Wednesday, May 15, 2024

भारताने केली चौफेर प्रगती: म्हणून देशाला पुन्हा हवे आहेत नरेंद्र मोदी

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक रूपे आम्हा सर्वसामान्य भारतीयांना जवळची वाटतात आणि म्हणूनच मोदी पंतप्रधान म्हणून भारतीयांना पुन्हा हवे आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक लक्षणीय गोष्टी घडल्या. आपल्या देशाची चौफेर प्रगती झालीच, पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढला, म्हणून देशाला पुन्हा मोदी हवे आहेत.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. अशा वेळी खरेच देशाला, लोकांना मोदी पुन्हा का हवे आहेत ? याचा शोध घेण्याची, याबाबत चिंतन करण्याची गरज आहे.

गेल्या १० वर्षात अकबर रोड राजपथ बनला. नेताजी सुभाष बाबू दिल्लीतील प्रमुख हुतात्मा स्मारकात स्थापित झाले. नाविक दलाच्या चिन्हात छत्रपती शिवराय यांची मुद्रा स्थापित झाली. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा भाग असलेल्या सोहळ्यातील पाश्चात्य संगीत जाऊन ए मेरे वतन के लोगो आणि जयोस्तुते कानावर येऊ लागले. लुटियंसने बांधलेले संसद भवन जाऊन वैदिक शास्त्रार्थ भवनाच्या धर्तीवर संसद भवन बनले. राजदंड विधिवत स्थापित झाला. मानसिक गुलामगिरीतून भारतीय जनमानस मुक्त करण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले
या देशावर दीर्घ काळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी इंग्रजांनी एक शैक्षणिक धोरण आणले. मेकॉले त्याचा सूत्रधार. हेच धोरण दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर चालू राहिले. किंबहुना अधिक विकृत होत गेले. इतिहास चुकीचा शिकवला गेला. भारतीय संस्कृती बरोबर पूर्ण फारकत घेणारे हे धोरण देशासाठी जगण्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्यात सपशेल अपयशी ठरले होते. ते शैक्षणिक धोरण बदलण्याचे धाडस मोदी सरकारने दाखवले ज्याचे परिणाम पुढील २५ वर्षात आम्ही बघणार आहोत. त्यासाठी पुन्हा मोदी भारताचे पंतप्रधान झाले पाहिजेत !

मंत्रिमंडळात कार्यक्षम मंत्री
गेली १० वर्षे पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात अनेक दिग्गज मंत्री त्यांच्याकडे असलेले खाते योग्य दिशेने पुढे नेत आहेत. भारतीय रस्ते वाहतूक मंत्रालय रोज निर्माण होत असलेल्या रस्त्यांची सुखद अनुभूती देत आहे ते गडकरी यांच्यासारख्या मंत्र्यामुळे. रेल्वे आपली कात टाकून आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहे ती पियूष गोयल आणि आश्विन वैष्णव या मंत्र्यांच्या मेहनतीने. संपूर्ण जगात मंदी भासत असताना आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानाकडून तिसर्‍या क्रमांकावर झेप घेत आहे. जीडीपीच्या पूर्वकल्पना आणि अंदाज खोटे ठरवत भारत वेगाने पुढे चालला आहे. राजनाथ सिंग आणि अमित शहा यांच्या नेतृतत्वाखाली अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा ही पोलादी पकड घेत आहे ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवल यांच्या आक्रमक, धाडसी भूमिकेमुळे. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाची आठवण यावी असे मंत्रिमंडळ आम्हाला पुन्हा हवे आहे. ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप कुणी लावू शकलेले नाही. यासाठी मोदीजी पुन्हा पंतप्रधान म्हणून आम्हाला हवे आहेत.

भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढला
जगभर चालू असणार्‍या अशांत वातावरणात, युद्धजन्य परिस्थितीत आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत जग भारताकडे खूप आशेने बघत आहे. देशाने राजकीय स्वातंत्र्य मिळवताना लढलेला लढा तर जगाने बघितला पण भारत मानसिक स्वातंत्र्य मिळवताना जे गतवैभव प्राप्त करू पाहत आहे आणि त्याद्वारे स्वामी विवेकानंद यांनी उच्चारलेली जी भविष्य वाणी खरी ठरू पाहत आहे याचे साक्षीदार होण्याचे भाग्य सगळ्या भारतीयांना अनुभवायचे आहे. युद्ध काळात भारतीय विद्यार्थी वंदे भारत मोहिमेद्वारे सुरक्षित परत येतात, कतार येथून निष्पाप भारतीय सुटतात आणि परत येतात. भारताच्या मध्यस्थीची रशिया, युक्रेन हे दोन्ही देश वाट बघतात. हे सर्व भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा वाढल्याचे द्योतक आहे. याच भारताच्या विश्वगुरुत्वाच्या पाऊलखुणा आहेत. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

गेल्या वर्षी जी २० देशांचे प्रतिनिधी भारतात एकत्र आले. भारताच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवताना किंचितही न्यून न बाळगणारे मोदी आम्ही बघितले. चीनला एकटे पाडून वाहतूक कॉरिडॉरसाठी इतर देशांबरोबर सामंजस्य करार करताना आम्ही मोदींच्या मधला राजकीय मुत्सद्दी बघितला आहे. युक्रेन, रशिया युद्धात दोघांना जवळचे वाटणारे राष्ट्रप्रमुख मोदी आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय दबदबा जिओ पॉलिटिक्समध्ये वाढवताना जयशंकर यांच्यासारखा खंबीर साथीदार त्यांनी शोधला आहे. जिकडे तिकडे भारताकडे आदराने बघितले जात आहे. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान हवे आहेत.

रुपयात व्यापार सुरू झाला आहे. एक नवे अर्थशास्त्र विकसित होत आहे. बळीराजा नवी क्षितिजे शोधत आहे. मिलेटची मागणी वाढत आहे. योगदिन सर्व देशांनी आता स्वीकारला आहे. मोदीजी भारतीय आहार, भारतीय विहार आणि भारतीय विचार याचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनले आहेत आणि म्हणून मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

आत्मनिर्भर समाज, त्यातून होऊ घातलेला विकसित भारत आणि या विकसित भारताच्या सर्वे भवन्तु सुखिन:! या मंत्राचा उद्घोष जगभर आम्हाला करायचा आहे. ‘कृणवन्तो विश्वमार्यम्’ या संकल्पाला आम्हाला कृतिशील करायचे आहे. ‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’ ही पसायदानातील धारणा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मार्गाने सत्यात उतरवण्यासाठी देशाचे नेतृत्व पुन्हा मोदीजी यांच्याकडे सुपूर्त करायचे आहे.

विश्वस्त परंपरा पुढे नेण्यासाठी…
गेल्या ७५ वर्षात लोकशाहीचा बुरखा पांघरून परिवारवादी पक्षांनी ठराविक लोकांना वारसा परंपरेने सत्तेचा उपभोग घेताना लोकांनी बघितले. मोदी यांना कुठलाही वारसा नाही आणि त्यांचा कुठला व्यक्तिगत परिवार नाही. ना त्यांचे कुणी नातेवाईक पंतप्रधान निवासाकडे फिरकत असतात, ना कुणी राजकीय लाभार्थी आहेत. ‘राजकीय व्यवस्थेतून मिळणारे पद हे विश्वस्त पद असते न की लाभाचे’ हे स्वतःच्या व्यवहारातून दाखवणारे मोदी आहेत. अशी विश्वस्त परंपरा पुढे नेण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे.

अजमेर येथे जाऊन चादर वाहणारे, पंतप्रधान निवासात गोल टोप्या घालून इफ्तार पार्ट्या देणारे, या देशातील संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिम समाजाचा आहे असे सांगणारे पंतप्रधान आम्ही पाहिले. पण अनुष्ठान करणारे, नवरात्रात उपवास करताना फक्त लिंबू पाणी पिणारे, पंतप्रधान निवासात गायींचे संवर्धन करणारे आणि देशभरात मंदिरात दर्शन घेताना हिंदू असल्याचा सार्थ अभिमान बाळगणारे पंतप्रधान मोदींच्या रूपाने आम्ही प्रथमच पाहत आहोत. म्हणून मोदीजी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

मोदी आम्हाला वेगळे वाटतात
वेळेच्या नियोजनासाठी विमानतळावरही बैठका घेणारे, प्रसंगी विमानतळावरच स्नान आदी उरकून घेणारे, हॉटेलचे बिल वाढू न देण्यासाठी टॅक्सीतून सामानासहित मीटिंगसाठी जाणारे, प्रवासात घरून निघताना दोन थेपले डब्यात घेऊन स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवणारे मोदी आम्ही पाहत आलो. आणि सरकारी पैशाची, संपत्तीची उधळपट्टी करणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारे सवंग पुढारी आम्ही पाहत आलो. म्हणून त्या पार्श्वभूमीवर मोदी आम्हाला वेगळे वाटतात म्हणूनच आम्हाला मोदी पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

कुटुंब प्रमुख पंतप्रधान मोदी
लहानग्या मुलाला कडेवर घेणारे, विद्यार्थ्यांशी परीक्षेच्या वेळी आजोबांच्या भूमिकेतून सल्ला मसलत करणारे, तरुण उद्योजक, शास्त्रज्ञ, खेळाडू, अभिनेते यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात प्रोत्साहित करणारे, उद्योजकांना त्यांच्या परिभाषेत समजावून सांगत विकासात त्यांना सामावून घेणारे, महिलांना सक्षम करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आणि दिव्यांगाना दया नव्हे तर अधिकार प्रदान करून बरोबरीची प्रतिष्ठा मिळवून देणारे खर्‍या अर्थाने कुटुंब प्रमुख असे पंतप्रधान मोदी आम्ही बघत आलो आहोत, म्हणून मोदी आम्हाला पुन्हा पंतप्रधान म्हणून हवे आहेत.

फक्त वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आईची भेट घेवून आशीर्वाद घेणारे पण आयुष्यभर कष्ट करणार्‍या आपल्या आईला पंतप्रधान मोदींची आई म्हणून ऐश्वर्य उपभोग या पासून दूर ठेवणारे मोदी, आई गेल्यावर भावूक होणारे पण त्या भावनांचा कुठलाही बाजार न मांडता आपल्या सामाजिक कर्तव्यात मग्न राहिलेले मोदी, आपली दिवाळी सैन्यातील जवानांच्या बरोबर साजरी करताना त्यांच्यातील एक होऊन जाणारे मोदी, ही सगळी मोदी यांची ही रूपे आम्हा सर्वसामान्य भारतीयांना जवळची वाटतात आणि म्हणूनच मोदी पंतप्रधान म्हणून भारतीयांना पुन्हा हवे आहेत.

एका अमृतकाळाची नांदी ठरणार्‍या लोकशाहीच्या या उत्सवासाठी योग्य मतदान करण्यास सिद्ध होऊ या. हे मतदान पाच वर्षासाठी असेल पण त्याचा परिणाम पुढील काही शतकांवर होणारे आहे. चला तर मग पुन्हा लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करू या, भारताला विश्वगुरु बनवू या.
भारत माता की जय !

रवींद्र मुळे
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी असून नगरमधील प्रथितयश उद्योजक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख