्रत्येक पक्षाची या विषयावरची भूमिका अधिकृतपणे समोर येण्यासाठीच राज्य विधी मंडळाचे विशेष अधिवेशन कायद्यानुसार मजबूत व्यासपीठ आहे. म्हणून विधानसभेचे सभापती ॲड. राहुल नार्वेकर यांना आपण पत्र लिहून पाठपुरावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

अन्य लेख

संबंधित लेख