Friday, October 18, 2024

महाराष्ट्रातील पुरोगामी भूतावळ!

Share

महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने काम करणारी काही मंडळी स्वतःला पुरोगामी मानणारे आहेत. त्यांचे धंदे म्हणजे हिंदुत्वाला शिवी गाळ करणे, संघाला शिव्या देणे आणि हा विचार घेवून काम करणाऱ्या वेगवेगळ्या नेतृत्वाला बदनाम करणे.

यांची राजकीय दुकाने वेगवेगळ्या नावाने एकेकाळी चालू होती ती दिवाळखोरीत निघाली कारण ना याना संघटन जमले ना हे लोकांची जनमानसाची नाडी ओळखू शकले. मग यांनी दुकानाच्या पाट्या बदलल्या धंदे तेच चालू ठेवले.

अजून एक यांचा उद्योग म्हणजे संस्था बळकावणे आणि त्या संस्थांच्या संपत्तीवर नागा सारखे जावून बसणे आणि त्याच्या ऊबेवर फणा काढत राहणे. पुण्यातील नगर रोडवर गांधींच्या नावाच्या एक संस्थेवर असाच एक साप जावून बसला आहे तो वयाच्या ८० च्या पुढे गेला पण त्याचा पीळ सुटत नाही. तो अजूनही स्वतःला तरुण समजून युक्रांद नावाने एक जोडधंदा करतो आहे.

नुकताच याने एक म्हणे परिसंवाद ठेवला होता , विषय काय होता ? हिंदू × हिंदू. आयुष्यभर हिंदूंच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला , हिंदू या शब्दाची याना एकेकाळी अलर्जी होती पण आता राहुल गांधी यांचा हिंदू याना अचानक आवडायला लागला आणि नरेंद्र मोदी यांचा हिंदू कसा वाईट आहे याची बोंब ते मारत सुटले आहेत . आणिबाणी विरोधात लढलेला हा गृहस्थ बघता बघता पाला पाचोळा झाला.

अंधश्रद्धा निर्मूलन नावाने असाच एक धंदा यांचा मोठा तेजीत होता. मध्यंतरी एक विधेयक आणून हिंदूंच्या श्रद्धा लक्ष करण्याचा त्यांनी प्रयत्न केला . याना इमाम आणि फादर मंडळी यांचा इतका धाक आहे की त्यांना पंथातील वाईट चालीरीती , बाप्पाचे पाणी , पीरावरच्या. चादरी दिसत नाहीत .

काही कलाकारांना हाताशी धरून पैसे कमावून मग या ट्रस्टच्या पैशासाठी भांडणे करून एक साने गुरुजी यांचा नायक शाम थकला . त्याच्या आडनावात मानव आहे पण व्यवहारात सगळे अमानवी आहे. सरकारकडून भीक मागून बघितली आणि मग झोळी रिकामीच राहिल्यावर रागाने सुपारी घेण्यासाठी तो परत त्याच्या आधीच्या यजमाना कडे तोंड वेंगाडत गेला. आणि आता त्याच्या इशाऱ्यावर राजकीय वल्गना करत सुटला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत हा भोळा भाबडा (?) वयोवृध्द शाम काही कोटीच्या बोलीवर भुंकायला तयार झाला आहे. HMV मधील कुत्र्याचा अपमान करायचा नाही आम्हाला कारण त्यांचा मालक तरी एक असतो. येथे दलाली प्रमाणे मालक बदलण्याचा गोरख धंदा आहे.

लोकसभेचे निकाल काय लागले आणि ही सगळी भूतावळ पेटून उठली. आता महाराष्ट्रात आपलेच राज्य! या भावनेने आपल्या राजकीय दात्यांच्याकडून सौदा करत उन्मादाने आपला हिंदू द्वेष अधिक निर्भय (?) पणे मांडू लागली. सत्ता येते की नाही? या आधीच सत्ता आल्याच्या गुर्मीत आपल्या जळमट लागलेल्या दुकानाची रंगरंगोटी करून तथा कथित वैचारिक दुकानात राजकीय माल विकू लागली.

सिव्हिल सोसायटी हे आता अलीकडील त्यांचे प्रतिष्ठित नाव झाले आहे. काही झाले की संघाला मध्ये घ्यायचे आणि त्या निमित्ताने भाजपलाही झोडपून घ्यायचे हा त्यांना त्यांच्या बारामतीकर दात्याने दिलेला कानमंत्र आहे आणि तंत्र विकत घेण्याचा भाग याच दात्याकडे असल्याने भाडोत्री , चाय बिस्कुट वाल्यांच्या जीवावर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात हा त्यांचा धंदा तेजीत आहे.

आपला वैचारिक विरोधाचा राजकीय कंड आता वेगवेगळ्या पक्षात जावून ते भागवून घेत आहेत. हे लबाड लांडगे ढोंग करण्यात पटाईत आहेत. पक्ष कुठलाही असो याना वर्ज्य नाही फक्त संघाला , हिंदुत्वाला , सावरकरांना झोडपण्याची त्यांना मुभा हवी आहे.

यांचा आदर्श फादर दिब्रिटो बाप्पाला नुकताच प्रिय झाला.( जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता पण ग्रंथ दिंडीत सामील नव्हता ) गेलेल्या माणसाला वादात ओढणे हे हिंदू संस्कृतीने आम्हाला नाही शिकवले पण विश्वंभर नावाचा एक मनोरुग्ण सध्या निर्भय(?) पणे सगळ्या सामाजिक , राजकीय विषयावर टिपणी करत असताना दिब्रिटो ला किती तुकाराम महाराजांचे अभंग माहिती होते , अभ्यास होता हे सांगत मध्येच संघावर घसरतो तेंव्हा हा भूतावळ‌ सेनापती सौजन्याची ऐशी तैशी करत अज्ञान तरी लपवतो आहे किंवा मुद्दाम खोटे बोलत आहे.

बाळ विश्वंभर , संघाबद्दल अनेक जण बोलून गेले , पण सर्वांच्या विरोधाला पुरून उरून , संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे. संत तुकाराम महाराज यांचे वंशज संघात कार्यरत आहेत. प्रचारक राहिले आहेत. ह.भ. प. शिवाजीराव मोरे , ह.भ. प. शिरीष महाराज मोरे याना भेटायला वेळ कधी काढतो ? तुझ्या साऱ्या शंका दूर होतील. तुझ्या बंद दुकानातील राजकीय माल खपवण्याच्या नादात संघाला मध्ये घेण्याचे पाप करू नको असे नम्र पण आम्हाला तुला सुचवायचे आहे.

हिंदुत्वाचा विचार आणि हिंदू संस्कृती ही राजकीय विचार , निवडणूक , निकाल , सत्ता याच्या पलीकडे आहे हे ह्या भुतावळीला अजूनही समजलेले नाही. सत्ता येईल जाईल , सरकारे येतील बदलतील पण हिंदुत्वाचा प्राकृत चिंतन विचार अमर आहे , तो विश्व कल्याणाचा आहे. तो संतांच्या अभंगात आहे. तो वेदांच्या ऋचा मधून प्रगट झाला आहे. त्यात कुठलाही दानवी अंश नाही. तात्कालिक फायद्यासाठी डाव्या पासून ते काँग्रेस पर्यंत कितीही एकत्र आले तरी हिंदू विचाराचा ” विजय ही विजय आहे ” हे येथे लक्षात ठेवावे.

रवींद्र मुळे.
अहिल्यानगर.

अन्य लेख

संबंधित लेख