Saturday, June 28, 2025

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली वारकऱ्यांची : चरण सेवा 

Share

आषाढ महिना सुरु झाला  की महाराष्ट्राचे वातावरणच भक्तीमय होते; डोळ्यांपुढे येतो तो टाळ-मृदंगाचा गजर, संतांच्या पालख्यांचा उत्साह आणि विठ्ठल भेटीसाठी निघालेली लाखोंची वारकरी मांदियाळी. ही वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अस्मितेचे प्रतीक आहे.

शतकानुशतकांची परंपरा असलेली ही वारी अनेक संकटांना तोंड देत टिकून आहे. मुस्लिम आक्रमणांच्या काळातही ही परंपरा थांबू नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः पुढाकार घेत वारकरी संप्रदायाचे संरक्षण केले. आजही राज्यातील नेतृत्व या परंपरेप्रती तितकेच जागरूक आहे. पांडुरंगाच्या सेवेसाठी आणि वारीच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संत परंपरेचा मान राखत, वारकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेत आहेत.

पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक अद्वितीय आध्यात्मिक परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला लाखो वारकरी “ज्ञानोबा-तुकोबा” या गजरात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी निघतात. ही वारी केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर ती सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि समर्पण यांचा प्रतीकात्मक आविष्कार आहे. जाती, धर्म, वय, लिंग, भाषा, प्रांत असे कोणतेही भेद न बाळगता सर्वसामान्य जनता एका नावाने एकत्र येते आणि विठ्ठलनामात लीन होते. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, ऊन, पावसाचे चटके, थकवा, अन्न-पाण्याची अडचण, या सर्व अडथळ्यांवर मात करत ही चाल सुरू राहते. अशा स्थितीत वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घेणे ही शासनाची नैतिक व सामाजिक जबाबदारी ठरते. आणि महाराष्ट्र शासन ही जबाबदारी समर्पण आणि संवेदनशीलतेने पार पाडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने वारीच्या परंपरेला केवळ धार्मिकतेच्या चौकटीत न पाहता, ती एक व्यापक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वीकारली आहे. त्यांच्या सूचनेतून ‘चरणसेवा’ या अभिनव उपक्रमाची संकल्पना साकारली गेली. या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा, तपासण्या, प्राथमिक उपचार आणि औषध वाटप यांचे आयोजन करण्यात आले. मात्र ‘चरणसेवा’ एवढ्यावरच थांबत नाही. वारकऱ्यांच्या चालून थकलेल्या पायांना, अंगाला आणि खांद्यांना खास आयुर्वेदिक तेलाने  स्नेहन व स्वेदन सेवा करून शारीरिक आणि मानसिक दिलासा देणारा हा उपक्रम प्रत्यक्ष सेवाभाव आणि आपुलकीचा अनुभव देतो. हजारो भाविकांसाठी ही सेवा केवळ वैद्यकीय उपचार नाही , तर भक्तीच्या प्रवासातील विश्रांतीचा आणि स्नेहाचा क्षण आहे.

या सेवेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या सहकार्यातून राज्यभरातील विविध वैद्यकीय शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला आहे .  फिजिओथेरपी, नर्सिंग, आयुर्वेद, डेंटल, होमिओपथी आदी शाखांतील विद्यार्थी आणि कर्मचारी पालखीच्या प्रत्येक मुक्कामी सेवा देत आहेत.

पुणे महानगरातील आयुर्वेदिक कॉलेज, सासवड रोड येथील नर्सिंग कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, गंगाधाम रोड येथील आयुर्वेदिक कॉलेज, शिवाजीनगर येथील डेंटल कॉलेज, एच.जे. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, ससून रुग्णालय, नवले शिक्षण संस्था, जेठवाणे एज्युकेशनल ट्रस्ट, वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय रुग्णालय अशा विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी , कर्मचारी यांनी सेवा कार्य केले आहे. त्यांनी कोणत्याही भेदाभेदाशिवाय वारकऱ्यांची सेवा केली. त्या सेवेतून निर्माण झालेले भावनिक नाते हे सामाजिक समरसतेचे उत्तम उदाहरण ठरले. “सेवा हीच साक्षात उपासना” हे तत्त्व त्यांच्या कृतीतून अधोरेखित झाले.

वारी मार्गावरील ४३ ठिकाणी ‘चरणसेवा’ उपक्रम राबवण्यात आला. विशेषतः पुणे जिल्ह्यात ३० ठिकाणी या सेवेला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. या ठिकाणी हजारो वारकऱ्यांना वैद्यकीय आणि थकवा निवारण सेवा देण्यात आली. एकट्या पुणे शहरातच १५,००० हून अधिक वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. मसाज, औषधे, आणि आधाराच्या या सेवेमुळे त्यांना पुढचा प्रवास अधिक सहज आणि उत्साही वाटू लागला. या उपक्रमामुळे वारीचा अध्यात्मिक अनुभव केवळ भक्तिभावाशी मर्यादित राहिला नाही, तर तो सेवाभाव आणि आपुलकीने समृद्ध झाला. वारीच्या पुढच्या काळात अधिकाधिक वारकरी या सेवाचा लाभ घेतील.  

चरणसेवा उपक्रम वारीच्या परंपरेला आधुनिकतेचा स्पर्श देणारा आहे. शासन आणि समाज जेव्हा एकत्र येऊन वारकऱ्यांची सेवा करतात, तेव्हा ती कृती आरोग्यसेवा पुरवण्यापेक्षा अधिक खोल परिणाम करणारी ठरली आहे. या सेवेत प्रत्येक औषधाच्या पाकिटात, प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक स्नेहनात सेवाभावाची ऊर्जा भरलेली असते. त्यामुळे ‘चरणसेवा’ ही केवळ योजना न राहता, एक ‘सेवायज्ञ’ बनळे आहे. ही उपक्रमशृंखला वारीच्या दीर्घ इतिहासात एक नवा आणि भावस्पर्शी अध्याय ठरते.

मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांतून यशस्वी झालेला हा उपक्रम वारीसारख्या परंपरेला केवळ सांस्कृतिक नव्हे, तर सामाजिक, आरोग्यदृष्ट्या आणि मानवीदृष्ट्याही अधिक सशक्त, व्यापक आणि प्रेरणादायी बनवतो. 

अन्य लेख

संबंधित लेख